बुधवार, ऑगस्ट ०४, २०१०

"कांदा बटाटा 'बॅचलर' रस्सा"

नमस्कार मंडळी,
काय दचकलात ना??? आधी तर निखिल देशपांडे हे नाव बोर्डावर बघुन आणि तेही पाककृती या विभागात. पण होते असे कधी तरी चुकुन एखाद्या गोष्टीचा इतका वैताग येतो की आजवर न मनावर घेतलेल्या गोष्टिंकडेही तुमचे सहज लक्ष जातेच. गेले दोन तीन दिवस मिपा वर जो काही धुडगुस चालु आहे त्याचावर आधी भरपुर हसुन घेतले मग थोडा कंटाळा आला आणि शेवटी तर वैताग आला. पण या सगळ्या व्यापातुन आम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवली "स्वयंपाकेविण बिंपाक अवघड आहे". कोण रे तो??? नक्की पराच असेल, म्हणतोय कसा बाई ठेवायची स्वयंपाक,बिंपाकाला. आहो प्रत्येकाला जमते का असे??? आता आमचा बिकाच बघा ना आज मुंबई, उद्या पुणे, परवा दुबई, तेरवा अजुन कुठे??? प्रत्येक ठीकाणी त्याने स्वयंपाकाला बाई ठेवली तर!!!!! ;) यावर बिकाने उपाय शोधलाच आहे पहा खुप आधीच त्याने कांदा टोमॅटोची 'बॅचलर' भाजी... उर्फ सुगरण्याचा सल्ला लिहुन ठेवला आहेच. अरे या बॅचलर भाजी वरुन आठवले ते आमचे चोता दोन(माफ करा राव, पण हे असेच लिहावे वाटते). दोन्याची तर म्हणे उपासाच्या सारख्या स्पेशल स्वयपांकाची मास्टरी आहे. त्यांची उपवासाची साबुदाण्याची बॅचलर थालिपीठे ... उर्फ डॉन्याचा सल्ला.. हे सगळे बघुन आम्ही ही घेउन आलो आहोत "कांदा बटाटा 'बॅचलर' रस्सा... उर्फ निख्याचा सल्ला ".

तर मंडळी आम्ही स्वयंपाक काय करायचा असा विचार करुन मिपाच्या समृद्ध पाककृती विभागात शिरलो. सर्व प्रथम पेठकर काका, गणपा अश्या जेष्ट बल्लवाचार्यांना प्रणाम करुन घेतला, मग स्वाती ताई, जागु, दिपाली पाटील यांचा पाककृतीचे स्मरण केले. पण आमच्या डोळ्यासमोर एकच पाककृती दिसत होती. जाई ताईंची "रावणी पिठले". सगळी पाककृती तिनदा वाचुन आम्ही लॅपटॉप ला ओट्यावर स्थानापन्न केले. आणि साहित्य शोधायला लागलो आणि आमच्या समोर एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहीले.. १ वाटी डाळीचे पिठ अरे पण कोणत्या??? पहिल्यांदाच स्वयंपाक करणार्‍या नवशिक्यांनी कसे ओळखायचे कोणत्या डाळीचे ते. पहिले आठवली तुर दाळ पण मग आठवला चुचु चा धागा ज्यात तिने तुर डाळ महाग झाल्याने आम्ही कोब्रा गोड वरण भात कसे खाणार असा जागतिक प्रश्न उभा केला होता. पण याचाच अर्थ तुर डाळ वरणासाठी वापरातात, मग अचानक आठवले की अमरावतीकडे पिठल्याला बेसनही म्हणतात. मग बाजारातुन मुंबई बेसन आणावे लागेल. पण आणणार कोण??? मी??? शक्यच नाही. एकतर स्व्यंपाक करुन मी माझ्यावरच उपकार करतोय. खरे तर माझा आयडी आळश्यांचा राजा असायला हवा होता पण तो आधीच घेतलेला आहेच. मग शोधाशोध करत असताना आमच्या लक्षात आले की घरात फक्त कांदे आणि बटाटे आहेत.त्यामुळे उरला एकच ऑप्शन कांदा बटाटा रस्सा.

साहित्य :
३ मध्यम बटाटे
१ मोठा कांदा
३-४ मिरच्या
३-४ लसणाच्या पाकळ्या
अर्धा इंच आलं
तेल तुमच्या डायटनुसार

कृती
सर्व प्रथम बटाटे, कांदे एकसारखे चिरुन घ्यावेत. खास बॅचलर लोकांसाठी सुचना कांदे धुउन चिरायला घ्या उगाच जास्त रडावे लागणार नाही. आता बॅचलर असल्यावर घरात मिक्सर असण्याची शक्यता कमीच अश्या वेळेस जास्त टेन्शन घ्यायचे नाही. मिरच्या बारीक चिरुन घ्यावा त्याच सोबत लसणाचा पाकळ्यांचे सुद्धा बारिक तुकडे करुन घ्या. आता एका ताटात मिरच्या, आले लसुण ठेवुन त्याला वाटीने व्य्वस्थीत ठेचुन घ्या, छान एकजीव होई पर्यंत हे करत रहा. आता एका कढई मधे नेहमी प्रमाणे फोडणी तयार करा. तेल हे तुमच्या अंदाजाने आणि तब्येती नुसार टाका. बॅचलर लोकांनो एकटेच खाणार असाल तर हे तेल थोडे जास्त झाले तरी हरकत नाही, हळुहळु अंदाज जमेल. त्यात मोहरी, जिरे हे तुमच्या अंदाजा नुसार टाकावेत. मोहरी फुटल्या नंतर कांदा हा मिश्रणात टाकुन लालसर परतवुन घ्यावा. आता पुढे यात तुमच्या अंदाजा नुसार आधी तुम्ही तयार केलेला कांदा लसण आल्याच ठेचा टाकावा, नंतर गरम मसाला एक चमचा, पावभाजी मसाला असल्यास तोही एक चमचा टाकावा, एकवार सगळे परतुन घ्यावे. त्यानंतर तुमच्या कॅपॅसिटी नुसार तिखट टाकावे, आधीच तीन- चार हिरव्या मिरच्या आहेत त्यामुळे लाल तिखटाचा अंदाज घ्यावा. आम्ही चार चमचे तिखट टाकले होते. त्यानंतर यामधे बटाटे टाकुन साधारण एक-दिड मिनिटे परतवुन घ्यावा. परतुन झाल्यानंतर वरुन एक वाटी पाणी अ‍ॅड करावे. आणि मग मंद आचेवर बटाटा शिजे पर्यंत ठेवावा. एवढे सगळे झाल्यावर अचानक तुम्हाला आठवेल तुम्ही भाजीत मिठ विसरलात. पण कहई हरकत नहई तुम्ही आताही मिठ अ‍ॅड करुच शकता. मिठ साधारण एक चमचा ठीक असेल. तर साधारण पाच दहा मिनिटाने एका पठीवर एक बटाटा घेउन तो चमच्याने दाबुन शिजला आहे का ते तपासुन घ्या. शिजला असेल तर तुमची भाजी तय्यर पटापट एखाद्या प्लॅट किंवा वाटी मधे वाढुन घ्या आणि खायला लागा.








टिपः भाजीतले प्रमाणे एकामाणसा साठी थोडी जास्त आहेत. दोन माणसांना पुरु शकेल.

चला आता पळतो आम्ही... उद्या लवकर उठायचे आहे पण तसेही नॅचरल आलारामाची (अलार्म म्हणने जमणार नाही) सोय भाजीने केलीच आहे.

शनिवार, जुलै ०३, २०१०

ब्राझिल वर्ल्डकपच्या बाहेर पडल्यामुळे तसेही या मॅच मधे फारसे लक्ष नव्हतेच...


तसेही मॅच घाना आणि उरुग्वे यांचा मध्ये होती...

घाना आफ्रिकेतला उरलेला शेवटचा स्पर्धक देश... मॅचचे पहिले ९० मिनिट आणि एक्स्ट्रॉ टाईम चे २९ मिनिट चांगले झालेच.. दोन्ही संघ आक्रमक होतेच आणि शेवटच्या काही मिनिटांत तर घाना सतत उरूग्वेच्या हाफमध्येच होता. पण खरा थरार घडला तो सामना संपायला काही सेकंद बाकी असताना... घानाला एक फ्री कीक देण्यात आली. स्टीव्हन अ‍ॅपीया ने केलेला प्रयत्न उरूग्वेच्या सोरेझने अडवला , पण तो हाताने. आणि अगदी मॅचच्या शेवटच्या सेकंदाला घानाला एक पेनल्टी कीक आणि सोरेझला रेड कार्ड मिळाले.



असीमोल ग्यान, घानाचा सर्वोत्कृष्ट स्ट्रायकर ही पेनल्टी घ्यायला उभा राहिला आणि घानाच्या बाजूने मैदानात विजयाचा जल्लोष सुरू झाला. सार्‍या आफ्रिकेच्या आशा खांद्यावर घेऊन ग्यानने ही कीक घेतली पण हाय रे दुर्दैवा.. बॉल साईडबारला जाऊन भिडला.. आणि रेड कार्ड घेऊन बाहेर जाणार्‍या सोरेझने आणि अर्थातच उरूग्वेच्या सर्व समर्थकांनी जल्लोष केला..
 

सामना अर्थातच पेनल्टी शूट आऊट मध्ये गेला आणि एक सुवर्णसंधी गमावल्यानंतर जे होते तेच झाले... घानाने सामना गमावला.. ग्यान हिरो टू झिरो झाला.. त्याचबरोबर धिस टाईम फॉर आफ्रिका असे गाणे म्हणत आफ्रिकेतला एखादा संघ जिंकावा ही आशा संपुष्टात आली.

मंगळवार, जून १५, २०१०

जस्ट फॉर फन



पुस्तक: Just For Fun: The Story Of An Accidental Revolutionary

लेखक: Linus Torvalds

भाषा: इंग्रजी

किंमत: 554.00

पृष्ठसंख्या: 288




कॉलेजात असतानाची गोष्ट, घरात संगणक येऊन साधारण सात-आठ महीने झाले असतील. तेवढ्या दिवसात तीन-चार वेळा फॉर्मेट पण करुन झाले. त्यामुळे ओ.एस इन्स्टॉल करायची सवय झालीच होती. एक दिवस मित्र घरी आला. येताना हातात ३ सीडीज होत्या. "लिनक्स आणले आहे, करायचे का इन्स्टॉल??" या प्रश्नाचे उत्तर न कळत हो असेच गेले. त्या आधी लिनक्स कधी वापरले नव्हते. आधीच माझ्या कंप्युटरवर विंडोज ९८ आणि एम ई किंवा एक्स पी अश्या दोन ओएस होत्या. तिसरी ओ. एस. टाकण्याचा नादात त्या दिवशी आम्ही कंप्युटरची वाट लावली हे सांगायला नकोच. तेव्हाच मी या माणसाचे नाव पहिल्यांदा ऐकले. जसजसे लिनक्स वापरायला लागलो, तसतशी याच्याबद्दल नवीन नवीन माहिती कळत गेली. त्याचे नाव मधुनमधून मॅगेझिन्समधून सर्वत्र वाचायला मिळायचेच. नोकरीला लागल्यावर ऑफिसात जर एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी कुणी लिनक्स रिस्टार्ट करायचा सल्ला दिला तर त्याच्याकडे बघुन "ऐसा करेगा तो लिनस जान दे देगा.." हे तुच्छतेने म्हणण्यातली मजा वेगळीच!!!

कोण हा लिनस?? हा लिनस म्हणजे लिनक्स या संगणक प्रणालीचा पहीला कर्नल लिहिणारा माणुस. "जस्ट फॉर फन" हे त्याचेच आत्मचरित्र!!


"I was a nerd. Geek. From fairly early on. I didn't duct-tape my glasses together, but I might as well have, because I had all the other traits. Good at math, good at physics, and with no social graces whatsoever. And this was before being a nerd was considered to be a good thing." -- Linus Torvalds


जस्ट फॉर फन हे लिनस टॉरवल्ड्स यांनी डेविड डायमंडच्या सहकार्याने लिहिलेले लिनस यांचे आत्मचरीत्र. या पुस्तकात लिनस हे आपल्या आयुष्याबद्दल सांगतातच, त्याच सोबत डेविड डायमंड सुद्धा लिनस आणि त्यांच्या कुटुंबासोबत आलेले अनुभव सांगतात. लिनक्सची व्यक्तिगत माहिती म्हटले तर, त्यांचा जन्म २८ डिसेंबर १९६९ ला हेल्सिंकी या फिनलन्ड च्या राजधानी चा शहरात झाला. त्यांचे पालक निल्स आणि अ‍ॅना हे दोघेही पत्रकार होते. लिनस चा परिवार हा फिनलन्ड मधल्या स्विडीश बोलणार्‍या अल्पसंख्याक समुहाचा भाग होता ही गोष्ट माहीती नसल्यामुळेच त्याचा सुरवातीच्या काळात त्याचा "लिनक्स" चा उच्चारसमजण्यास लोकांना त्रास होत असे. लिनस हे लहानपणापासुन गणितात हुषार होते. त्यांच्यावर सुरवातीच्या काळापासुन त्यांच्या आजोबांचा बराच प्रभाव होता. त्यांचे आजोबा हे युनिवर्सिटी ऑफ हेल्सिंकी मधे स्टॅटिस्टीकचे प्राध्यापक होते. लिनस यांनी १९८८ मधे युनिवर्सिटी ऑफ हेल्सिंकी मधे कॉम्प्युटर सायन्स शिकण्यास सुरवात केली. त्याच काळात त्यांनी ईंटेल ३८६ सिरीजचा कॉम्प्युटर घेतलेला होता. त्यावर त्यांनी मिनिक्स ही युनिक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टिम वापरायला सुरवात केली. कॉम्प्युटर क्षेत्रात शिक्षण घेतलेल्यांना अ‍ॅन्ड्र्यु टॅननबॉमचे नांव माहित नसेल तर नवलच . तर मिनिक्स ही त्याच टॅननबॉम यांची ओ एस.


लिनसना मिनिक्स प्रणाली वापरताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्याच सोबत त्यांच्या समोरची सर्वात मोठी अडचण म्हणजे लिनस यांना त्यांचा विद्यापीठाच्या नेटवर्क मधल्या कंप्युटरला जोडण्यासाठी लागणारा टर्मिनल एमॅल्युएशन चा प्रॉग्राम मिनिक्स मधे उपलब्ध नव्हता. हाच प्रॉग्राम लिहिण्याचे लिनस यांनी ठरवले आणि तीच लिनिक्स च्या निर्मीतीची पहिली पावले होती. लिनस यांनी लवकरच तो प्रॉग्राम पुर्ण केला त्यानंतर या प्रॉग्राम सोबतच त्यांना या सोबत फाईल ट्रान्स्फर सारख्या इतर गोष्टी करण्याची गरज जाणवत गेली आणि असेच हळू हळू लिनक्सची निर्मिति झाली. लिनक्स यांनी ऑगस्ट २००१ मधे ते एका मोफत ओ.एस. वर काम करत असल्याचे जाहीर केले आणि त्याचपाठोपाठ संप्टेबर २००१ मधे लिनक्सचा पहीला कर्नल ०.०१ वापरासाठी खुला करण्यात आला. आणि पुढचा सगळा इतिहास सर्वज्ञात आहे.


जर तुम्ही नॉन टेक्निकल असाल, तर या पुस्तकात खुप जास्त टेक्निकल भाषा असेल आणि आपल्याला काही कळणार नाही असा समज करुन घ्यायची काही गरज नाही. सामान्य वाचकासाठी लिनसच्या आयुष्याची कथा निश्चितच आवडेल अशी आहे. लिनस यांनी त्यांना यश मिळुनही आपले पाय जमीनीपासून हलू दिले नाहीत हे त्यांनी स्वतःवरच केलेल्या विनोदावरुन वेळोवेळी दिसुन येते. त्याच सोबत लिनस यांनी त्यांचासाठी जीवनाची व्याख्या काय हे देखील जाताजाता नमूद केले आहे.
टेन्किकल वाचकांसाठी लिनसच्या या कथेसोबतच इतर बर्‍याच गोष्टी आहेत. त्यात लिनक्स, ओपन सोर्स आणि संगणक जगताच्या भविष्याबद्द्ल लिनस यांचे विचार वाचण्यालायक आहेतच. त्याच सोबत त्याचा अ‍ॅड्रु टॅननबम यांचाशी झालेला प्रसिद्ध वादाबद्दल्च्या माहीतीतुन बरेच काही शिकण्यासारखे आहेच. कोणत्या प्रकारचे कर्नल चांगले आहेत, या बद्दलच्या या वादाबद्दल अधिक माहीती या दुव्यातुन मिळु शकतेच. या सगळ्यात लिनसच्या लेखणीतून आलेले काही निबंध देण्यात आलेले आहेत तो भाग रटाळ वाटण्याची शक्यता आहे. पण एकूणच लिनक्सच्या निर्मीतीची ही कथा


शुक्रवार, जून ११, २०१०

वी आर द चॅम्पियन्स

फिफा वर्ल्ड कप आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. परत तोच थरार अनुभवायला आपण तयारच आहोत. आता प्रत्येक खेळाडू आपल्या देशाला जिंकवण्यासाठी कौशल्याची बाजी लावेल. कारण इथे प्रत्येक जण आलाय तो चॅम्पियन होण्यासाठीच. क्वॉलिफायर्स पार करुन आता ३२ संघ सज्ज झाले आहेत उद्यापासुन होणार्‍या लढतींसाठी. तशी, प्रत्येक वर्ल्ड कप ची एक खासियत म्हणजे त्यांचे थीम साँग्ज आणि मॅस्कॉट्स... वर्ल्ड कप ची गाणी आपण ऐकतोच पण प्रत्येक वर्ल्ड कप चा शुभंकर हा त्या देशाच्या संस्कृतीचे प्रतिक असतो म्हणायला हरकत नाही!


We are the champions - my friends

And we'll keep on fighting - till the end -

We are the champions -

We are the champions

No time for losers

'Cause we are the champions - of the world


वी आर द चँपियन्स या गाण्याला क्रीडाक्षेत्रात विजयगीताचा बहुमान तर आधीपासूनच होता, आणि १९९४ च्या अमेरिकेत झालेल्या वर्ल्ड्कपच्या वेळेस त्याला ऑफिशियल गीत म्हणून गौरवले. "वी वील, वी वील, रॉक यू" म्हणता म्हणताच क्वीन हा बँड "वी आर द चँपियन्स " सारखे गाणं आपल्याला देऊन जातो. आता गाण्याबद्दल काही अधिक न लिहिता आपण सरळ व्हिडिओचा लुफ्त घेऊयात.







याच वर्ल्डकप चा मॅस्कॉट होता स्ट्राईकर :- द वर्ल्ड कप पप.

म्हणजेच अमेरिकेतल्या घराघरातला पाळीव कुत्रा. त्याला लाल निळा आणि पांढरा असा टीशर्ट घातला आहे. आणि त्याच्या  टी शर्ट वर "USA 94" हे स्पर्धा वर्ष आणि देशाचं नांव ही आहेच.
त्यानंतर आला १९९८ चा वर्ल्ड कप. हा होणार होता फ्रान्स मधे. या वर्ल्ड कप चा मॅस्कॉट होता फुटिक्स. त्यावर्षीच्या यजमान फ्रान्स यांच्या निळ्या रंगा सारखाच संपुर्ण शरीर असलेला कोंबडा म्हणजेच फुटीक्स. याच्याही छातीवर "FRANCE 98" असे शब्द होते.आणि त्या वर्ल्ड कप चे ऑफिशियल गाणे होते रिकी मार्टीनचे "द कप ऑफ लाईफ". या गाण्याने रिकी मार्टीन घराघरात पोहचला. गाण्यात तीच खेळभावना आपल्याला दिसुन येते आणि कुठल्याही देशाच्या खेळाडूचे मनोधैर्य वाढवण्याचे काम अशी गाणी करतात.

The cup of life, this is the one.
Now is the time, don't ever stop
Push it along, gotta be strong.
Push it along, right to the top

या ओळी बरेच काही सांगुन जातात म्हणुनच म्हणावेस वाटते... गो, गो, गो, आले आले आले....





मधल्या दोन वर्ल्ड कपची ऑफिशियल गाणे म्हणजेच २००२ च्या कोरिया-जापान वर्ल्ड कपचे अ‍ॅनॅस्टिशिया या पॉप गायिकेचे "बुम" आणि जर्मनीत २००६ साली झालेल्या वर्ल्ड कपचे "टाईम ऑफ आवर लाईफ" हे मला कधीच तितकेसे भावले नाहीत.. पण या वेळेसचा वर्ल्डकपचा काउंटडाउन सुरु झाला आणि ई एस पी एन वर "वेविंग फ्लॅग्स" लागायला सुरवात झाली. या गाण्याने मनात वर्ल्ड कपची उत्सुकता पुन्हा एकदा नव्याने भरास आली. हे गाणे फिफाचे ऑफिशियल गाणे नाही हे कळाल्यावर दु:खही झाले. या गाण्याबद्दल इतक्या वेळा लिहिलं गेले आहे त्यामुळे पुनरूच्चार टाळतोय.


आफ्रिकेत होणार्‍या या वर्ल्डकपचा मॅस्कॉट आहे झकुमी नावाचा एक चीत्ता. याचे केस हिरवे आहेत आणि त्याने घातलेल्या टिशर्ट वर "SOUTH AFRICA 2010" लिहिलेले आहे. त्याचा असलेला हिरवा आणि पिवळा रंग हे साऊथ आफ्रिकेच्या राष्ट्रिय संघाच्या पोषाखा सारखेच आहेत.
आता जाता जाता या वेळेसच्या ऑफिशिअल गाणे आहे "वाका वाका" शकिराने गायलेल्या गाण्यात "वेविंग फ्लॅग्स" ची जादु नसली तरी हे गाणे सुद्धा चांगलेच आहे. "धीस टाईम फॉर आफ्रिका" असा संदेश देणारे गाणे नक्कीच आवडण्या सारखे आहेच.




This time for Africa असेच म्हणत आता किक- ऑफ ची वाट पाहयची आहेच. तो पर्यंत ही व इतर काही गाणी एकत बसायचा विचार आहेच.



गुरुवार, जून १०, २०१०

साखरेचं खाणार!!!

"साखरेचं खाणार त्याला देव देणार", हे अस्मादिकांच्या बाबतीत एकदम खरं ठरतं.किंवा इंग्रजीत शुगरटूथ की का काय म्हणतात तोच घेऊन जन्माला आलो म्हणा ना!!! गोड पदार्थ म्हणजे आपला एकदम जीव की प्राण. अगदी लहानपणी मला आजी, आई सगळेजण गोडघाशा म्हणूनच हाक म्हणायचे. म्हणजे माझे गोडाचे वेड इतके होते की कधी कधी आई झोपल्यावर हळूच डबा काढून चोरुन साखर खायचो. बरेच वेळा पकडलाही जायचो.(अजूनही खातोच.. पण आता पकडला जात नाही. ;)) त्या साठी अगदी आईच्या हातचे धपाटे पण अनेक वेळा खाल्लेत. आता जर मला कोणी विचारले "तुझा आवडता गोड पदार्थ कुठला?" तर उडुप्याच्या हॉटेलातल्या पोर्‍यासारखी लांबलचक यादी म्हणून दाखवेन!!!!!

आमच्या गोड खाद्ययात्रेची सुरवात झाली जालन्यापासुन. आमचे घर अगदी भर चौकातच होते. घराचा खालीच एक हॉटेल होते. तिकडे रोज सकाळी खवा पोहचवायला दुधवाले यायचे. यातल्या दुधवाल्यांकडुन आई खवा विकत घ्यायची. मग व्हायचा तो गुलाबजामुन बनवायचा एक राजेशाही कार्यक्रम. गुलाबजामुन मी कितीही आणि केव्हाही खाऊ शकतो. एक मात्र खरं, आईच्या हातच्या गुलाबजामुनची चव कधी बाजारातल्या गुलाबजामुनला कधीच नाही येणार. आमच्या घराखालच्या हॉटेलाची आणखी एक खासियत म्हणजे बालुशाही. अप्रतिम अशी बालुशाही इथे मिळायची. माझ्या मुंजीच्या वेळेससुद्धा इथल्याच आचार्‍याकडुन बालुशाही बनवुन घेतलेली.

जालन्यातली अजुन एक आठवण म्हणजे आजीच्या हातच्या पाकातल्या पुर्‍या. आहाहा!!! आतापण त्या पुर्‍यांची चव जीभेवर रेंगाळतेय. आजी अनारसे पण मस्त करायची. एकदा आमच्या ओळखीच्या जोशी काकूंकडे गेलो होतो. त्या खाली जमिनीवर बसून स्टोव्ह समोर ठेऊन अनारसे करत होत्या. त्याचा दुसर्‍याच दिवशी आईच्या मागे लागुन अनारसे बनवायला लावले. माझ्या हट्टापायी आईने अनारसे बनवले. पण मी ते खायला तयार नव्हतो. कारण काय तर आईने जोशीकाकूंसारखे खाली बसून अनारसे नव्हते बनवले. :D तसं जालन्याला मला बाहेरचे गोड खाल्याचं आठवत नाही.

बाबांच्या होणार्‍या सततच्या बदलीमुळे अमरावती-नागपुर्-अमरावती असा प्रवास घडलाच. त्यामुळे जिथे जिथे राहिलो, तिथं कुठे काय छान गोड मिळतं, याची एक जंत्रीच आहे म्हणा ना माझ्याकडे. जसं अमरावतीच्या रघुवीर मिठाईयाँ मधली काजुकतली तर अप्रतिमच होती. नागपुर मधे खाल्लेली हल्दीरामच्या सोनकेकची चव अजून आठवते. त्यावेळेस हल्दीराम अमेरिकेत पोहचले नव्हते. चिखलदर्‍या जवळ मेळघाट मधे सेमाडोह येथे जी रबडी खाल्ली तशी रबडी आजगायत नाही खाल्ली हो!! त्यानंतर औरंगाबाद मधे मिलन मिठाई मधली बर्फी किंवा अप्पा हालवाईचा पेढा जबरदस्त होता. उत्तममधल्या सारखी इमरती तर कुठेच मिळत नाही. आजही औरंगाबाद ला गेल्यावर बरेच वेळा उत्तममध्ये जाऊन इमरती घेऊन येतो.

पेढ्यावरुन आठवतो तर कुंथलगिरीचा प्रसिद्ध पेढा. हो हो.. तोच तो. अनासपुर्‍यांच्या मक्याने प्रसिद्ध केलेला.. (च्यायला, याच्या नावांत पण पुर्‍या याव्यात का?) कुंथलगिरी बीड जिल्ह्यातले एक छोटेसे गाव. पण तिथला कलमी पेढा म्हणजे काय विचारुच नका. ह्या गावावरुन कुठेतरी एकदा गेल्याचे आठवते. हायवेच्या दोन्ही बाजुला फक्त खव्याची व चक्क्याचीच दुकानं. हे कुथंलगिरीचे प्रसिद्ध पेढे खुलताबादच्या भद्रा मारूती मंदिरातसुद्धा जाऊन पोचलेत. भद्राला गेलो आणि पेढे आणले नाहीत असे कधीच झाले नाही. पेढ्याची आणखी एक आठवण म्हणजे आंबाजोगाईतील योगेश्वरी देवीच्या मंदिराबाहेरील कलमी पेढे. घरात पेढे आणलेले असले तर आईच्या हातात यायचा तो रिकामा डब्बाच.

गोड म्हटले की काय बोलू नि काय नको असे होऊन जाते बघा..हेच पहा ना, सगळं लिहिलं, पण माझ्या सगळ्यात आवडत्या पदार्थांबद्दल कुठे काय बोललो? तर, सगळ्यात महत्त्वाचे दोन गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी आणि श्रीखंड. आमच्या घरात सगळेच पुरणपोळीचे शौकिन. घरी पुरणपोळी वर्षातुन कितीही वेळा बनवली तरी नेहमी आईला त्रास द्यायला मी म्हणणार, "पुरणपोळी खाऊन खुप वर्ष झाली ग आई". नि मग तिने पटकन पोळ्या बनवायला घ्याव्यात हे पण आलेच. :) होळी, श्रावणातला शुक्रवार, नवरात्रात नवमीला, पुरणपोळी बनतेच बनते पण सर्वात वेगळ्या चवीची बनते ती फक्त महालक्ष्मीच्या (गौरीच्या) नैवेद्याची!!! आमच्याकडे नेहमी स्पर्धा लागते कोण सगळ्यात जास्त पुरणपोळी खाते याचीची. जिंकतो अर्थात मीच. पण ती तव्यावरुन गरम सरळ पानात वाढलेली त्यावर मस्त तुपाची धार सोडलेली पुरणपोळी मी कोणत्याही वेळेस खाऊ शकतो. तशीच शिळी झालेली पुरण पोळी पण मी कितीही पोट भरलेले असेल तरी खाऊ शकतो.

श्रीखंड मला आवडते ते चक्क्यापासुन घरी बनवलेले. काही ठराविक दिवशी श्रीखंड बनलेच पाहिजे असा अलिखित नियमच आहे म्हणा ना!!! मग माझ्याकडे यातली दोन कामं येतात. एक म्हणजे औरंगाबाद्ला भावे आणि कं कडुन चक्का घेउन येणे आणि दुसरे म्हणजे चक्का पुरण यंत्रातुन काढुन देणे. साखरभात हाही माझ्या आवडत्या पदार्थापैकी एक आहे.

काही विचित्र पदार्थ सुद्धा मी गोड खायची इछा झाल्यावर खातो. दाण्याचं कुट-साखर ही त्यातलीच एक. कधी गोड खायची इच्छा झाली व काहीच सापडत नसेल तर सरळ वाटीत शेंगदाण्याचं कुट घ्यायचं, त्यात थोडी पिठी साखर टाकायची किंवा साधी साखर टाकायची झाली, की आमची स्वीट डिश तयार. याच प्रकारचा शेंगदाण्याचा लाडु, साबुदाण्याचे लाडु असं काहीही कधीही मला चालतं. एक गडगिळ नावाचा पदार्थ आहे, त्याची पाककॄती मला माहित नाही, पण गुळ आणि कणिक ह्या पासुन बनवतात असे वाटते. आजीच्या हातचा खाल्लेला तो पदार्थ आजही आठवतो. तसं म्हणायचे तर फक्त खीर हा प्रकार मला फारसा काही आवडला नाही. आता बंगाली मिठाई वगैरे खातो पण ती सुद्धा फारशी आवडत नाही.

अरे ह्या सगळ्यात आईच्या हातचा कलाकंद राहिलाच. दुध नासले की मी नाचायचो आता कलाकंद मिळणार म्हणुन. तसेच फक्की हा प्रकार म्हणजे तर विचारु नका. शाळेत असताना डब्ब्यात फक्की कितीदा नेली असेल सांगता येत नाही.
पाहिलंत, नुसतं गोड गोड म्हणेपर्यंत इतके विचार डोक्यात आले.. अजून लिहायला बसलो तर आणखी खूप होईल. पण मग तोवर समोर चितळ्यांची आंबा बर्फी बिचारी टुकूटुकू माझी वाट पाहातेय त्याचे काय?? आलोच जरा तिचा 'समाचार' घेऊन!!!

सोमवार, जून ०७, २०१०

(बिलंदरी)

कधीतरी केलेले हे विडंबन ब्लॉगावर टाकायचे राहुनच गेले होते. तेच आज ईथे टाकत आहे.

खर तर हा आमचा विडंबनाचा पहिलाच प्रयत्न. गप्पाटप्पा सदरात घालण्याचे कारण म्हणजे एक विरंगुळा म्हणुन ह्याकडे पहावे एवढाच उद्देश.

हे विडंबन एका बिलंदरीची माफी मागुन...

प्रेरणा

जालाच्या ह्या विणीवरची
ती बिलंदरी नवखी होती
ती तशी विस्मरणीय
"ईद का चाँद" होती

तीच्या ओठांवरती
बडबड पोकळ होती
अपशब्दांची तर ती
सरस्वातीच होती

न शिजलेला भात
पोळी चिवट होती
तिच्या स्वयंपाकाची ती
तर्‍हा न्यारीच होती.

शनिवार, जून ०५, २०१०

बुलेवार्ड ऑफ ब्रोकन ड्रिम्स....

ट्रिगरः अर्थातच.. मकीने लिहिलेलं चाँद तनहा!!!

रोज ऑफीसमध्ये होणारा तोच तो उशीर. सकाळी ९ ते रात्री ११ पर्यंत मरमर करायची.. त्यानंतर माजिवाड्याला उतरून पुन्हा घरी जायचं अगदी जीवावर येतं.. एकदा का घराकडच्या रस्त्यावर वळलं की रहदारी तशी तुरळकच. कधी कधी तर साथ द्यायला कुत्रंही नसते.. रस्ता मस्त शांत असतो.. मधूनच गार हवेची झुळूक शरीराला गारवा देऊन जाते.. खरेतर हा रस्ता चालण्याचा खूप कंटाळा आलेला असतो.. दिवसभराचा शीण तर असतोच, त्यात कुणाला फोन करावा अशी वेळ पण नसते. अशा वेळेला कंटाळलेल्या जीवाला सोबत एकच.... आवडती गाणी!!!


[चित्र जालावरून साभार!!]

तसे गाण्यातले मला कळतेच असे काही नाहीए, पण काही गाणी मनात घर करुन जातात. त्याला भाषा, संगीताचा प्रकार यांचे काही बंधन नसते. आणि हो, त्यासाठी गाणे "यमनातलेच" पाहिजे असाही काही नियम नाही. त्याच रात्रीच्या एकटेपणात काही गाणी पुन्हापुन्हा ऐकावीशी वाटतात. त्यातलेच हे एक: "बुलेवार्ड ऑफ ब्रोकन ड्रिम्स"!!! पहिल्यांदाच हे गाणं कधी ऐकलं ते आठवत नाही.. पण जेव्हा ऐकलं, तेव्हापासून माझ्या मोबाईलमध्ये नेहमीच राह्यलंय. काही खास वेळेला सर्व मित्र एकत्र बसून रात्र जागवताना या गाण्याचा कमीतकमी दोन-चार वेळेला तरी उल्लेख झालाच पाहिजे असा अलिखित नियमच झालाय.


My shadow's the only one that walks beside me
My shallow heart's the only thing that's beating
Sometimes I wish someone out there will find me
'Til then I walk alone

हे गाणं एकटेपणावर तर आहेच आणि एकटेपणाच्या भीतीबद्दलही आहे. आपली स्पदनं हीच एकमेव जिवंतपणाची खूण आणि तिला फक्त सावलीचीच सोबत असणं यापरतं एकटेपण ते काय असेल? पण सुदैवाने तो निराशावादी नाही.. त्याला असेच कुढत, कण्हत जगायचं नाहीय.. आणि म्हणूनच तो त्याच्यासाठी "चलते चलते.. यूँही कोई" भेटण्याची वाट पाहात आहे...


[धोक्याचा इशारा: प्रस्तुत गाणे रॉक या प्रकारात मोडते. तेव्हा ते स्वत:च्या जबाबदारीवर ऐकावे व पाहावे.. नंतर हा का केकाटत होता अशा प्रतिसादांना विवक्षित ठिकाणी मारले जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. ;) ]





"Boulevard Of Broken Dreams"

I walk a lonely road
The only one that I have ever known
Don't know where it goes
But it's home to me and I walk alone

I walk this empty street
On the Boulevard of Broken Dreams
Where the city sleeps
and I'm the only one and I walk alone

I walk alone
I walk alone

I walk alone
I walk a...

My shadow's the only one that walks beside me
My shallow heart's the only thing that's beating
Sometimes I wish someone out there will find me
'Til then I walk alone

Ah-ah, Ah-ah, Ah-ah, Aaah-ah,
Ah-ah, Ah-ah, Ah-ah

I'm walking down the line
That divides me somewhere in my mind
On the border line
Of the edge and where I walk alone

Read between the lines
What's f**ked up and everything's alright
Check my vital signs
To know I'm still alive and I walk alone

I walk alone
I walk alone

I walk alone
I walk a...

My shadow's the only one that walks beside me
My shallow heart's the only thing that's beating
Sometimes I wish someone out there will find me
'Til then I walk alone

Ah-ah, Ah-ah, Ah-ah, Aaah-ah
Ah-ah, Ah-ah

I walk alone
I walk a...

I walk this empty street
On the Boulevard of Broken Dreams
Where the city sleeps
And I'm the only one and I walk a...

My shadow's the only one that walks beside me
My shallow heart's the only thing that's beating
Sometimes I wish someone out there will find me
'Til then I walk alone...

गाणं जितक्या वेळा ऐकावं, तितक्या वेळा ते नव्यानेच भेटतं.. एक नवीन अर्थ सांगून जाते.. नि प्रत्येक नवा अर्थ पटतोच पटतो.. पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा ते एका मनातून खचलेल्या व्यक्तीचं वाटलं.. पुन्हा ऐकलं, तर ते "मी आहे असाच एकटा एकटाच राहणारा.. सर्वांत असूनही नसल्यासारखाच असणारा" अशा विचारांच्या मनस्वी माणसाचं वाटतं!! कधी ते प्रेमभंग झालेल्या माणसाचं वाटतं तर कधी वाटतं, त्याला त्याचं ध्येय कुठं आहे ते गवसलंय.. आणि त्याला आयुष्याच्या वाटेवर त्या ध्येयापर्यंत चालायचंय.. आणि वाटेवरती कुणाची तरी विश्वासाची, प्रेमाची सोबत मिळावी हे तर आहेच!!!!

अधिक काय बोलू??? ऐका.... आणि एंजॉय करा!!!

शुक्रवार, जून ०४, २०१०

झाडाझडती


पुस्तक: झाडाझडती

लेखक:पाटील विश्वास

किंमत: 275.00

प्रकाशक: राजहंस प्रकाशन प्रा.लि.

पृष्ठसंख्या: 480



आज वर विश्वास पाटलांची महानायक, संभाजी अशी पुस्तक वाचली होती. झाडाझडती वाचायचे खुप दिवसांपासुन मनात होते. शेवटी गेल्या आठवड्यात वाचुन पुर्ण झाले. पुस्तक येउन इतके दिवस झालेत, तसेच इतके पुरस्कार मिळवलेत, तर अशा पुस्तकाचा परिचय आपण काय लिहायचा? हा प्रश्न मनात आलाच. तरीही जे सुचेल ते येथे देत आहे. झाडाझडती ही कथा आहे महाराष्ट्रातल्या धरणाची. धरणामुळे भरडल्या गेलेल्या ग्रामीण भागातील समाजाचे सुन्न करणारे वर्णन या कादंबरीत आहे.

या कादंबरीच्या मलपृष्ठावर दिलेले पुढचे वाक्य पुस्तकाबद्दल बरेच काही सांगुन जाते. तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भीका मागायच्या. जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच.

पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या मधे असणारा आंबेगाव जिल्हा. तिथल्या वाघाठाणे तालुक्याची भौगोलीक परिस्थीती तशी विचित्रच. तालुकाच्या पश्चिमेला सह्याद्रिच्या डोंगररांगा. तिथे धो धो पाउस कोसळणार तर पुर्वेचा भाग दुष्काळी. तर अशा तालुक्यातली जांभळी धरणामुळे विस्थापित होणार्‍या धरणग्रस्तांची ही कथा. पण याला फक्त याच धरणग्रस्तांची कथा म्हणता येणार नाही, कमी अधिक प्रमाणात सगळीकडे हीच परिस्थीती आहे. असे असतानाही लेखकाला जिल्ह्याचे नाव काल्पनिक का घ्यावे लागते??? परदेशात डॅन ब्राउन सारख्या लेखकांचे वास्तव आणि कल्पकता यांची यशस्वी सरमिसळ करण्याचे उदाहरण आपल्या समोर आहेच. मग आपल्याकडे काल्पनिक जिल्हा का??? या साठी कोण जबाबदार?? आपल्याकडील शासन व्यवस्था?? राजकारणी का आपण वाचक लोक???

कथेमधे अनेक पात्रे आहेत... त्याचा आवाका सुद्धा खुप मोठा आहे. पण कथेतले पात्रे ही मुख्यत्वे जांभळी व आजुबाजुच्या गावात राहणारी. धरण होणार म्हणजेच जांभळई गाव बुडणार. हे गावातल्या सर्वांना माहीत असतेच. पुस्तकाला ठराविक काळ असा नाहीए पण धरणग्रस्तांच्या आयुष्याची व्यथा मांडलेली आहे. कथेची सुरवातच मुळी आंबेगावच्या आमदारांचे उपोषण आणि धरणाला विरोध करणार्‍या जांभळीच्या ग्रामस्थांना अटकेपासुन होते. कथेतले खैरमोडे गुरुजी, हैबती, त्याची आई आवडाबाई, गुणवंता, कुशाराजा असे अनेक पात्र मनात घर करुन जातात. या प्रत्येकाच्या आयुष्यात मुख्य प्रश्न धरणामुळे विस्थापन असले तरी प्रत्येकाला सोसाव्या लागणार्‍या गोष्टी नक्कीच वेगळ्या आहेत.

हैबती धरणग्रस्त म्हणुन याला नोकरी द्यायचे खासदार जाहीर करतात. त्यानुसार तो शिपाई म्हणुन त्याला नोकरी मिळतेसुद्धा. पण आपल्या भ्रष्ट व्यवस्थेतील लोक त्याचे नोकरीचे १८१ दिवस पुर्ण न होता त्याला ब्रेक देतात. जांभळी गावाचे पुर्नवसन ठरल्यानंतर याचे आणि याच्या कुटुंबाचे होणारे हाल... बायकोचे दिवस भरत आलेले असतात. गावठाणसाठी मिळालेल्या जमीनी वर झोपडे बांधुन राहणे पावसामुळे शक्य नसतेच. खैरापुर-ज्या गावात पुर्नवसन होणार असते तिथल्या लोकांचे वागणे आपल्याला नक्कीच सुन्न करुन जाते. हैबतीला मिळालेले बाभळीचे रान... त्यातुन त्याने फुलवलेला सुंदर मळा... त्यावर परत मुळ जमीनीच्या मालकाची पोटदुखी... त्याच्यामागचे दुष्टचक्र काही केल्या संपू देत नाहीच. अशा सगळ्या प्रवासात गावकर्‍यांना आधार असतो तो खैरमोडे मास्तरांचा!!!!

खैरमोडे मास्तर जांभळी गावातल्या शाळेतले शिक्षक आणि शिक्षकाच्या सोबतच जांभळी धरणग्रस्तांचा मुख्य आधार. धरणग्रस्तांचा नेता म्हणजे आजच्या काळातल्या राजकीय नेत्यांसारखा नक्कीच नाही तर गरज पडल्यास स्वतःच्या खिशाला खार लावुन गावकर्‍यांसाठी झटणारा. धरणग्रस्तांना योग्य तो मोबदला मिळावा, त्यांचे योग्य ठिकाणी पुर्नवसन व्हावे या साठी सरकार दरबारी खेट्या मारणारे मास्तरच. धरणग्रस्तांसाठी आपली नोकरी पणाला लावणारे मास्तर. नवीन जांभळी गावात स्मशानाला जागा मिळावी म्हणुन झटणारे मास्तर. हे पात्र अगदी डोक्यात फिट्ट बसते.

या सगळ्यात आपल्या इथल्या भ्रष्ट व्य्वस्थेचा फायदा घेणारे आणि आपल्याच इतर गावकर्‍यांचा पोटावर पाय देउन उभे राहणारे पात्र म्हणजेच दत्तु सरपंच, जांभळीचा सरपंचच मुळी हा मास्तरांचा आधाराने होतो पण पुढे पलटतो. आपल्या गावकर्‍यांचा विचार न करता जास्तीत जास्त स्वत:चा फायदा करुन घेत जातो. त्याच सोबत खासदार, त्यांचा मुलगा काही भ्रष्ट अधिकारी अशी एकापेक्षा एक पात्रांची रांगच आहे. जे वेळोवेळी केवळ स्वत:च्या स्वार्थापायी धरणग्रस्तांचे हाल वाढवत जातात. आजही आपली व्यवस्था भ्रष्ट नोकरदार, राजकारणी आणि त्यांना साथ देणारे नागरीक ह्यांनी अशीच पोखरुन काढलेली आहेच. पण अशा परिस्थितीला अपवाद असतातच. तसाच या ही कथेत चांगल्या जिल्हाधिकार्‍यांचे उदाहरण आहेच. यांचा काळातच धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागतील अशी आशा वाटतच असते. एखाद्या जिल्हाधिकार्‍याने राजकारण्यांना अडचणीची होणारे कामे असणारी मोहीम हाती घेतल्यानंतर सग़ळे राजकीय पक्ष संगनमताने त्याची उचलबांगडी करतात तेच ईथे सुद्धा होते..

या कादंबरी मधले काही प्रसंग मनाला फारच चटका लाऊन जातात. त्यातलाच एक म्हणजे सोपान मामाच्या मृत्यूनंतरचा प्रसंग. सोपानमामाच्या इच्छेनुसार त्याच्या शेवटच्या क्रिया झांजवाडीत व्हावयाच्या असतात. झांजवाडी हे धरणाच्या मधे येणारे गाव. त्यात गावापर्यंत जायचा एकच सोपा मार्ग म्हणजे धरणावर लाँच घेउन जाणे. नाहीतर मग धरणाच्या बाजुबाजूने १० कोस अतंर चालत जाणे. सोपान मामाचा मृतदेह तिथे पर्यंत नेताना होणारा त्रास... तरीही एकमेकांच्या मदतीला उभे राहणारे धरणग्रस्त... हे पाहून अंगावर खरेच काटा येतो.

या पुस्तकात कथानक घडते ते पुर्णतः ग्रामीण भागातच. त्यामुळे तसे संपुर्ण पुस्तकात ग्रामीण भाषाच वापरलेली आहे. मुळात लेखक हे स्वतः चांदोली धरण भागातले. त्यामुळे त्यांनी ग्रामीण भाषेचा बाज योग्यरीत्या सांभाळणे यात फारसे आश्चर्य नाहीच. यात त्यांना स्वतःला आलेले अनुभव सुद्धा त्यांनी मांडले असतीलच. खरेतर त्यांना तुम्हाला हे पात्रे कुठे भेटलीत का? असे विचारावे वाटते. त्याशिवाय विश्वास पाटील स्वतः प्रशासकीय सेवेत आहेत. त्यादरम्यानच्या काही अनुभवांचे येथे चित्रण झाल्याचे जाणवते. त्यांनी स्वतः जिल्हाधिकारी म्हणुन काम केलेले आहे. असे असतानाही त्यांनी आपल्या व्यवस्थेत असलेला भ्रष्टाचार लपवलेला नाही किंवा नोकरदारांच्या वागण्याचे कुठे समर्थन केलेले नाही. त्याचसोबत काही चांगले अधिकारी परिस्थिती कशी बदलु शकतात याचे उदाहरणही ते आपल्याला दाखवतातच. धरणग्रस्तांचे होणारे हाल वाचकाला पुस्तकाशी बांधुन ठेवतात त्याच वेळेस त्याच्या समोर अनेक प्रश्न सुद्धा निर्माण करुन जातात. हा धरणग्रस्तांना एवढे सोसण्याची ताकद कुठुन मिळत असेल?? एकीकडे आपण वर्ल्ड ईज फ्लॅट असे ओरडत आहोत त्याच वेळेस ही परिस्थिती अजुनही बदललेली नाहीए. ३०-४० वर्षापुर्वी झालेल्या धरणांच्यासाठी जमीनी दिलेली लोकांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत. समाजात खैरमोडेगुरुजी सारखे किती लोक असतात?? ह्या सगळ्यात आपण कुठे आहोत?? एकुणच इतकी वास्तवाचे दर्शन देणारी कादंबरी प्रत्येकाने एकदा वाचावेच असे वाटते.

गुरुवार, जून ०३, २०१०

स्टे हंग्री स्टे फूलिश्...


 

पुस्तक :Stay Hungry Stay Foolish 

लेखक:Rashmi Bansal 

किंमत:  125.00 

प्रकाशक: CIIE

 


 "Stay Hungry Stay foolish" ह्या ओळी पहिल्यांदा ऐकल्या त्या अ‍ॅपलचे प्रमुख स्टिव जॉब्स ह्यांनी स्टॅनफॉर्ड युनिव्हर्सिटीत केलेल्या भाषणात. ह्याचा अर्थ सांगायचा माझा प्रयत्न नाहिए पण याच नावाचे एक पुस्तक मध्यंतरी वाचले त्याबद्दल आज ईथे सांगणार आहे. हे पुस्तक रश्मी बन्सल ह्यांनी लिहिलेले आहे. रश्मी ह्या स्वतः आय. आय. एम, अहमदाबादच्या माझी विद्यार्थिनी आहेत तसेच त्या JAM ह्या मासिकाच्या संपादिका आहेत. ह्या पुस्तकाच्या आतापर्यंत एक लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. तर ह्या पुस्तकात काय आहे खरे??
आय आय एम अहमदाबद मधुन एम. बी. ए. चे शिक्षण घेउन ज्यांनी उद्योजकतेचा मार्ग निवडला अशा २५ उद्योजकांची कहाणी आहे हे पुस्तक. ह्या पुस्तकातील लेखन प्रकार हा संभाषण स्वरुपाचा आहे. ह्यात आधी लेखिकेने प्रत्येक उद्योजका बद्दल थोडी माहिती नंतर त्या उद्योजकासोबत झालेला संवाद आणि त्यानंतर ह्या उद्योजकांकडुन इतरांना काही सल्ला. हे पुस्तक तीन विभागात विभागले गेले आहे:

१) The Believer:- या भागात अशा काही व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यांनी आय आय एम मधुन बाहेर पडताच उद्योगाचा क्षेत्रात उडी घेतली. यात संजीव भिकचंदानी (नोकरी.कॉम), शंतनु प्रकाश (एड्युकॉम्प),अशंक देसाई (मास्टेक)ईत्यादी लोकांचा समावेश केलेला आहे.
२)The Opportunists: या भागात आयुष्यात आलेल्या संधीचे सोने केलेल्या काही व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे. यात दिप कालरा (मेक माय ट्रिप्.कॉम), रशेश शहा (Edelweiss Capital), निर्मल जैन (इंडिया ईन्फोलाईन) येतात.
३) People having alternate vision: या भागात अशा काही व्यक्तींचा समावेश केला आहे ज्यांनी उद्योजकतेच्या आधारे समाजात काही बदल करायचा प्रयत्न केला, ज्यांनी पैशापेक्षा समाजाला जास्त महत्व दिले. यातली काही नावे म्हणजे वर्दन काबरा (फाउन्टन्हेड स्कुल) आणि वेंकट क्रिश्नन (गिव्ह इंडिया).

या पुस्तकातल्या काही लोकांबद्दल सांगायचे झाले तर सगळ्यात आधी मला ही कहाणी आठवते. ही कथा आहे एका उद्योजकाची, ज्याने एम.एन.सी. मधे नोकरी स्वीकारण्या ऐवजी आपल्या गावी साखर कारखाना उभा केला. हे करण्याआधी त्यांची असलेली बायोपेस्टीसाईडची कंपनी बंद केली, त्याचे कारण त्या कंपनीचा असलेला फक्त ५ करोड हा टर्न ओव्हर. त्यानंतर त्यांनी सुरु केलेली नवी कंपनी म्हणजेच श्री रेणुका शुगर्स. आज या कंपनीचा टर्नओव्हर काही शे करोड मधे नक्कीच आहे.

अजुन एक कथा आहे ती आर. सुब्रमनियन यांची. आय.आय.टी. मद्रास मधुन इंजिनियरिंग पुर्ण केल्यानंतर त्यांनी आय आय एम अहमदाबाद मधे प्रवेश घेतला. तिथुन बाहेर पडत असतानाच त्यांना सिटीबँन्क मधे नोकरी मिळालेली असते. पण त्यांच्यामधली चांगले काही करायची इच्छा त्यांना शांत बसु देत नाही. आणि त्याच चांगले काही करण्याचा इच्छेमुळे पुढे "सुभिक्षा" या रिटेल चेन ची सुरवात झाली. अर्थात या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीत त्यांचे नाव येईल का नाही ते पण पहावे लागेलच.

या पुस्तकात या उद्योजकांनी भावी उद्योजकांना दिलेले सल्ले सुद्धा चांगले आहे. एकुणच ज्यांचा मनात स्वत:चे काही करायचे स्वप्न आहे अशा लोकांनी हे पुस्तक नक्कीच वाचावे. या पुस्तकात मला मुख्यत्वे दोन बाबी खटकल्या: सर्व प्रथम लेखिकेची भाषेची निवड. प्रत्येक दोन चार वाक्यामागे एक हिंदी वाक्य टाकण्यात आलेले आहे. त्यामुळे वाचणार्‍याचा विरस नक्कीच होतो. अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या पुस्तकातले सगळेच उद्योजक हे आय.आय.एम. अहमदाबद या खुप मोठ्या दुव्याने बांधलेले आहेत. या लोकांकडे आधीच आय.आय.एम. सारखा ब्रॅण्ड होता. त्यांचा ओळखी होत्या. त्यामुळे त्यांना अडचणीमधे मदत मिळवणे जास्त सोपे होते असे वाटते. उलटपक्षी जर एखादा सामान्य माणुस साधारण शिक्षण असलेला जेव्हा यशस्वी होतो त्याची कथा वाचणे जास्त स्फूर्तीदायक असते असे माझे मत आहे. असे असले तरी स्टे हंगरी स्टे फुलिश मला वाचायला आवडले..

मंगळवार, मे १८, २०१०

हाऊ स्टारबक्स सेव्ह्ड माय लाईफ

पुस्तक:How Starbucks Saved My life 

Michael Gill

भाषा: इंग्रजी 

आवृत्ती: First 

किंमत: 195.00 

प्रकाशक: Harper Collins India 

पृष्ठसंख्या: 265

काही पुस्तक सहज चाळताना वाचावेसे वाटतात अश्याच एका पुस्तक खरेदीत सापडलेले पुस्तक म्हणजे "How Startbucks Saved My Life:: A Son of Privilege Learns to Live Like Everyone Else” मायकल गेट्स गील ह्यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे त्यांचा एका मोठ्या जाहीरात कंपनीतले उच्चपदस्थ अधिकारी ते स्टारबक्स मध्ये कॉफी सर्व करणारे बरिस्ता ह्या प्रवासाचा लेखाजोखा आहे. आज मायकल हे अभिमानाने, आनंदाने स्टारबक्स मध्ये बरिस्ता म्हणून काम करतात.
मायकल हे न्युयोर्कर मध्ये लिहिणार्‍या प्रसिद्ध लेखक Brendan Gil ह्यांचे चिरंजीव ह्या कारणाने खरे तर त्यांना आयुष्याचा सुरवातीपासूनच सर्व सुखसोयी उपलब्ध होत्याच. पुढे येल मधून शिक्षण अर्धवट सोडल्या नंतर ते एका जाहीरात कंपनीत नोकरी सुरू करतात. साधारण पंचवीस वर्षाच्या त्यांचा करियर मध्ये ते यशाच्या एक एक पायर्‍या चढत सध्या क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून सहा आकडी पगार मिळवत असतात. पण कंपनीत तरुण रक्ताचे वारे वाहायला लागतात आणि त्यातच एका दिवशी मायकल ह्यांना कंपनीतून काढून टाकल्या जाते. ह्याच काळात त्यांचा विवाहबाह्य संबंधातून त्यांना एक मूल होते आणि ह्याच कारणास्तव त्यांचा बायकोशी घटस्पोट होतो व त्यांचा वीस वर्षापासून असलेला परिवार त्यांचा पासून दुरावतो. ह्याच काळात त्यांना ब्रेन ट्युमर असल्याचेही आढळते. अश्या प्रकारे आयुष्याचा उतरत्या काळात मायकल ह्यांचा कडे ना पैसा असतो ना त्यांचा कडे आरोग्य विमा असतो त्यात त्याच्यांवर त्यांचा गर्लफ्रेंड कडूनं झालेल्या लहान मुलीला सांभाळायची जवाबदारी असते.
काही दिवस छोटे मोठे काम केल्यानंतर तसेच जाहीरात एजन्सी मध्ये परत जायचे प्रयत्न केल्या नंतर अश्याच एका थकलेल्या दिवशी लेखक स्टारबक्स मध्ये बसून कॉफीपीत असतो. त्याच वेळेस तिथे एक २७-२८ वर्षाची एक आफ्रिकन-अमेरिकन मुलगी येऊन त्याला जॉब हवा आहे का विचारते. त्या मुलीचे नाव क्रिस्टल असते आणि ती स्टारबक्सची मॅनेजर असते. गील त्या परिस्थितीत तो जॉब स्वीकारतो आणि स्टारबक्स मध्ये सूट घालून कॉफी पिणारा माणूस हिरवा ऍप्रॉन घालून बरिस्ता म्हणून कॉफी सर्व करायला लागतो. पण हा जॉब मायकल गील साठी नक्कीच सोपा नाहीए... कारण त्याला इथे फरशी पुसण्यापासून ते कॉफी बनवण्या पर्यंत अनेक कामं शिकावे लागतात. ह्या स्टोअर मध्ये कामाला लागल्यावर गील ला आयुष्यात आजवर न अनुभवलेले प्रसंग अनुभवावे लागतात. त्याचा पेक्षा वयाने व शिक्षणाने अर्धे असणारे त्याचे सहकारी त्याचा पेक्षा जास्त चांगले काम करतात हे त्याला कळायला लागते.  ह्या सगळ्या काम करणार्‍या बरिस्तांमधे  हा एकटाच म्हातारा व गोरा असतो इतर सगळे हे तरुण आफ्रिकन अमेरिकन्स असतात. गील ह्यांचे इतर साथी त्यांना नेहमीच आदराने, प्रेमाने वागवत असतात, आणि त्यांतूनच हळू हळू त्याचे पूर्वग्रह गळून पडतात आणि उरतो तो फक्त एक साधा, आनंदी असा गील. गील ह्यांचा मधला हा बदल त्यांचा मुलांना अर्थातच खूप भावतो.
ह्या सगळ्या प्रवासात अजून एक महत्त्वाचे म्हणजे स्टारबक्स कसे चालते. त्याचा काउंटरच्या पलीकडचे जग पण आपल्याला पाहिला मिळते.   तिथे काम कसे चालते??? तिथले बरिस्ताज कोण आहेत??? त्यांचे विश्व काय हे सगळे आपल्याला जवळून अनुभवायला मिळते त्याही पेक्षा पुढे जाऊन एखाद्या  माणसाला त्याचा वर्ण जात धर्म इत्यादींच्या पलीकडे जाऊन मदत केल्यानंतर काय चमत्कार घडू शकतात हे पाहिला मिळते. ह्या पुस्तकात लेखकाची स्टाइल कुठे कुठे कंटाळवाणी वाटू शकते, त्याने आफ्रिकन अमेरिकन सहकार्‍यांसोबत दिलेल्या कामाचे दाखले. त्याला कॉफी करताना काय करावे लागते हे परत परत सांगितले आहे. ह्याशिवाय पुस्तकात  एक जाणवणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखकाने त्याचे पूर्व आयुष्य कसे वैतागवणे होते ह्याचे वर्णन करण्यापेक्षा जास्त भर हा स्टारबक्स मधल्या कामामुळे आणि तिथल्या एकंदरीत वर्क कल्चर मुळे त्याचे आयुष्य कसे सुधारत जाते ह्यावर दिलेला आहे. मायकल गील ह्यांनी लिहिलेले हे पुस्तक सर्वोत्तम नसले तरी वेगळा अनुभव देणारे आहे.

रविवार, मे १६, २०१०

अग्निसमाधीतला योगी

पुस्तक: कृष्णा:अग्निसमाधीतला योगी भांड बाबा 

भाषा:मराठी 

किंमत: 200.00 

प्रकाशक: साकेत प्रकाशन प्रा.लि. पृष्ठसंख्या: 240

 

आजच्या काळात पंचवीस वर्षाचा एक तरुण स्वतः:च्या हाताने चीता रचून अग्नीसमाधी घेतो ही एक आश्चर्याची आणि चमत्कार वाटवा अशी विश्वास न बसणारी घटना आहे. तर ही कथा आहे कृष्णा महाराज भांड ह्यांचा जीवनाची. कृष्णा ह्यांनी ज्ञानेश्वर माउलीच्या संजीवन समाधी पर्वकाळातील कार्तिक वद्य एकादशी, गुरावारी सकाळी त्यांनी त्यांचाच शेतातल्या त्रिगुणी वृक्षा खाली समाधी घेतली. जाण्यापूर्वी त्यांनी तिथेच त्यांचा ५०१ वा "कळसाचा अभंग" लिहून ठेवला होता. सकाळी जेव्हा शेतात त्यांचा गडी पोहचला तेव्हा त्याने पाहिले ते चीता पेटली होती आणि त्यावर कृष्णा महाराज पद्मासनात बसलेले होते. त्यांचा चितेशेजारीच दत्ताच्या फोटो समोर त्यांनी त्यांचा अभंगाच्या सहा वह्या ठेवल्या होत्या. ह्या सहा वह्यात मिळून एकूण ५०१ अभंग लिहिलेले होते.
औरंगाबाद जिल्हातील पैठण तालुक्यातले वडजी गावात कृष्णा ह्यांचा जन्म झाला, लहानपणापासूनच त्यांचा देवधर्माकडे ओढा होताच. त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण झालेले होते. त्यानंतर शेतीच्या कामात घरच्यांना मदत करत असताना त्यांचा देव धर्माकडे ओढा वाढलेलाच होता. साधारण २००४ च्या आसपास संन्यास घ्यायचा म्हणून ते घरातून निघून जातात पण घरच्यांचा प्रेमापोटी संन्यास घेत नाहीत. २००५ च्या आसपास ते चार धाम यात्रा करून येतात आणि त्यानंतर २००६ च्या कार्तिक वद्य एकादशीला ते समाधी घेतात. कृष्णा महाराज यांना कोणताही मानवी गुरू लाभला नव्हता. त्यांनी गावातील तरुणांना भक्तिमार्गाकडे वळवले होते त्यांना व्यसनापासून दूर करण्याचा प्रयत्न केला होता. ह्या सगळ्या गोष्टींमुळे गावात त्यांचे कौतुकही होत असे. त्यांचे अभंग हे साध्या व रसाळ भाषेत जीवन तत्त्वज्ञान सांगून जातात. खरं बोलणे आणि वागणे म्हणजे ईश्वराकडे जाणे. लोभ, अहंकार, राग ह्या शत्रूपासून दूर राहा, गरीबानं लुबाडणाऱ्या ढोंगी साधी-बुवांपासून दूर राहा. कर्मकांडात अडकू नका. श्रम हीच ईश्वरसेवा समजा असा संदेश त्यांनी आपल्या अभंगातून सगळ्यांसाठी दिलेला आहे. सामान्य माणसाचे जगणे आनंददायी व्हावे हे त्यांचा अभंगाचे सूत्र आहे.
ही कथा लिहिली आहे बाबा भांड ह्यांनी. ही कथा लिहितं असताना अनेक धोके संभवत होतेच कारण कथा नायक हा लेखकाचा सख्खा पुतण्या आहे. पण लेखकाने नायकाचे अटी उदात्तीकरण करण्याचे टाळल्याचे जाणवते. त्यांचा लेखनातून काका-पुतणे ह्याच्यात असलेल्या भावनिक नात्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखकाने अग्नीसमाधीच्या बद्दल आपले विचार व्यक्त केलेलेच आहे. "कृष्णाने हे चूक केले " ही त्यांची पहिली प्रतिक्रिया होती. "दहावी नंतर शिक्षण सोडून कृष्ण ह्यांनी शेतीवाडीकडे लक्ष न देता फक्त देव देव करणे" हे लेखकाला आवडले नव्हते असेही ते नमूद करून जातात. हे सगळे वाचत असताना लेखनातला वेगळे पणा निश्चितच जाणवतो. एकूणच एका वेगळ्याच विषयावर असलेला आणि वर्तमानात विश्वास न बसावे असे वास्तव ह्या कादंबरीत उत्तम रित्या मांडलेले आहे.

शनिवार, मे १५, २०१०

कॉलनी

पुस्तक : कॉलनी

पारधे सिद्धार्थ 

किंमत:150.00 

प्रकाशक: लक्ष्मण भागाजी पारधे चॅरिटेबल ट्रस्ट 

पृष्ठसंख्या: 192

 
मागे एकदा टी व्ही वर सिद्धार्थ पारधे ह्यांची मुलाखत पाहिली होती तेव्हा पासून कॉलनी वाचायचे मनात होतेच. मागच्या पुस्तक खरेदीच्या वेळेस हे पुस्तक समोर दिसले... सहज चाळून पाहत होतो तेव्हा मलपृष्ठावर विंदाच्या हस्ताक्षरात लिहिलेले पत्र दिसले. तिथेच त्याच वेळेस हे पुस्तक विकत घ्यायचे ठरवले आणि लगेचच वाचूनही संपवले. ह्या पुस्तकाबद्दल उत्सुकता असण्याचे सगळ्यात महत्त्वाची दोनच कारणे: एक तर मराठीतल्या नावाजलेल्या साहित्यिकांच्या संबंधी असलेले हे पुस्तक आणि त्याच सोबत सचिन तेंडुलकर बद्दल असलेलं एक खास वेगळे प्रकरण. तर ही कथा आहे कॉलनीतल्या वॉचमनच्या आणि कॉलनीत भांडे घासणार्‍या स्त्रीच्या मुलाची. पण ही कोणती कॉलनी??? ह्या पुस्तकातली कॉलनी म्हणजेच मुंबईतले वांद्रे येथील प्रसिद्ध साहित्य सहवास!!!
या पुस्तकाची कथा सुरू होते ती औरंगाबाद/ जालना जिल्हातल्या रस्त्याचा बांधकामावरून... लेखकाचे आई वडील हे तिथे दगड फोडायचे काम करत असतात. चांगल्या रोजगारीच्या संधी शोधत हे कुटुंब मुंबईत येते.. इथे काही दिवस नातेवाईकांकडे काढले जातात.. मोठे कुटुंब आणि झोपडपट्टी मधले जीवन ह्यामुळे त्यांच्या घरच्यांचे आणि नातेवाईकांमध्ये काहीतरी कुरबुरी होवून त्यांना बाहेर पडावे लागते. त्याचवेळेस लेखकांच्या वडलांना कोणीतरी बांद्रा येथे एका वसाहतीचे काम चालू आहे तिथे काम मिळू शकते असे सुचवते. तिथे काम मिळवण्यासाठी लेखकाचे वडील एकाच दगडावर दिवस भर बसून राहतात तेव्हा कुठे त्यांना साहित्य सहवासच्या बांधकामावर बिगारी म्हणून काम मिळते. अश्याप्रकारे सिद्धार्थ पारधे ह्यांचे कुटुंब साहित्य सहवास मध्ये राहायला येते. इथूनच खरी सुरूवात होते त्यांचा प्रवासाला. एका वॉचमन चा मुलगा ते आज एल आय सी मधले उच्चपदस्थ अधिकारी असा त्यांचा प्रवास नक्कीच वाचनीय आहे.
लेखकाच्या ह्या प्रवास सांगताना त्यांनी केवळ स्वतःकडे मोठे पणा घेतलेला नाहीच तर त्या सोबत त्यांचे आई वडील आणि साहित्य सहवास मध्ये राहणारे कुटुंब ह्यांचा बद्दल ठिकठिकाणी कृतज्ञता व्यक्त केलेली दिसते. असे करत असताना लेखक अनेक दाखले देतोच. कॉलेज मध्ये असताना कुटुंब मोठे राहायला जागा झोपडपट्टीत अश्या वेळेस लेखक साहित्य सहवास मधल्या अभंग बिल्डिंगच्या गच्चीवर राहत असतो, तिथेच अभ्यास करतो खरे तर ही बाब अभंग च्या रहिवाशांना नक्कीच माहीत असते पण त्याबद्दल त्यांना कोणी कधीही विरोध केला नाही उलट वेळोवेळी शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलेलेच लेखकाने नमूद केलेले आहे.
ह्याही पुढे जाऊन लेखक आपण जेवायच्या/नाष्टाच्या वेळेस मुद्दाम साहित्य सहवास मधल्या मित्रांच्या घरी जाऊन बसत होतो ही प्रांजळ कबुली देतो. सचिन तेंडुलकर बद्दल ह्या पुस्तकात एक वेगळे प्रकरणच आहे. सचिन, तेंडुलकर कुटुंबीय, त्याच्या क्रिकेटच्या मॅचेस, मंतरल्यासारख्या नि झपाटल्यासारख्या रात्री जागून ऐकलेला मॅचेस आणि असं बरंच काही. पारधेंच्या बाबांच्या मृत्यूनंतर तो सहकुटुंब सांत्वनासाठी आला होता हाही त्याच्या मनाच्या मोठेपणाचा दाखलाच. त्यांच्या त्या पडत्या काळात त्यांना गिरीजा कीर, विद्या बाळ, राजाध्यक्ष बाई, समवयस्क मित्र असे सगळ्यांचेच साहाय्य लाभले नि म्हणूनच त्याचा सध्याचा आयुष्याबद्दल लेखक म्हणतात की आज त्यांचा कडे आहे त्यात त्यांना साहित्यिकांच्या पक्षी कॉलनीतल्या चांगल्या सहवासामुळे आणि आधारामुळे आज ते ह्या पदावर पोहचू शकलेले आहेत.
लेखनाच्या ओघात काही ठिकाणी पुर्नरोक्ती सापडते पण ह्या बद्दल लेखकाने आधीच माफी मागितली आहे. एकुणंच कॉलनी वाचनीय आहे असे म्हणावेस वाटते.

रविवार, मे ०९, २०१०

श्रावण मोडकांचा तिढा

 पुस्तक:तिढा 
 लेखक: मोडक श्रावण
 किंमत: 250.00
 पृष्ठसंख्या: 296


साधारण आठ दहा महिन्यांपुर्वीचा एक विकांत... नेहमीप्रमाणे औरंगाबादला गेलो होतो. काही कामा निमित्त गावात गेलो होतो, तेव्हा बळवंत वाचनालयात एक प्रदर्शन चालू होते. सहज पावले तिकडे वळली आणि त्याच प्रदर्शनात पुस्तक पाहत फिरताना अचानक एका पुस्तकाकडे नजर गेली. लेखकाचे नाव होते "श्रावण मोडक" आणि कादंबरीचे नाव होते "तिढा". अरे हे मराठी जालावर लिहिणारे मोडक का???" हा प्रश्न मनात आलाच. पण काही कारणास्तव त्यादिवशी तिढा घ्यायची राहूनचे गेले. सोमवार पासून पुढे परत मिसळपाव वर आल्यावर सगळ्यात आधी मिसळपाव वरच्या एक-दोन सदस्यांकडे मोडकांनी कादंबरी लिहिली आहे का अशी चौकशी केली, पण फारसे कुणाला माहीतच नव्हते. शेवटी मोडकांनाच विचारले त्यावरुन ही कादंबरी वाचायची उत्सुकता अधिकच वाढली आणि त्याच शनिवारी जाउन तिढा घेऊनच आलो.

मोडकांच्या जालावरती वाचलेल्या नियमित लिखाणावरुन त्यांचा धरणामुळे झालेल्या विस्थापतांशी आणि त्यांच्यासाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संघटनांशी जवळुन संबध आला असेल हे लक्षातच येते. त्याचप्रमाणे तिढा मधेही प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न व त्याच सोबत त्यांच्यासाठी काम करणर्‍या स्वयंसेवी अंतर्गत कामकाज व त्यातुन निर्माण होणारा वैचारिक आणि भावनिक गुंतागुंत या कादंबरीत मांडलेली आहे.

मांडणगाव जिल्ह्यातील आदीवासी भागात सरकारने एक फुडपार्क उभा करायचे ठरवलेले आहे. या भागात असलेल्या नैसर्गिक वनसंपत्तीवर आधारित हा फुडपार्क आहे. पण ह्याच साधानसंपत्तीवर अदिवासींचे जीवन अवलंबून आहे. यात अदिवासींच्या प्रश्नांवर काम करणारे राजीव व विदिशा हे एक जोडपे आणि त्यांची संघटना. ह्या संघटनेच्या उर्मिला सारख्या इतर कार्यकर्त्यांना हाताशी घेउन विदिशा व राजीव ह्यांनी फुडपार्क विरुद्ध संघर्ष उभा केला आहेच. पण या सगळ्यांचा आधार असलेली आणि कादंबरीतील सगळ्यात महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे धर्मा. धर्मा म्हणजे एक क्लिअर विचार असलेला, कुठल्याही गोष्टी कडे त्रयस्थ नजरेने बघु शकणारा असा युवक. ह्या सगळ्या राजकारणात, संघर्षात परिघावर राहुन काम करणारा असा हा धर्मा.  धर्माचे कॅरेक्टर हे तिढा मधले मला आवडलेले कॅरेक्टर..

     पण शेवटी सगळी माणसे हाडामांसाचीच... सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देताना,कामाची आखणी, अंमलबजावणी करताना कार्यकर्त्यांमधे वैचारीक गोंधळ अपरिहार्यपणे असणारच. इच्छा, महत्त्वाकांक्षा तर आल्याच. मग कुणाला उपेक्षित वाटणं, त्याची दुसर्‍याला जाणीव न होणं, एकमेकांत भावबंध गुंतणं हे सगळं त्रांगडं तिथंही होऊन बसतंच. कोणतंही काम करताना कितीही प्रयत्न केला तरी खाजगी आयुष्य सगळीकडे मधून मधून डोकावत राहतंच. या सगळया तिढ्याचे मस्त चित्रण मोड्कांनी रंगवलेले आहे.

ही कांदबरीच्या वाचताना मोडकांचे इतर लिखाणही आठवत जातेच. या पुस्तकवाचना नंतर एक आयुष्यातला पहिलाच नि आगळावेगळा अनुभव मला मिळाला, आणि तो म्हणजे लेखकासोबत पुस्तकाबद्दल चर्चा. हा एक वेगळाच अनुभव होता. मोडकांना जाउन मी सरळ कादंबरी संबधातले माझे विचार कळवू शकलो,त्यांच्या सोबत पुस्तकाबद्द्ल चर्चा करु शकलो.

आणखी काय सांगू तिढाबद्दल? माझ्या कडच्या पुस्तकाच्या प्रतीची दुबईवारीही पुर्ण झाली. आणि सध्या ते काहीही उणे नसलेल्या पुण्यात न उघडलेल्या लगेज बॅगमध्ये अजूनही सुखाने नांदतेय!!! :)

बुधवार, मार्च २४, २०१०

"बाळ्या म्हणे!!!" BPL

आज काही तरी अघटित घडणार असे सकाळपासून वाटत होतेच. सारखी मनात शंकेची पाल चुकचुकत होती. घरातून निघालो चार मजले खाली उतरून आल्यावर कळले आपण आय कार्ड विसरलो... झाssssले!!! परत चार मजले चढून आय कार्ड घेतले आणि खाली आलो. मग काय, आजचा दिवस काही तरी अघटित घडवणार असे वाटतच होते... ऑटो मिळायला वेळ लागला.. मिळालेली ऑटो रस्त्यात दोन वेळा बंद पडली. आज सकाळी कुणाचे तोंड पाहिले असा विचार मनात आला... पण मग तो लगेच काढून टाकावा लागला.. कारण काय विचारता??? अहो, सकाळी सकाळी ब्रश करताना स्वत:चेच तर तोंड पाहिले होते आरशात!!! तसाच ऑफिसला पोहचलो. डेस्क वर सेटल होत होतोच तितक्यात माझा फोन व्हायब्रेट झाला. फोन उचलतच होतो तोच अचानक वीज चमकली(?). मी घाबरलो पण नंतर लक्षात आले की मी बंद ऑफिसात बसलो आहे आणि दिवे चालू बंद झाले होते. असो. फोन हातात घेतला पाहतो तर काय,
"बाळ्या कॉलिंग"...
(बाळ्या कॉलिंग बाळ्या नाहिए हा), तेव्हाच मला कळले, ह्या शुभ(???) शकुनांचे कारण!!!
तर, हा बाळ्या आमच्या कॉलेजातला एक खास दोस्त... कॉलेजात कमी आणि "इंडियन" वर जास्त पडीक.. कोण म्हणतंय रे इंडियन बार आह? अरे इंडियन हे चहा चे फ़ेमस दुकान आहे.... कॉलेजातली सगळी बीडगँग तिकडे पडीक असायची. तर हा बाळ्या भलताच सुपीक डोक्याचा.. त्याच्या म्हणण्यानुसार आमच्या मॅकेनिकलच्या वर्गात अर्ध्यापेक्षा जास्त दगड आहेत... त्याने "दगड गँग" ची पण स्थापना केली होती. आता दगड गँग मध्ये मेंबर बनण्यासाठी नियम होता की एकदा तरी एक्स झाले पाहिजे... ह्या नियमामुळे जेव्हा आमच्या सारख्यांची गोची व्हायला लागली तेव्हा त्याने आम्हाला मानद सदस्यत्व बहाल केले होते. याची अजून एक सवय म्हणजे मुद्दाम बीडात नसणार्‍या लोकांसमोर बीडा च्या भाषेत बोलायचे... तसे त्याला जमत नाही पण उगाचच... तर असा हा आमचा बाळ्या..(याच्यावर आमचा फार जीव नाहीये!!!!) आता जास्त काही बोलत नाही, फकस्त फोन वरचे बोलणे खाली लिहितोय..

मी:- हॅलो
बाळ्या(माझे वाक्य पूर्णं व्ह्यायच्या आत) :- निख्या, काय करायलास??? बाळ्या बोलतोय बीडातून!!!
मी:- बोल रे बाळ्या, बीडात काय करायलास?, तू तर पुण्यात होतास ना? कोणत्या तरी परीक्षा देत...
बाळ्या:- अरे सध्या इथंच आहे बीडात, करंसी ट्रेडिंग करायलोय राव...
मी:- बाळ्या करंसी ट्रेडिंग?? ते म्हणजे आणखी रे काय???
बाळ्या:- तुझ्या सारख्या निरक्षर लोकांना नाही कळत ते!!! जाऊ दे राव, बरं ऐक. बीडात BPL यायंलय!!!
मी :- काय?? BPL वाले बीड मध्ये प्लँट टाकतायत??
बाळ्या: - अरे ते BPL नाही रे...... आता बीडाला Below poverty Line म्हणू नकोस नाही तर मार खाशील!!!
मी :- मग? हे BPL काय प्रकरण आहे???
बाळ्या:- आरं आता परवा तुझ्या औरंगाबादेत बाबूजींनी भरवली होती ना??? APL(Auranagabad Premier Leauge).... तशीच आमचीबी BPL (Beed Premier Leauge).
मी:- काहीही काय सांगतोस???
बाळ्या:- अरे गेल्या आठवड्यात MPL पण संपली...
मी:- MPL? म्हणजे काय Marathawada Premier Leauge का Maharashtra Premier Leauge???
बाळ्या:- नाही, मांजरसुंबा प्रिमियर लीग!!!
मी:- काय??? काहीही काय सांगत आहेस??? मांजरसुंबा घाटात मॅचेस खेळवल्या काय त्यांनी.
बाळ्या:- ते सोड, मला गेल्या आठवड्यात मोदीचा फोन आलता.
(आता बाळ्याला दुनियेत कुणाचेही फोन येऊ शकतात... अगदी ओबामा पासून ते काकां पर्यंत)
मी:- कोण मोदी.. नरेंद्र??? आता त्याने GPL काढले का कायं???
बाळ्या:- आता तुला GPL देइन, क्रिकेटचे बोलणे चाललंय मग कोण्चा मोदी फोन करणार??? तोच ललित?? आय पी एल वाला..
मी :- ह्म्म (मी मुद्दाम शेरेबाजी करायचे टाळले)
बाळ्या:- अरे तो काय म्हणणार??.. मीच त्याला म्हणालो बाबारे तुझ्या आयपिएल मध्ये जाहिराती साठी टीव्ही वाल्यांना टाइम भेटला नाही म्हणून तुम्ही आणला स्ट्रॅटिजिक ब्रेक पण तो पाच मिनिटे लै जास्त होतो ना....
मी :- तू त्याला असे म्हणालास??
बाळ्या:- अरे हो ना भौ.. त्याला सांगितले की त्या ५ मिनिटाला २ भागात डिवाईड कर आणि मग एक ९ ओव्हर च्या आसपास आणि एक १६ व्या ओव्हरच्या आसपास कंपल्सरी करुन टाक ना.. तेवढा वेळ नाचव तिथे पोरी आणि टीव्हीला दाखव जाहिराती.
मी :- गाढवा, म्हणजे त्यादिवशी ९ विकेट पडल्या नंतर फुकट तुझ्या मुळे जाहिराती पाहाव्या लागल्या ना!!!
बाळ्या:- अरं गप्प, दुसरी आयडिया तर लै भारी व्हती गड्या... त्याच काय आहे... दोन बॉल च्या मध्ये तुम्ही ते स्कीन छोटे करून वैगेरे जाहिराती दाखविता त्या सोबत मध्येच ग्राउंड मधल्या स्क्रीन चा फोटो घ्यायचा अन चिपकावय्ची जाहिरात...
मी:- अरे @#$@$, तो दोन बॉल च्या मध्ये येऊन हसणारा अक्षय कुमार पण तुझंच डोकं तर...
बाळ्या :- हौ न भौ!!!
मी :- बरे तुझे बी पी एल चे काय प्लॅन्स? टीम कुठल्या आहेत..??
बाळ्या:- मांजरसुंबा प्रिमियर लिग च्या चँपियन्स ला बोल्विलय... आणि झालंस तर केज, आंबेजोगाई, परळी, माजलगावं तालुक्याचा टिमी बनवल्यात...
मी:- अरे पण त्याचे मालक, जाहिरातदार??
बाळ्या:- अरं मालक, स्पॉन्सरर सगळ्या पक्षाचे पुढारी... अर्रर्र बीड जिल्ह्याला काय तू कमी समजायलास का??? केज साठी "विमलताईच्या" घरी बोलतोय... आंबेजोगाईला "पापा" परळी ला "काका नाही तर पुतण्या" आणि कप चे नाव "केसरकाकू" स्मृती... अन स्पॉनसरर तर खूप आहेत रे... साखर कारखाने दुधसंघ कश्यापाई काढलेतं... अन मक्याशी पण बोललोय...
मी:- कोण मक्या???
बाळ्या:- अर!! तोच मक्या अनासपुरे तुमच्या पुण्या-मुंबईच्या लोकांचा केशव कुथंलगीरीकर... कुंथल्गीरीवरुन आठवलं बघ.. काल गेलतो कुथंलगीरीला. खवा, कलम आणलीया राव... पाठवु का औरंगाबादला घरी...
मी:- कलम तर पाठवच, पण हे मक्या काय करणार...
बाळ्या:- अरं बीडाचा शाहरुख तो... त्यान भी एक टीम घेतली ना राव...
मी :- खेळाडूंचे काय???
बाळ्या:- अर प्ल्येयर तयार आहेतच राव, साईना बिईना झाल्यात... ६ टिमी आहेत १०० खेळाडूंशी सह्या झाल्यातं.. बाकी उद्या बाजार हाय त्यांचं..!!!
मी :- अरे बापरे म्हणजे ऑक्शन!!! कुठे करताय रं हे सगळे???
बाळ्या:- अरे आपलं मैदान आहे ना... ढोरबाजाराचं. तिथ एक मंडप टाकलाय... स्टेज बन्विलयं.. अन लावलाय ह्या ढोरांचा बाजार...
मी:- बरंय लेका...
बाळ्या:- अरं हो... सगळ्या मराठवाड्यात केबल वर लाईव्ह दाखवणार ना आपणं.... तुमच्या त्या टुबा वर पण टाकायचं भौ..
मी:- वा!!!! मजा आहे... बाळ्या मोदी लगे रहो!!!! बरं ते सगळे सोड मला कसं काय फोन केलास इतक्या गडबडीत...
बाळ्या:- अरं ते नाचायच्या पोरिंचे तसा सेटिंग झालंय पण फकस्त त्यांना जिपाडात बसवायचं.... त्यासाठी माणूस मिळनं...
मी:- कुठून बसवायचंय..
बा़ळ्या:- अरे स्पेशल चिअरगर्ल्स आहेत त्या... त्यांना "व्हाईट हाउस" वरून बोलविलंय... तुला फक्त पनवेल ला जाउन त्यांना जीपात बसवायचयं..
मी:- बाळ्या हलकटा, ठेव फोन...मला असले कामं सांगतोस व्हयं...?
बाळ्या:- अरे एक तर....
(बाळ्या बोलत असताना मी फोन कट केला....)
{ह्या लेखातले सगळे पात्र काल्पनिक आहेत त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्ती शी संदर्भ आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा}

शुक्रवार, फेब्रुवारी २६, २०१०

मराठी जालविश्वाची लोकमत मधे ओळख

हा दुवा वाचा


आहो अगदी तुमची नावे.. ज्या सदस्यांची नावे आहेत त्यांचे अभिनंदन, ज्या संकेतस्थळांची नावे ह्यात आहेत त्यांचेही अभिनंदन

हि & हि चा अर्थ पण दिला आहे ;)



त्यातच नवीन सुरू झालेली "मी मराठी" जास्त खेळकर व अनेक नव्या सुविधा असल्याने अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे!



अशी ओळख करुन दिल्या बद्दल लोकमत ऑक्सिजनचे आभार

सोमवार, फेब्रुवारी १५, २०१०

हे बंध रेशमाचे..२

असाच एका विकेंडला आपला चिल्का सरोवर बघायला जायचा प्लॅन होता.... सकाळी मला लवकर उठवायचे कठिण काम तूच फोन करुन केले होतेस. बस तुमच्या बिल्डिंग जवळून सुटणार होती. मी सगळे आवरुन धावत पळतच पोहचलो होतो... बस मधे चढलो तर नेहमी प्रमाणे तु तुझ्या बाजुच्या खुर्चीवरची बॅग उचलून घेतलीस.. नेहमी पेक्षा आज तू वेगळीच वाटत होतीस... बस सुरु झाली आणि एक एक करुन गाणे बजावणे सुरु झाले... बस मधे काय दंगा घातला होता आपण..!!! त्यात सगळ्यात पुढे आपणच दोघेजण होतो हा भाग वेगळा..... मी माझ्या भसाड्या आवजात "प्रथम तुज पाहता" गायला लागताच तुझे ते हसणे आणि नंतर ते लाजणे आजही मला चांगलेच आठवते.... ह्या गाण्याचा वेळेसच मी ठरवले आजच तुला विचारायचे... आपण चिल्काला पोहचलो तिथे मोठ्या बोटीत बसुन डॉल्फिन बघुन आलो.. आणि नंतर कुणीतरी पायडल बोटिंगला जायचे असे ओरडले आणि मग सगळेच तिकडे निघालो... आपण तिथे पोहचेपर्यंत तिथल्या चार माणसांच्या पॅडल बोटस् सगळ्यांनी ढापल्या.. नि आपल्यासाठी दोन लोकांचीच बोट शिल्लक राहिली... न ठरवताच बर्‍याच गोष्टी मला हव्या तशा घडत होत्या!!! नेहमी प्रेमाणच तू तिथे खुललेली होतीस... आपण किनार्‍यापासून बरेच लांब आल्या नंतर अचानक मी बोट थांबवली... तुझ्याकडे बघुन हसलो... अभावितपणे तू पण हसलीस.. मग हळूच मी तुला म्हणालो.. मला तुला काही सांगायचे आहे.... तु अचानक शांत झालीस.. "मी तुझ्यावर प्रेम करतो"!!! तू आधी एक मंद स्मित केलेस आणि म्हणालीस,"चल रे जाउयात" तू उत्तर द्यायचे टाळलेस.. मी परत विचारले तरी उत्तर दिले नाहीस.. आपण तिथून परत निघुन बस मधे परतलो तरी तू शांतच होतीस... परतीच्या प्रवासात आपण एकदाही एकमेकांशी बोललो नाही.. दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना बस मधे चढलो पण तुझ्या बाजुला माझ्यासाठी जागा नव्हती... आपण ग्रुप मधे सोबत असायचो पण तू माझ्याशी बोलायचे टाळायचीस... आपल्या ट्रेनिंगच्या शेवटच्या दिवशी मात्र तू माझ्याशी बोलायला आलीस.. "माझे प्रेम म्हणजेच सगळे काही आहे असे समजु नकोस.. मला प्रेमात पडणे शक्यच नाही... मला माझ्या घरच्यांच्या मनाप्रमाणेच लग्न करायचे आहे" एवढे सांगून तू निघून गेलीस.
ट्रेनिंग नंतर आपण सगळेच मुंबईत आलो... पहिल्याच दिवशी आपल्याला वेगवेगळे प्रोजेक्ट्स मिळाले... त्यामुळे आपला कॉन्टॅक्ट कमी झाला.. आधी तू माझ्या आसपास तर असायचीस पण आता आपले भेटणे केवळ एखाद्या विकेंडला जेव्हा सगळा ग्रुप जमायचा तेव्हाच.. त्यातही तुझा मला टाळण्याच प्रयत्न असायचा... कधीच तू मला बोलायची संधी दिली नाहीस.. तसे मला तुझ्या बद्दल इतरांकडून कळायचे.. पण अजुनही तुझ्या कडुन मला समाधानकारक उत्तर मिळालेच नाही. असेच दिवस जात होते आपल्या भेटी कमी होत होत्या... त्यातच आला तुझा वाढदिवस... खरे तर तुला भेटायची खुप इच्छा होती पण शक्य होईल असे मला वाटतच नव्ह्ते.. पण अजुन एक प्रयत्न म्हणुन मी तुला पुष्पगुच्छ पाठवायचे ठरवले... पुजाशी बोलुन मी एक बुके तुझ्या रुमवर पाठवला... तो पुजानेच रिसिव्ह केला.. तु घरी नव्हतीसच... संध्याकाळी घरी आल्या आल्या तुझा मला फोन!!! जाम चिडली होतीस... मी का बुके पाठवला??... तुला विसरुन जा वगेरे अनेक वेळा सांगितले... ह्या पुढे तुझ्याशी कोणताही संपर्क ठेवू नको असे पण सांगीतले... फार खचलो होतो गं मी...!!!

पुढे एक वर्ष आपला कोणताही कॉन्टॅक्ट नव्हता... खरे तर ठेवू नये अशी तुझीच इच्छा होती... तुझ्या पुढच्या वाढदिवसापर्यंत मी तुझ्याशी काहीच संपर्क ठेवला नव्हता... तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी पुजाचा मला फोन आला... "काय प्रेमवीर, आज पाठवणार का बुके???" असा खोचक प्रश्न विचारला.. खरे तर मला आता फारशी आशा उरलीच नव्हती.. पण पुजाच्या सांगण्यावरुन मी तुला बुके पाठवला... ह्यावेळेस दिवसभर फोन वर असल्यामुळे मी तुझा फोन नाही घेऊ शकलो... तु खुप चिडली असणार.. त्यांना कसे फेस करायचे हे मला कळत नव्हते.. शेवटी हिंमत करुन तुला फोन लावला... ह्या वेळेस तू खुप शांत असल्याचे तुझ्या पहिल्याच वाक्यात जाणवले... "मी का तुझ्यावर प्रेम करावे??? मी तर तुला नीट ओळखतही नाही... मग तुझ्याशी लग्न करायचा निर्णय कसा घेणार??? " असे काहीसे तुझे प्रश्न होते... माझ्या उत्तराने तुझे समाधान होत होते का हे मला कळत नव्हते... पण शेवटी आपण एकमेकांना जाणून घ्यायचे आणि त्यानंतरच तू माझ्यावर प्रेम करू शकतेस का नाही हे तू मला सांगणार असे आपले ठरले!!!
आज तुझा वाढदिवस होऊनही आता तीन महिने झाले आहेत... त्यादिवसा पासून आपण रोजच भेटत आहोत...रोज रात्री किती तास फोन वर बोलणे होतंय याचा हिशेबच नाही.. तुझ्या सोबत घालवलेला क्षणन् क्षण मला आठवतोय.. कुठे कुठे नाही फिरलो आपण मुंबई मधे... पुजाच्या मते आता तू परत पहिल्यासारखी खुलली आहेस... या तीन महिन्यात आपण एकमेकांना खुपच ओळखायला लागलो आहोत... आता एक क्षणही मला तुझ्या शिवाय घालवणे शक्य नाहीय... आणि आपण पुढचे आयुष्य एकमेकांसोबत छान व्यतित करू शकतो हा विश्वास आता मला नक्कीच आहे. म्हणूनच आज ह्या प्रेमदिनी मी तुला परत एकदा विचारतोय...
"माझ्याशी लग्न करशील??? तु माझी होशील का???"
तुझाच वेडा!!!

एवढे लिहुन झाले, लवकर पाठवायला हवे आता....
अरे,आता अशा अवेळी कुणी बेल वाजवली असेल???? बारा वाजायला पाचच मिनिटे बाकी आहेत ... मला बाराच्या ठोक्याला पाठवायचे होते!!!
थोड्याशा अनिच्छेनेच दार उघडले तर माझ्यासाठी एक धक्का होता... मिड-नाईट बुके डिलेव्हरी... आणि त्या सोबत एक नोट...

"माझ्याशी लग्न करशील????"
तुझीच वेडी!!!

हे बंध रेशमाचे!!!

प्रिय सखे....

तू हे वाचे पर्यंत प्रेमदिन सुरु झालेला असेल... ह्या प्रेमदिनी मी आज हे प्रेमपत्र लिहित आहे. खरे तर ह्या नंतर तुझी रिअ‍ॅक्शन काय असेल ह्या भीतीने लिहायला हात धजावतच नाहीय पण आता याचीहि सवय होत आहे असेच म्हणावेसे लागेल... गेल्या तीन वर्षा पासुन आपण एकमेकांना ओळखतो... ओळखतो म्हणजे काय? मागचे तीन महिने सोडले तर आपले बोलणे फार कमीच व्हायचे. अर्थात त्याला कारण मीच आहे हे मला मान्य आहेच.. वागलोच होतो मी तसा... त्याची शिक्षा करतोय ना सहन गेले तीन वर्ष.. आता अजुन किती सहन करणार???? माझ्या समोर अजुनही तीन वर्षापुर्वीचीच तू डोळ्या समोर आहेस...

आपला नोकरीचा पहिला दिवस होता... एका लहानशा शहरातून इंजिनीअरिंग करुन मी ह्या मोठ्या कंपनीत नोकरीला लागलो होतो... अर्थात कँपस मधूनच नोकरी मिळाल्यामुळे फारसा प्रश्न नव्हता आला... "पापा कहतें हैं" सारखी आयुष्यासाठी अनेक स्वप्नं डोळ्यांत घेऊन घरातून निघालो होतो... पहिल्यांदाच बाहेर राहणार होतो... त्यात कंपनीने ट्रेनिंगला भुवनेश्वरला पाठवले होते... आजही तो पहिला दिवस स्पष्ट आठवतो आहे.. कंपनीने दिलेल्या राह्यच्या जागेवरुन प्रशिक्षण केंद्रावर मी लवकरच पोहचलो होतो... साधारण नेहमीचेच सगळे सोपस्कार सुरवातीला झालेच.. तेच कंपनीची ओळख करुन देणारे प्रेझेंटेशन आणि भरमसाठ जाँईनिंग फॉर्म्स.. मग हळू हळू प्रत्येकाची बॅच सांगण्यात आली... त्यात आमच्या कॉलेजचे कोणीच माझ्या बॅच मधे नव्हते... त्यानंतर पुढे त्यांनी आपल्या बॅच साठी सी. आर. होण्यास कोण उत्सुक आहे विचारले.... आधी तर कोणाचाच हात वर झाला नाही. मग अचानक मुलींच्या बाजुला लक्ष गेले तर एक गोरासा हात वर झालेला दिसला... त्या गोर्‍या हाताला मग स्टेजवर बोलवण्यात आले....होय तुझाच तो हात.... आजही आठवतेयस मला तु त्याच रुपात... मोरपंखी रंगाचा तुझा तो पंजाबी ड्रेस... मानेवर रुळणारे केस... कसे विसरु तुझे ते रुप... लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट का काय असेच झाले होते... आणि तु अगदी बिनधास्त स्टेजवर जाउन स्वत:ची ओळख करुन देत होतीस...काही सेकंद माझ्यासाठी जगच थांबले होते की काय??? तु जागेवर जाऊन बसे पर्यंत मी तुझ्याच कडे बघत होतो..

कार्यक्रम संपताना आजच्या दिवशीची उपस्थिती प्रत्येकाने सी आर कडे नोंदवायची होती... माझी नजर तुलाच शोधत होती.. आणि मग मी तुझ्याकडे आलो.. तेव्हा पहिल्यांदा तुला जवळून बघितले.... तुझ्या घार्‍या डोळ्यांनी तर मला घायाळच केले म्हणावे!!! त्या मोरपंखी ड्रेस वर मोरापिसाचे कानातले...अगदी आ वासून मी तुझ्या कडे पहात होतो.. कदाचित ते तुझ्या लक्षात आलेही असावे...सगळ्यांची तुझ्याकडच्या कागदावर सही करुन झाली तरी मी तसाच उभा होतो.. शेवटी तूच माझ्या समोर आलीस आणि माझ्या हातात तो कागद दिला "Please sign this"... सही करत असतानाही माझे लक्ष तुझ्याकडेच होते म्हणा... सहीचा कागद तुझ्या हातात देताना आपली नजरा नजर झाली आणि तु माझ्या कडे बघुन गोड हसलीस... अगदी हृदयात कळ यावी असेच होते ते हसू.... आणि त्यानंतर "जोशी, माझ्या कडे बघणे झाले असेल तर वर्गा कडे चला!!!" हा टोला तर खासच होता...
त्यानंतरचे काही दिवस असेच गेले.. म्हणजे आपली ओळख तर झाली होती... आपण योगा योगाने एकाच ग्रुप मधे आलो होतो.. एकाच ग्रुप मधे असल्या मुळे रोज ट्रेनिंग संपल्या नंतर आपण एकत्र असायचो... हळु हळु बोलणेही वाढत होतेच.. ओळखीचे रुपांतर मैत्रीत होत होते... माझ्या प्रत्येक दिवसाची सुरवात तुला एस एम एस करुनच व्हायची आणि शेवट तुझ्याशी फोनवर बोलतच व्हायचा. आपल्या मैत्रीबद्दल आपल्याच ग्रुप मधे अनेक लोकांना आश्चर्य वाटायचे... तुझी तर अखंड बडबड चालू असायची... तुलाही माझ्यासोबत वेळ घालवणे आवडायचे असे वाटायला लागले होते.. त्यात रोज रात्रीच्या त्या कॉफीशॉप मधल्या गप्पा.. तू तुझ्या शेजारची जागा माझ्यासाठी वर्ग, कॉफीशॉप प्रत्येक ठिकाणी राखून ठेवणे.. ह्या सगळ्यांनी मी खरे तर सुखावतच होतो... साधारण महिना भर हे असेच चालले असेल, अगदी आपल्या चिल्का च्या ट्रिप पर्यंत....
(क्रमशः)

वाघोबा

काल रात्री टीव्ही वर "सेव्ह अवर टायगर" अशी काहीशी अ‍ॅड पाहिली तेव्हा पासून डोक्यात वाघोबाच होता... त्या जाहिरातीत नुसार फक्त १४११ वाघ उरलेत तुम्ही त्यांना वाचवू शकता असे काहीसे आवाहन होते. त्यात पुढे तो एअरसेल ह्या कंपनीने सुरू केलेले हे कँपेन आहे असे पण सांगितले... जाहिरातीत दाखवलेले वाघाचे पिलू मला आवडले.. तसे व्याघ्रदर्शन हा दुर्मिळच योग मानला जातो. म्हणजे पिंजऱ्यातले वाघ बघणे सोपे आहे हो. पण ह्या जंगलाच्या राजाला पाहायचे तर त्याच्याच जंगलात. पिंजऱ्यातले वाघाचे दर्शन अनेक वेळा अनेक प्राणी संग्रहालयातून घडत आलेले आहेच... त्यात आमच्या औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयातल्या पांढऱ्या वाघा पासून ते ओरिसा मधल्या नंदन कानन मधल्या खोट्या जंगल सफारी पर्यंत. नंदनकानन मध्ये एका मोठ्या भागाला तारांचे कुंपण घालून आत मध्ये वाघांना बंदिस्त केलेले आहे.. आणि ह्या भागाची बस मध्ये बसून सफर करून लुटुपुटुची जंगल सफारी अनुभवता येते. आता ह्याला लुटुपुटुची म्हणता येईल कारण पाच ते सहा वेगवेगळ्या वेळेस वाघ ह्या प्राण्याला जवळून पाहता आले आहे. अर्थात सगळे अनुभव बरेच जुने आहेत पण त्यातले काही आजही डोळ्या समोर आहेत.

अमरावतीला राहात असताना चिखलदऱ्याला जाणे वारंवार व्हायचे. चिखलदार हे परतवाड्या जवळचे हिलस्टेशन आणि मेळघाट टायगर प्रोजेक्टच्या जवळ आहेच. चिखलदऱ्याला जायला अमरावतीहून सकाळी निघायचे सुरवात भिमकुंड पासून करून शेवट सनसेट पाँईटला करायचा हा आमचा नेहमीचा कार्यक्रम. जर मुक्काम असेल तर मजा असायची. आमच्या ओळखीचा तिथला एक लोकल ड्रायव्हर होता त्याची खास ट्रॅक्स घेऊन तो आम्हाला जंगलात घेऊन जायचा. म्हणजे अगदी टायगर रिझर्व मध्ये नाही पण आजूबाजूला. आश्चर्य म्हणजे ह्या ड्रायव्हरला ऐकू कमी यायचे पण चिखलदरा घाटात गावात त्याचा गाडी चालवण्यात कुणीच हात धरू शकत नसे. असेच कधी तरी एकदिवसीय सहलीला अमरावतीला गेलो होतो. सोबत दर वेळेस गावाहून येणारे नवीन पाहुणे असत. तर असेच एकदा कमांडर किंवा ट्रॅक्स ज्याला फक्त साइडने ताडपत्री असायचे दार नाही अशी गाडी घेऊन प्रवास चालू होता... लहान असताना नेहमीचा हट्ट करून ड्रायव्हर शेजारची समोरची जागा मी पटकावली होतीच. परतीचा प्रवास चालू होता, गाडीत गाणी अंताक्षरी वैगेरे चालू होते... ड्रायव्हर ने जोरात ब्रेक दाबला... "साहेब वाघ" हे त्याचे उच्चार कानावर पडायच्या आधीच वाघ उजव्या बाजूला असलेल्या डोंगरावरून रस्ता ओलांडत होता. त्या लाइटच्या उजेडात पहिल्यांदाच बघितलेल्या मुक्त वाघाचे रूप म्हणजे काय वर्णावे.. आणि गाडी आणि माणसाची चाहूल लागूनही तो तसाच रस्त्याचा कडेला उभा होता. एकक्षण असाच गेला सगळे शांत त्याने आमच्या कडे वळून पाहिले आणि तो तसाच पुढे दरीत उतरून निघून गेला. हेच वाघाचे पहिले झालेले दर्शन.

ह्या चिखलदऱ्या पासून साधारण १५-२० किमी अंतरावर थोडे जंगलात उतरून गेल्यावर सेमाडोह नावचे गाव लागते. ह्या गावापासूनच मेळघाट व्याघ्रप्रकल्पात बस द्वारे जंगल सफारी करवून आणण्यात येते, साधारण दहा वर्षापूर्वी पर्यंत येथून चार वाजता एक आणि पाच वाजता एक अश्या दोन बसेस जंगल सफारी साठी सोडण्यात येते, इथे माझ्या आठवणी नुसार जंगलात सरकारी रिसॉर्ट सारखे काही तरी आहे. त्या रिसॉर्टच्या आवारातूनच बसेस सुटतात. तसे हे रिसोर्ट सुद्धा एका नदीच्या किनारी आहे असे काहीसे आठवते. ही बसची जंगल सफारी मी आठ ते दहा वेळा केली असेल पण त्या सफरीत मला एकदाही वाघाचे दर्शन झालेले नाही. पण असेच एकदा आम्ही दुपारी साधारण तीन वाजता इथे पोहचलो तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरने माहिती दिल्या प्रमाणे चारची बस आधी पासूनच फुल्ल होती मग काय करायचे. त्यादिवशी जादा बस सोडणे शक्य नव्हते कारण एका गावकऱ्यावर वाघाने हल्ला चढवला होता व त्या गावकऱ्यास हॉस्पिटलात घेऊन जाण्यासाठी एक बस वापरण्यात आलेली होती. आता पाच च्या बस चे बुकिंग करून पुढे काय करायचे तर कोलकास रेस्टहाऊसला कडे जायचे ठरवले. तसे ह्या कोलकास गेस्टहाउन हे सेमाडोह पासून जवळच पण जंगलात एका शांत जागी सिपना नदीच्या किनारी आहे. इथून नदीचा व्हयू खूपच छान आहे, आणि नदीत पाणी प्यायला येणारे वाघ ह्या जागेहून बघता येतात. ह्या गेस्टहाउस मध्ये इंदिरा गांधी सुद्धा थांबल्या होत्या हि माहिती इथल्याचं गार्डने दिलेली आहे. हा तर आम्हाला सेमाडोह इथून जंगल सफारी मध्ये जागा न मिळाल्यामुळे कोलकास कडे जाताना रस्त्यात एका डोंगरावर गव्याचा कळप लागला... आम्ही गाडी थांबवून साधारणता त्या कळपापासून सेफ अंतरावर राहून पाहत होतोच. जिथे गवा असतात त्याचा आसपास नेहमी वाघ असू शकतो अशी माहिती स्थानिकांनी आम्हाला दिलेली होती. नेहमी प्रमाणे वाघाचे दर्शन न झाल्यामुळे पुढे जाण्यासाठी आम्ही निघालो दोन वळणे पुढे गेलो तोच काहीतरी रस्त्यावर असल्याची जाणीव झाली. परत एकदा रस्त्यावर दर्शन देणारा तो एक वाघ होता. साधारण पाने रो वाघ तरून असावा... गाडीची चाहूल लागताच वाघाने पटकन दरी कडे धाव घेतली. हे सगळे घडले असेल साधारण अर्धा मिनिटभरता. पण ते दर्शनही सुखावणारे होते. सेमाडोह ला परत आल्या आल्या आम्ही त्या फॉरेस्ट ऑफिसरचे आभार मानले.

आज पर्यंत व्याघ्रदर्शनाचा सगळ्यात चांगला आलेला अनुभव हा कान्हा नॅशनल पार्क (मध्य प्रदेश) मधला. आम्ही ज्यावेळेस गेलो होतो तेव्हाच ह्या टायगर प्रोजेक्ट मधल्या वाघांची संख्या १००+ होती. इथे जाऊन व्याघ्र दर्शन न घेता परत येणे म्हणजे दुर्दैवच. ह्या जंगलात तिथेच कुठे तरी एक म्युझियम आहे. सफारीला जाण्याआधी ह्या म्युझियम ला भेट दिली होती. त्यात एक आवाजासहित वाघाच्या शिकारीचे मॉडेल होते. अतिशय व्यवस्थित रित्या वाघाच्या शिकारीच्या वेळेस कसे बदल घडतात हे दाखवून दिलेले होते. तर ह्या जंगलात आमची सफर झाली ते एका ओपन रुफ जिप्सी मधून. जाळी नाही काही नाही तसेच तुम्ही जंगलाचा आनंद घेऊ शकता. जंगलातून जाणारी फक्त एक जीपवाट. आमच्या सफारीत आम्हाला बिबट्याचे पिले आधी दिसले होते पण बिबट्या किंवा वाघाचे दर्शन नव्हतेच. त्यातच समोरून येणाऱ्या जीपच्या ड्रायव्हरने आमच्या ड्रायव्हरला ह्या भागात वाघ दिसल्याची बातमी सांगितली. खरे तर त्या जीपच्या मागे मागे वाघ पाच दहा मिनिटे जीप वाटेवरून चालला असे काहीसे त्या जीप मधल्या लोकांनी सांगितले. आमची तर सफारी संपत आलेली पण आमच्या जीप ड्रायव्हरने आम्हाला वाघ दाखवायचे ठरवलेलेच होते. तडक जिप्सी वाघ दिसलेल्या भागा कडे वळवली. साधारणता एका जागी आल्यानंतर त्याने सगळ्यांना शांत राहिला सांगितले आणि उभे राहून तो इकडे तिकडे पाहू लागला. उजव्या बाजूला एक काळविटाचा कळप दिसत होता. त्यामुळे वाघ तिकडेच असण्याची शक्यता होती. सगळी कडे एक वेगळ्याच प्रकारची शांतता होती. अगदी त्या मॉडेल मध्ये दाखवल्या प्रमाणे माकडे झाडावर चढून एक वेगळाच आवाज काढून इतर प्राण्यांना सावध करत होती. आणि त्या काळविटाच्या कळपा मध्ये तर हलकल्लोळ माजला होता... कोण कुठे पळतंय कळत नव्हते. हे सगळे घडत होते ते आमच्या पासून १०० फुटावर. अगदी कातरवेळ का काय तसे वातावरण.. त्यातच गवतामागून काही तरी हालचाल जाणवली.. काळविटाचा कळप आधीच पांगायला लागला होता.. आणि अचानक त्याने मागे राहिलेल्या काळविटावर झडप मारली. आजही तो सीन डोळ्यापुढे घडला असेच वाटते. काही क्षणाचा रोमांच पण वाघाची शिकार अनुभवायला मिळाली. त्यानंतर बराच वेळ आम्ही तिथेच थांबलो गवतातून तो बाहेर पडेल म्हणून. अगदी काळविटाचा कळप परत त्या जागी आला जणू पंचनामा करण्यासाठीच. पण तो काही दिसला नाही. शेवटी वाघाच्या शिकारीचा अनुभव घेऊन आम्ही परतलो.

जाता जाता वाघाला वाचवणे गरजेचे आहे हे पटते पण त्यासाठी कोणता मार्ग योग्य ते कळत नाही. सुरवातीला लिहिलेल्या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती इथे मिळेल. पण ह्यात वाघांची भारतातील संख्या १४११ सांगण्यात आलेली आहे. पण त्यासाठी जो माहितीचा स्रोत म्हणून देण्यात आला आहे.


ह्यानुसार भारतात २००० साली वाघांची संख्या ३६४२ होती. जर १० वर्ष ती अर्ध्यावर आली असेल तर व्याघ्र प्रकल्पांचा उपयोग काय??? ह्यावर त्या प्रोजेक्ट वाल्यांकडून अधिक माहिती मागवली आहे. पण ह्या प्राण्याला माझ्या पुढच्या पिंढ्यांनाही।यांनाही जंगलात पाहता यावे ही इच्छा आहेच.

झोप!!!

आज सकाळी नेहमी प्रमाणे अलार्म पुढे ढकलत ढकलत ७. ३० ला कसे बसे उठलो... आरामात आवरले आणि ऑफिसला यायला निघालो... ऑफिसला पोहचायला साधारण दोन स्टॉप चे अंतर राहिले असेल तोच मला एक जांभई आली. झोपेतून उठून साधारण दोन तास झाले नव्हते तरीही मला परत झोप येण्याची चिन्हे!!! मग थोडे आठवायचा प्रयत्न केला साधारणता रात्री कधी झोपलो असेल ते!!! काल रात्री तर साडे अकरा पर्यंत झोप लागली होती. म्हणजे साधारण ८ तासाची झोप मिळाली असेल. मग तरीही मला जागे होवून दोनच तास झाले असताना परत का झोप येत असावी??? बरे उठल्यावर मस्त गरम पाण्याने अंघोळ आणि एक कप चहा झालेला होता.... तरीही साधारण हे सगळे झाल्यानंतर अर्ध्यापाऊण तासातच झोप यायला लागली!!! असे आज काल वारंवार होत आहे खरे... बरेच वेळा एखाद्या ग्रुप मध्ये बसले असताना जांभई देणे सभ्यतेच्या शिष्टाचाराला धरून नाही.. मग काय कारण असावे??? एम आय डिप्राईव्हड ऑफ स्लीप????
असेच बसल्या बसल्या मग गुगल सर्च सुरू झाले. स्लीप ह्या विषयावर मराठीतून माहिती शोधायचा प्रयत्न केला, विकिपीडियावर एकच वाक्य सापडले.. "प्राण्यांमधील नैसर्गिक विश्रांतीची अवस्था. जगण्यासाठी नियमित झोपेची गरज असते." आपण का झोपतो हे पाहता असताना ह्या सापडला. ह्यानुसार आपण का झोपतो ह्याचे सुयोग्य कारण कोणालाही माहीत नाही पण आपल्या सामान्य क्रिया चालू राहण्यासाठी झोपेची आवश्यकता असते. तसेच झोपल्याने शरीरातली ऊर्जा वाचते हा ही एक असाच(!) समज आहे. झोपेची कमतरता असण्याचे परिणाम काय आहेत??? तर बराच काळ झोपेच्या कमतरतेने मृत्यू सुद्धा होवू शकतो. सामान्यता झोपेच्या कमतरतेमुळे अंग दुखणे, डोके दुखणे, तोंड कोरडे पडणे हे झोप येण्याचे किंवा कमी असण्याचे लक्षणे आहेत... पण सगळ्यात कॉमनली आढळणारे लक्षण म्हणजे जांभई. काही संशोधकांच्या मते जांभई देणे हे मेंदू शांत ठेवण्याचा प्रक्रियेचा भाग आहे. काही शास्त्रज्ञांनुसार जी रसायने मेंदू मध्ये भावना निर्माण करतात त्याच केमिकल मुळे जांभई येते. अजून एका मतानुसार शरीरात कार्बन डायॉक्साईड च्या कमतरते मुळे जांभई येते व त्यामुळेच शरीरात प्राणवायूचा पुरवठा केल्या जातो. ह्या दुव्यावर जांभई मेंदू चे तापमान निश्चितीकरता वापरल्या जाते ह्याचा निश्चितीसाठी केलेल्या प्रयोगाचे निरीक्षणे आहेत.

हे सगळे वाचूनही मला माझ्या झोप येण्याचे किंवा जांभई का येते त्याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. ह्यामुळेच ह्या दुव्यावर जाऊन मी माझी झोप माझ्या शरीराच्या गरजेनुरुप आहे का नाही हे तपासून घ्यायचा प्रयत्न केला. त्या नुसार मी जितक्या वेळ झोपतो तितकी जेमतेम गरजेपुरती आहे. दुपारी जर १५ मिनिटे झोपलो तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता हे तर काही शक्य नाही म्हणून अजून नवीन कारणे आणि नवीन उपाय शोधायला जातोय..

(हा लेख लिहायचा उद्देश माझी झोप उडवणे व तुम्हाला झोप यायला लावणे असा काहीसा होता.. पहिला भाग तर सफल झालाय पुढचे बघूयात)

वावटळ

आज नेहमी प्रमाणे एक प्रश्न माझ्या मनात रेंगाळत आहेच... कुठे जायचे.... खरे तर ह्या प्रश्नाचे उत्तर मला माहीत नाहिये कारण निरर्थक भटकायचे म्हणूनच मी घरातून निघालेए??? आता मला खरंच कळत नाहिए का घराबाहेर पडले आहे???.... असे काय घडले आहे आज??? "आज"... आताश्या तर हे रोजचेच झाले आहे, कंटाळा आला आहे ह्या जगाचा... वाटते सगळे संपवावे!!! पण त्यातून काय हशील होणार??? का मी हे जीवन संपवावे??? त्यातून मला काय मिळणार??? त्रासातून सुटका होईल... बरे ज्यांचा कडून त्रास दिला जातोय ते कोण आहेत तर माझे सगेसोयरे... का हे लोक मला समजावून घेऊ शकत नाहीत...

लग्नाचे वय ओलांडले तरी माझे लग्न जमत नाही ह्यात माझा खरे तर काय दोष???? पण हे कोणीही समजावून घेत नाही... समाजात लग्न न करिता राहणे हे स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या मुलीला एवढे अवघड आहे का??? आज मी नवऱ्या नावाच्या प्राण्याशिवाय जगू शकते हा विश्वास नक्कीच माझ्या मध्ये आहे. पण घरचे.. त्यांनी हे समजावून घ्यायला नको का??? आईने कष्ट करत सौंसाराचा डोलारा सांभाळला... तीच्या कष्टामुळेच आज मी शिकून मोठी झाले आहे... जे काही आहे ते फक्त आणि फक्त तीच्याच मुळे.... पण आजकाल तीही विचित्र वागायला लागलेली आहे.... दिवसातून ४ वेळा फोन करून विचारते त्या मंत्राचा जप केलास का??? मंत्र कोणी दिला तिला हा??? आणि का सांगितले की ह्या मंत्राच्या पठणाने माझे लग्न जमणार आहे???? सगळे सांगतात लग्न जमण्यासाठी पोरीच्या जातीने थोडे तरी ऍडजस्ट करायला पाहिजे!!!! आहो पण किती??? आणि काय काय म्हणून??? माझ्या पेक्षा वयाने मोठा असलेला मुलगा जेव्हा तोंड वर करून मला विचारतो माझे लग्न का झाले नाही अजून??? अरे तो तर माझ्या पेक्षा वयाने पाच दहा वर्ष मोठा आहे??? त्याचे का नाही जमले लग्न??? त्याचा का कोणी असे हात धुऊन मागत नाही???? कॉंम्प्रमाईज करायचे पण किती आपल्या पेक्षा अर्ध्या पगाराच्या माणसाशी मी का म्हणून लग्न करायचे??? हे असेच ह्या समोरून येणाऱ्या रहदारी मध्ये चालत जावे आणि सगळे संपवावे....

खरेच इतके कठीण आहे का मला समजावून घेणे... माझ्या अपेक्षा फार माफक होत्या... सुरवातीला ह्या सगळ्या प्रकाराला मी पण न कंटाळता पुढे जात होतेच... एक नवरा नावाचा हक्काचा खांदा मिळावा हे माझे पण स्वप्न होतेच ना... इतर मुलींसारखे मी पण ती कांदेपोह्यांची प्लेट थरथरत्या हाताने पाहुण्यांना दिलेली आहे.... पण जसे जसे आयुष्य पुढे सरकत गेले तसे माझे मन ह्या गोष्टीतून उठत गेले.... कशासाठी दरवेळेस एका नवीन मुलासमोर नटून थटून उभे राहावे???? बरे ते करायची तयारी ठेवली तरी समाज शांत बसू देतो का??? घरचे तर चिंते पोटी बोलतात..... पण ज्यांचा काही संमंध नाही असे लोक पण लग्न का होत नाही ह्याचा जाब मला विचारतात... ऑफिसात.. मैत्रिणीचा घरी... गल्लीत... नातेवाईकांमधे नेहमी एकच प्रश्न लग्न कधी करणार???? एकदाचे मोकळे व्हावे ह्यातून... कुणीच नाहिए का ह्या जगात माझे जे मला समजावून घेईल??? माझ्या मैत्रिणी सुद्धा मला ह्यांवरून छेडतात... काहींना खरी चिंता तर काहींचा ढोंगी पणा.... शेवटी आता चालताना लक्षात येत आहे ती एकच गोष्ट

"My shadow is the only thing that wals beside me
my shallo hearts is the only thing thats beating"

कुठवर चालत आलेली आहे मी..... किती वेळ झाला असेल??? का चालत आहोत आपण??? जीव देण्याची हिंमत आहे का आपल्यात??? खरे तर जीव देणे हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही हे मान्य पण ह्या संधिप्रकाशातून मी अंधकाराकडे जात आहे पण... हे काय होतंय... माझ्या आजूबाजूला एवढी गाड्यांची गर्दी का आहे??? अरे बापरे!!! मी रस्त्याच्या मधून चालतेय!!!! आणि हे लाइट्स कसले??? ती बस माझ्या कडे का झेपावत आहे... आईssss!!!!... हे काय होत आहे??? कोण मला खेचते आहे??? कोण हा मुलगा?? माझ्या डोळ्या पुढे अंधारी का येत आहे??? ....

(एकविसाव्या शतकात सुद्धा परिस्थिती फारशी बदललेली नाहिए.... अश्या घटना बरेच वेळा घडतात. )



बुधवार, जानेवारी ०६, २०१०

रिक्षातली गाणी

आज सकाळी ऑफिसला यायचा मुड नव्हताच.. पण घरी बसून काय करायचे हा पण तेवढाच महत्त्वाचा प्रश्न होता??? मग काय कसे बसे उठलो पेपर हातात घेऊन रमत गमत कसे बसे तयार होत होतो तेवढ्यात झेंडा चित्रपटातल्या गाण्यांची सिडी हातात आली. मराठीत हार्ड रॉक का काय तरी आणायचे असे अवधूत गुप्ते म्हणत होता ते एकूण उगाचच झेंडाची सिडी घेतली पण फार वेळेस काही ऐकणे झालेच नव्हते. गाणे ऐकत ऐकतंच घाई घाईत आवरले पाहतो तर घडाळ्यात ९ चा आकडा दिसला. पळत पळतच चार मजले उतरलो सोसायटीच्या बाहेर आलो.. उशीर झाल्यावर जे होते तेच ऑटो स्टॅण्ड वर एक पण ऑटो नाही. चार ऑटोंना मुलुंड चेक नाका विचारले एक पण यायला तयार नाहीच. खरे पाहता ठाण्याचा शेवटच्या टोकापर्यंत जायचंय तरीही हे रिक्षावाले का तयार होत नाहीत हे कळतच नाही. शेवटी कसा बसा ऑटोत बसलो.. कानात झेंडा चित्रपटातले ज्ञानेश्वर मेश्राम ह्याने गायलेले "झेंडा" हे गाणे अजूनही घोळत होतेच.

आपलीच माणसे आपलीच माती
तरी मेंढराला कळपाची भीती
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती

खरच कोणता झेंडा घेऊन चालायचे हे एक कोडच आहे... ह्याच विचारात पोहचलो मुलुंड चेक नाक्याला.. हा चेक नाका म्हणजे मुंबई आणि ठाण्यातली हद्द. काही दिवसांनी इथे सामाना सोबत पासपोर्टही मागतील का काय... एक रिक्षा सोडून मुंबईच्या बाजूची रिक्षा पकडण्यासाठी चालत पुढे रिक्षा स्टॅण्ड पर्यंत आलो. इथेही रांग होतीच पाच मिनिटात रिक्षा मिळालीच साधारण अर्ध्या तासाचा रस्ता. रिक्षा सुरू होवून पहिला सिग्नल जेमतेम ओलांडला लगेच रिक्षावाल्याने टेप सुरू केला. रिक्षा मधल्या म्युझिक सिस्टम मध्ये एक जादू असते. काही गाणे केवळ रिक्शात वाजवण्यासाठी तयार केलेले आहेत की काय असे वाटावे असेच असतात. टेप सुरू झाला म्युझिक ऐकून गाणे ओळखायचा प्रयत्न केला आणि गाणे एकदम डोळ्या समोरच आले. काय सांगावे ह्या गाण्याबद्दल.. छायागीत आणि चित्रहार मध्ये हे गाणे तर वाजायचेच नेहमी. "जान तेरे नाम" चित्रपटातले "फर्स्ट टाइम देखा तुझे" ह्याचे गायक तर आठवत नाहीत पण रिक्शांत एकदम काहीतरी वेगळाच आनंद देऊन जात होते.

फर्स्ट टाइम देखा तुझे हम खो गया
सेंकड टाइम मे लव हो गया
ये अख्खा इंडिया जानता है हम तुम पै मरता है
दिल क्या चीज हे जानम जान तेरे नाम करता हे

ह्या गाण्याचा लुफ्त लुटल्यानंतर पुढचे गाणे कोणते असेल विचार करत होतोच.. त्यात अचानक ओळखीचे स्वर आले आणि सुरू झाले हसन जहांगिराचे हवा हवा. अरे काय जादू होती ह्या गाण्यात एका जमण्याला वेड लावले होते ह्या गाण्याने.. अर्थात रिक्शात ऐकायची मौज काही औरच.. कॅसेट नेहमी प्रमाणे घासलेलीच पण जर कॅसेट घासलेली नसेल तर रिक्शांत गाणे ऐकण्यात काय मजा??? पण हवा हवा जोरातच होते. खरे तर हा पाकिस्तानी कलाकार पण ह्यालाच भारतात पॉप गायकी पॉप्युलर करणारा मानला पाहिजे.

हवा हवा ए हवा खुशबू लुटा दे
कहा खुली हा खुली, जुल्फ बता दे
अब उसका पता दे, जरा मुझको बता दे
मै उससे मिलुंगा, एक बार मिला दे
यार मिला दे, दिलदार मिलादे

गाण्याचा शेवटी शेवटी कॅसेट अडकत होतीच.. रिक्षावाल्याने काहीतरी केले आणि पुढचे गाणे सुरू झाले. हे पण एक रिक्षा स्पेशल गाणे... मोहरा चित्रपटातले " ना कजरे की धार"... साधना सरगम आणि पंकज उदास ह्यांनी गायलेले हे गाणे ऍनादार रिक्षावाला'स फेवरीट...

ना कजरे की धार, ना मोतियोंका हार
ना कोई किया सिंगार, फिर भी कितनी सुंदर हो
मन मै प्यार भरा, और तन मैन प्यार भरा
जीवन मै प्यार भरा, तुम तो मेरे प्रियवर हो

जेम तेम हे गाणे सुरू होते आणि पुढच्या चौकातला पोलिस हवालदार पाहून रिक्षावाल्याने गाणे बंद केले. तो चौक गेल्या नंतर साधारण पाच एक मिनिटाने मीच त्याला गाणे सुरू कर म्हणून सांगितले. पुढचे गाणे असेच एक गाणे दिलवाले चित्रपटातले गाणे "इक ऐसी लाडकी थी" कुमार सानू ह्यांनी गायलेले गाणे नेहमीच रिक्शांत ऐकायला मिळते.

जिता था जिसके लिये, जिसके लिये मरता था
एक ऐसी लाडकी थी जिसे मै प्यार करता था.

हे गाणे संपायच्या आतच आमची कॅसेट अडकली... ती बाहेर काढण्याचा नादात रिक्षावाल्याकडून तुटली पण... ऑफिस जवळ आले होते. पण अशी कॅसेट खराब होवून हा प्रवास संपणे काही केल्या मनाला पटत नव्हते.. आज रिक्शात बसल्या बसल्या ही गाणी मला एका वेगळ्याच आठवणीत घेऊन गेली..निदान माझा कंटाळा तरी घालवला. तर सांगा मंडळी तुमची रिक्शातल्या स्पेशल मुजिक सिस्टम वर ऐकायची आवडती गाणी कोणती.

समान नागरी कायदा



भारताच्या राज्यघटनेचा कलम ४४ नुसार भारतात समान नागरी कायदा लागू करणे सरकारसाठी बंधनकारक आहे पण अजूनही ते प्रत्यक्षात आलेले नाही. भारताच्या घटने नुसार "The State shall endeavour to secure for the citizens a uniform civil code throughout the territory of India. " खरे तर भारतात समान नागरी कायद्याची गरज का व कशी आहे ह्या बद्दल थोडक्यात बघूयात. भारतात स्वातंत्रपुर्व काळात वेगवेगळ्या संस्थानात वेगवेगळे कायदे लागू होते. हे कायदे थोड्याफार प्रमाणात सगळ्याच धर्मासाठी समान होते. (अर्थात ह्याला अपवाद आहेच. ) पुढे ब्रिटिशांच्या राज्यात प्रत्येक धर्मासाठी वेगवेगळे कायदे लागू करण्यात आले ह्याची सुरवात १८६९ साली " इंडियन क्रिश्चन डाय्व्होर्स ऍक्ट" ह्या नावाचा एक नवीन कायदा लागू करण्यात आला. ह्याचा पुढचाच भाग म्हणजे १९३७ साली शरियत वर आधारित मुस्लिम पर्सनल लो लागू करण्यात आला. ह्या कायद्या मधील निकाह आणि तलाक संदर्भात तरतुदींमुळे मुस्लिम स्त्रीचे आयुष्य खिळखिळे केले. ह्या कायद्यानुसार मुस्लिम पुरुषास चार बायका नांदवायची परवानगी मिळाली. म्हणजेच मुस्लिम पुरुष एखाद्या रात्री तलाक तलाक तलाक असे म्हणून सरळ आपल्या चारही बायकांना तलाक देऊन नवीन चार लग्न करायला मोकळा झाला. ह्याबाबत १९८५ सालच शहाबानो प्रकरण हे एक बोलके उदाहरण आहे. तसेच अशातच झालेले एक उदाहरण म्हणजे शरियत नुसार १४ वर्षाच्या मुलीला लग्न करण्याचा अधिकार देण्यात यावा ही एक मागणी. ह्या मागणीनुसार जर बघितले तर एखादी १४ वर्षाची मुस्लिमेतर मुलीलाही धर्मांतर करून लग्नाची बळजबरी केली जाऊ शकते.




ह्या कायद्यावर १९४९ साली लोकसभेत चर्चा बरीच चर्चा झाली. त्यावेळेस मुस्लिम सदस्यांनी ह्या कायद्याला विरोध केला त्यांचा मता नुसार समान नागरी कायदा म्हणजे मुस्लिम पर्सनल लॉ संपवायचा कट आहे. ह्या कायद्याचा चर्चेच्या वेळेस आंबेडकरांनी उत्तर देताना म्हणाले होते "मुस्लिमांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, मुस्लिम पर्सनल लॉ लागू होवून केवळ १२ वर्ष झाले आहेत. त्यापूर्वी देशात जे परंपरागत कायदे लागू होते त्यांचेच पालन मुस्लिम समाज करत होता. आणि मुस्लिम समाजाचे अस्तित्व अजूनही टिकून आहेच. तर सर्व समाजाच्या कायद्यातील चांगल्या तेवढ्या गोष्टी घेऊन तयार केलेला समान नागरी कायदा मुस्लिमांच्या अस्तित्वाला धोकादायक कसे ठरेल? " ह्याच चर्चेच्या वेळेस सरदार पटेल म्हणतात " इतिहासाचा प्रवाह बदलण्याचा कामात मला सर्व अल्पसंख्याकाच्या सहकार्याची मला अपेक्षा आहे. द्विराष्ट्रवादाच्या सिद्धान्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना माझी एवढीच विनंती आहे की, त्यांनी तिकडेच जाऊन आपले नव्याने मिळालेले स्वातंत्र्य उपभोगावे आणि आम्हाला इथे शांतपणे राहू द्यावे. "



डॉ. आंबेडकर आणि सरदार पटेल हे समाजवादाला मानणारे नेते आहेत असे म्हणता येईल. यापुढेही डॉ. राम मनोहर लोहियांनी सुद्धा समाजवादाचे मुखपात्र असलेल्या चौखंबा मध्ये १९५४ साली एक मोठा लेख लिहून भारतात समान नागरी कायद्याची गरज कशी आहे ते स्पष्ट केले आहे. नरहर कुरंदकरांचे भाषण त्यांचा शिवरात्र ह्या पुस्तकात त्यांचे भाषण संग्रहित केले आहे. त्यात कुरुंदकर म्हणतात " मुसलमान शरियतचा गुन्हाच्या कायदा आम्हाला लागू करा किंवा आमच्या प्रेतावरून चालण्यास तयार व्हा असे सांगणार आहेत का??? हिंदू चोर असेल तर त्याला सहा महिन्याची शिक्षा आणि मुस्लिम चोर असेल तर हात तोडणे अशी मागणी मुसलमान करणार आहेत का?? " ह्यावर हमीद दलवाई ची भूमिका त्यांनी १९६८ साली साधना मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात " आता ह्या पुढे चर्चा हिंदू-मुस्लिम प्रश्नावर नको तर समान नागरी कायद्यावर व्हावी त्यासाठी आंदोलने करण्यात यावीत. गोषा पद्धती बंद करावी, कुटुंब नियोजन सगळ्यांना सक्तीचे करण्यात यावे, ज्या मुसलमानांना असे करायचे नसेल त्यांना दुय्यम नागरिकत्व देण्यात यावे. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून टाकण्यात यावा. ज्यांना शरियत कायदा हवा आहे त्यांना संपूर्ण शरियत लागू करण्यात यावा. म्हणजे चोरी केल्यास हात तोडावे. व खोटे बोलल्यास फटके मारावे.



ह्याबाबतीत आजचे समजवादी भूमिका म्हणजे त्यांचा समान नागरी कायद्याला त्यांचा विरोधच आहे. कारण त्यातून त्यांना मुस्लिमांना नाराज करायचे नाही. खरे तर आजचे राजकारण्यातले समाजवादी म्हणजेच मुलायम-लालू- अमरसिंगाला समाजवादी म्हणायचे काय हा एक मोठा प्रश्नच आहे. कारण एकीकडे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवत हे लोक बऱ्याच वेळा मुस्लिम तुष्टीकरण करत असतात. थोडक्यात बहुसंख्यांकाचे हिताचे सोडून मुस्लिम समाजाचे तुष्टीकरण हेच आजच्या समाजवाद्यांचे लक्षण मानावे लागते.



संघाच्या कार्यक्रम पत्रिकेवर सातत्याने असलेल्या मुद्द्या पैकीच एक म्हणजे समान नागरी कायदा. बहुसंख्यांकाची प्राथमिकता लक्षात घेता खरे तर समान नागरी कायदा ह्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचा असायला पाहिजे. ह्या प्रश्नावर संघाची भूमिका पक्की असली तरी या मागणीच्या पाठपुराव्यात संघाने कधीही सातत्य ठेवले नाही, योग्य जनजागरण केले नाही, आणि भाजपाची सत्ता असताना ह्या मुद्द्या ला हात घातला नाहिए. भाजपाकडे संपूर्ण बहुमत नसल्यामुळे त्यांना हा प्रश्न मार्गी लावता आला नाही असे म्हणणे म्हणजे भाजपाच्या नाकर्ते पणा वर पांघरून घालण्यासारखेच आहे. संघाचा भाजपावरचा कंट्रोल बघता जर त्यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला असता तर भाजपाला नक्कीच काही ना काही करावे लागले असते. कदाचित ह्या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा तरी झाली असती.



समान नागरी कायदा लागू करणे म्हणजे सगळ्यांना हिंदू कायदा लागू करणे असा एक समज बऱ्याच लोकांमध्ये आढळतो. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हिंदू वारसा कायद्यात सुद्धा अनेक बदल करणे आवश्यक आहेच. तसेच काही बदल ख्रिस्चन कायद्यात करावे लागणार आहेत. ह्याचे एक उदाहरण द्यायचे तर साधारणता २००३ साली एका खटल्यात सरकारने समान नागरी कायदा लागू करण्यासाठी संसदेचे आपल्या ह्या कर्तव्याकडे लक्ष वेधले आहे. ह्या खटल्यानुसार वडिलोपार्जित मिळकतीतील काही हिस्सा इतर धर्मांच्या धर्मदाय संस्थांना दान करण्याचा अधिकार ख्रिश्चनानं नव्हता. ह्या घटनेच्या आधीही सर्वाच्य न्यायालयाने वेळोवेळी सरकारला ह्या आपल्या कर्तव्याची आठवण करून दिलेली आहेच. खरे तर समान नागरी कायदा ह्याचा समावेश घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वात समाविष्ट केलेली आहे. त्यामुळे ह्याची अंमलबजावणी नाही झाली तर ह्या विरुद्ध कोणाला कोर्टात तक्रार करिता येणार नाही असे न्या. नरेंद्र चपळगावकर ह्यांनी आपल्या एका लेखात स्पष्ट केले आहे.



आजच्या काळात ह्या कायद्याची गरज तर दिवसेंदिवस वाढतच आहे पण केवळ बहुसंख्यांक असणे किंवा हिंदुत्ववादी असणे म्हणजे प्रतिगामी असणे असा अर्थ आज काल रूढ होत असताना ह्या कायद्याची पुर्तता होणे सध्या तरी शक्य दिसत नाहिए. कारण आज कालचे राजकारण्यात असलेली ह्या विषयाची उदासीनात. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे असो वा स्वतःला समाजवादी म्हणणारे असो ह्या कायद्याबाबत आपल्या फायद्यासाठी उदासीनताच बाळगून आहेत.



(ह्या लेखातले बरेचसे मुद्दे हे किस्त्रीम च्या दिवाळी अंकातील डॉ. विश्वंभर चौधरी ह्यांचा "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समाजवाद ह्या लेखातून व न्या. नरेंद्र चपळगावकर ह्यांचा " समान नागरी कायदा - विस्मरणावर सर्वोच्च उपाय" ह्या लेखातून घेतले आहेत. हे इथे देण्याचा उद्देश हा इथे ह्या मुद्द्यावर चर्चा व्हावी हाच आहे. तसेच हिंदु आणि क्रिश्चन कायद्या मधे काय काय बदल अपेक्षीत आहे?? त्या समाजाचा ह्या कायद्याकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे??)