मंगळवार, जून ०७, २०११

'लोक'मत

महाराष्ट्रात सुरु झालेल्या पेपर वॉरची गंमत आमच्या घरा पर्यंतही पोहचली. शनिवार रविवार औरंगाबादला पोहचल्यावर जाणवलेला सगळ्यात सुखद बदल म्हणजे लोकमतची घरातून हकालपट्टी झालेली होती. लोकमतच्या साथीला किती तरी पेपर आले आणि गेले, तरी पण आमच्या घरातून निदान गेली १५ वर्ष तरी लोकमत काही हलत नव्हता. दिव्य मराठीने हे काम करुन दाखवले. दिव्य मराठीच्या लॉन्चची तशीही जोरदार तयारी करण्यात आली होती. वातावरण निर्मितीचे प्रयत्न जोरदार होते. सुरवातीला आलेला सर्व्हे, त्यानंतर वाटलेली औरंगाबादची माहिती सांगणारी डायरी, २०० रुपयांत वार्षिक नोंदणी, असे एक ना अनेक मार्केटिंग गिमिक्स वापरण्यात आले. जालावरही बेरक्या आणि बातमीदार या आणि अशाच ब्लॉग्जनी वातावरण पेटवायला सुरवात केली होती. या ब्लॉग्ज वरुन अजून एका सद्या अद्ययावत न होणार्‍या ब्लॉगची आठवण नेहमीच होते. ;) अर्रर्र... इतकं काही लिहिलं आणि जो किस्सा सांगायचा होता तो तर राहूनच गेला..

शनिवारी दुपारी मस्त आमरस चेपुन तंगड्या वर करुन पडलेलो असताना घरातला फोन खणखणला. मनातून खूप शिव्या द्यायची इच्छा असतानाही कशी तरी दाबून मोठ्या कष्टाने फोन उचलला आणि आवाजात शक्य तितके मार्दव आणून बोलायला सुरवात केली.

मी : हॅलो
(समोरुन एक लाडिक आवाज)
सः हॅलो सर, मी लोकमत मधुन बोलतेय.
(आईला, ओssss म्हणजे आमच्या मातोश्रींना लोकमत सखी मंच चे बक्षीस वैगेरे लागले का काय??? मागे काकूला अशीच चटई मिळाली होती.........)
सः हॅलोs
मी: (भानावर येत) हां बोला..
सः सर तुमच्या घरचा लोकमत अशात बंद केला आहे???
मी: (आनंदून) हो हो. आम्ही बंद करुन टाकला तुमचा पेपर, एक महिना झाला.
सः सर एक मिनिट होल्ड करा, मी आमच्या साहेबांकडे फोन देते.
साधारण एखादा मिनिट मला ताटकळत ठेवल्या नंतर समोरुन बराच वेळ रिसीव्हरशी कोणीतरी खेळत बसले आहे असे मला वाटायला लागले. काय शिंची कटकट आहे. यांचे पेपराचे गठ्ठे परत जायला लागले तर आमची झोप का घालवताय???
तेवढ्यात समोरुन,
वि: नमस्कार साहेब मी वितरण व्यवस्थापक बोलतोय, आपण आपल्या घरी येणारा लोकमत का बंद केला???
मी: तुम्हाला खरच या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे आहे???
वि: हो साहेब. आम्हाला समजाऊन घ्यायचे आहे की आमच्या काय चुका झाल्या??? तुम्ही पेपर कधी बंद केला आणि तुमच्या कडे किती वर्ष लोकमत येत होता?
मी: आमच्या कडे गेली किमान १५ वर्ष लोकमत यायचा. साधारण एक महिना आधी आम्ही लोकमत बंद केला.
वि: सर कारण सांगु शकता???
(आता हा माणुस एवढ्या प्रेमाने विचारतोच आहे तर म्हणुन आम्ही आमची गाडी चालु केली)
मी: सर्व प्रथम बातम्यांचा खालावलेला दर्जा. आजकाल तुम्ही काय छापताय याचे भान तुम्हाला राहिलेले नाही. जास्तीत जास्त पेड न्युज देण्याकडे तुमचा कल आहे.
दुसरे म्हणजे बाबुजींनी आज एका सलूनचे उद्घाटन केले या आणि अशा सारख्या बातम्यांनीच तुमचे ते हॅलो भरलेले असते. जागा मिळालीच तर साथीला कोणत्या तरी जैन साधुंचे प्रवचन वगैरे कुठे झाले याच्या बातम्या छापता.
संपादकीय पानाबद्दल म्हणाल तर तुमच्या कडून कॉंग्रेसचा धोरणांचाच प्रसार होणार अशी मानसिक तयारी आम्ही केलेली आहेच.
तुमच्या पेपराची 'मंथन' नावाची एक पुरवणी आहे. सध्या तुम्हालाच अर्थात मंथन करायची गरज आहे. पण एकदा रविवारची पुरवणी कशी असावी म्हणुन लोकसत्ता कडे पहा. तुमच्या सातही दिवसांच्या अंकांमधे साहित्य, कला, संगीत क्षेत्राला किती महत्व दिले जाते याचा अभ्यास करा.
(एवढे बोलुन मलाच दम लागला)
वि: सर तुम्ही सांगितलेल्या बर्‍याच सुचनांवर आम्ही विचार करत आहोत. पण काय आहे सर काही बातम्या आम्हाला द्याव्याच लागतात. बाबुजीचा पेपर असल्यामुळे त्या बातम्या आम्ही देणारच.
मी: त्याचे योग्य प्रमाण तुम्ही राखु शकता. आणि माझ्या सुचना अजुन संपलेल्या नाहीत. पण जाऊ द्या तुम्ही वितरण विभागाचे, आणि माझ्या सुचना ह्या संपादकिय विभागा बद्दल जास्त आहेत.
वि: तुम्ही संपादकिय विभागातील आमच्या प्रतिनिधीस तुमच्या सुचना द्यायला इच्छुक आहात का?? तुमचे नाव काय??
यानंतर मी माझे नाव, पत्ता वगैरे त्यांना दिला, संपादकीय विभागाचे प्रतिनीधी आता घरी प्रत्यक्ष भेटायला येणार आहेत म्हणे.

या सगळ्यांतून एवढेच लक्षात येते की लोकमतचे गठ्ठे खरोखरच परत जात आहेत. दिव्य मराठी मला तितकासा आवडला नाहीच. त्याचे स्वरुप हे लोकमत आणि संध्यानंदचे मिश्रण असल्या सारखेच आहे. चाळीस पानांचा पेपर काढायचा म्हणल्यावर तशाही टेबल न्युज द्याव्याच लागणार. पण एकूणच लोकमतची औरंगाबाद विभागातली एकाधिकारशाही मोडीत निघाली हेच म्हणावे लागणार. स्वागतमुल्य एक रुपया करुन इतरांना जेरीस आणणार्‍या लोकमतालाही कुणीतरी सव्वाशेर मिळाला यातच समाधान.

बुधवार, ऑगस्ट ०४, २०१०

"कांदा बटाटा 'बॅचलर' रस्सा"

नमस्कार मंडळी,
काय दचकलात ना??? आधी तर निखिल देशपांडे हे नाव बोर्डावर बघुन आणि तेही पाककृती या विभागात. पण होते असे कधी तरी चुकुन एखाद्या गोष्टीचा इतका वैताग येतो की आजवर न मनावर घेतलेल्या गोष्टिंकडेही तुमचे सहज लक्ष जातेच. गेले दोन तीन दिवस मिपा वर जो काही धुडगुस चालु आहे त्याचावर आधी भरपुर हसुन घेतले मग थोडा कंटाळा आला आणि शेवटी तर वैताग आला. पण या सगळ्या व्यापातुन आम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवली "स्वयंपाकेविण बिंपाक अवघड आहे". कोण रे तो??? नक्की पराच असेल, म्हणतोय कसा बाई ठेवायची स्वयंपाक,बिंपाकाला. आहो प्रत्येकाला जमते का असे??? आता आमचा बिकाच बघा ना आज मुंबई, उद्या पुणे, परवा दुबई, तेरवा अजुन कुठे??? प्रत्येक ठीकाणी त्याने स्वयंपाकाला बाई ठेवली तर!!!!! ;) यावर बिकाने उपाय शोधलाच आहे पहा खुप आधीच त्याने कांदा टोमॅटोची 'बॅचलर' भाजी... उर्फ सुगरण्याचा सल्ला लिहुन ठेवला आहेच. अरे या बॅचलर भाजी वरुन आठवले ते आमचे चोता दोन(माफ करा राव, पण हे असेच लिहावे वाटते). दोन्याची तर म्हणे उपासाच्या सारख्या स्पेशल स्वयपांकाची मास्टरी आहे. त्यांची उपवासाची साबुदाण्याची बॅचलर थालिपीठे ... उर्फ डॉन्याचा सल्ला.. हे सगळे बघुन आम्ही ही घेउन आलो आहोत "कांदा बटाटा 'बॅचलर' रस्सा... उर्फ निख्याचा सल्ला ".

तर मंडळी आम्ही स्वयंपाक काय करायचा असा विचार करुन मिपाच्या समृद्ध पाककृती विभागात शिरलो. सर्व प्रथम पेठकर काका, गणपा अश्या जेष्ट बल्लवाचार्यांना प्रणाम करुन घेतला, मग स्वाती ताई, जागु, दिपाली पाटील यांचा पाककृतीचे स्मरण केले. पण आमच्या डोळ्यासमोर एकच पाककृती दिसत होती. जाई ताईंची "रावणी पिठले". सगळी पाककृती तिनदा वाचुन आम्ही लॅपटॉप ला ओट्यावर स्थानापन्न केले. आणि साहित्य शोधायला लागलो आणि आमच्या समोर एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहीले.. १ वाटी डाळीचे पिठ अरे पण कोणत्या??? पहिल्यांदाच स्वयंपाक करणार्‍या नवशिक्यांनी कसे ओळखायचे कोणत्या डाळीचे ते. पहिले आठवली तुर दाळ पण मग आठवला चुचु चा धागा ज्यात तिने तुर डाळ महाग झाल्याने आम्ही कोब्रा गोड वरण भात कसे खाणार असा जागतिक प्रश्न उभा केला होता. पण याचाच अर्थ तुर डाळ वरणासाठी वापरातात, मग अचानक आठवले की अमरावतीकडे पिठल्याला बेसनही म्हणतात. मग बाजारातुन मुंबई बेसन आणावे लागेल. पण आणणार कोण??? मी??? शक्यच नाही. एकतर स्व्यंपाक करुन मी माझ्यावरच उपकार करतोय. खरे तर माझा आयडी आळश्यांचा राजा असायला हवा होता पण तो आधीच घेतलेला आहेच. मग शोधाशोध करत असताना आमच्या लक्षात आले की घरात फक्त कांदे आणि बटाटे आहेत.त्यामुळे उरला एकच ऑप्शन कांदा बटाटा रस्सा.

साहित्य :
३ मध्यम बटाटे
१ मोठा कांदा
३-४ मिरच्या
३-४ लसणाच्या पाकळ्या
अर्धा इंच आलं
तेल तुमच्या डायटनुसार

कृती
सर्व प्रथम बटाटे, कांदे एकसारखे चिरुन घ्यावेत. खास बॅचलर लोकांसाठी सुचना कांदे धुउन चिरायला घ्या उगाच जास्त रडावे लागणार नाही. आता बॅचलर असल्यावर घरात मिक्सर असण्याची शक्यता कमीच अश्या वेळेस जास्त टेन्शन घ्यायचे नाही. मिरच्या बारीक चिरुन घ्यावा त्याच सोबत लसणाचा पाकळ्यांचे सुद्धा बारिक तुकडे करुन घ्या. आता एका ताटात मिरच्या, आले लसुण ठेवुन त्याला वाटीने व्य्वस्थीत ठेचुन घ्या, छान एकजीव होई पर्यंत हे करत रहा. आता एका कढई मधे नेहमी प्रमाणे फोडणी तयार करा. तेल हे तुमच्या अंदाजाने आणि तब्येती नुसार टाका. बॅचलर लोकांनो एकटेच खाणार असाल तर हे तेल थोडे जास्त झाले तरी हरकत नाही, हळुहळु अंदाज जमेल. त्यात मोहरी, जिरे हे तुमच्या अंदाजा नुसार टाकावेत. मोहरी फुटल्या नंतर कांदा हा मिश्रणात टाकुन लालसर परतवुन घ्यावा. आता पुढे यात तुमच्या अंदाजा नुसार आधी तुम्ही तयार केलेला कांदा लसण आल्याच ठेचा टाकावा, नंतर गरम मसाला एक चमचा, पावभाजी मसाला असल्यास तोही एक चमचा टाकावा, एकवार सगळे परतुन घ्यावे. त्यानंतर तुमच्या कॅपॅसिटी नुसार तिखट टाकावे, आधीच तीन- चार हिरव्या मिरच्या आहेत त्यामुळे लाल तिखटाचा अंदाज घ्यावा. आम्ही चार चमचे तिखट टाकले होते. त्यानंतर यामधे बटाटे टाकुन साधारण एक-दिड मिनिटे परतवुन घ्यावा. परतुन झाल्यानंतर वरुन एक वाटी पाणी अ‍ॅड करावे. आणि मग मंद आचेवर बटाटा शिजे पर्यंत ठेवावा. एवढे सगळे झाल्यावर अचानक तुम्हाला आठवेल तुम्ही भाजीत मिठ विसरलात. पण कहई हरकत नहई तुम्ही आताही मिठ अ‍ॅड करुच शकता. मिठ साधारण एक चमचा ठीक असेल. तर साधारण पाच दहा मिनिटाने एका पठीवर एक बटाटा घेउन तो चमच्याने दाबुन शिजला आहे का ते तपासुन घ्या. शिजला असेल तर तुमची भाजी तय्यर पटापट एखाद्या प्लॅट किंवा वाटी मधे वाढुन घ्या आणि खायला लागा.








टिपः भाजीतले प्रमाणे एकामाणसा साठी थोडी जास्त आहेत. दोन माणसांना पुरु शकेल.

चला आता पळतो आम्ही... उद्या लवकर उठायचे आहे पण तसेही नॅचरल आलारामाची (अलार्म म्हणने जमणार नाही) सोय भाजीने केलीच आहे.

शनिवार, जुलै ०३, २०१०

ब्राझिल वर्ल्डकपच्या बाहेर पडल्यामुळे तसेही या मॅच मधे फारसे लक्ष नव्हतेच...


तसेही मॅच घाना आणि उरुग्वे यांचा मध्ये होती...

घाना आफ्रिकेतला उरलेला शेवटचा स्पर्धक देश... मॅचचे पहिले ९० मिनिट आणि एक्स्ट्रॉ टाईम चे २९ मिनिट चांगले झालेच.. दोन्ही संघ आक्रमक होतेच आणि शेवटच्या काही मिनिटांत तर घाना सतत उरूग्वेच्या हाफमध्येच होता. पण खरा थरार घडला तो सामना संपायला काही सेकंद बाकी असताना... घानाला एक फ्री कीक देण्यात आली. स्टीव्हन अ‍ॅपीया ने केलेला प्रयत्न उरूग्वेच्या सोरेझने अडवला , पण तो हाताने. आणि अगदी मॅचच्या शेवटच्या सेकंदाला घानाला एक पेनल्टी कीक आणि सोरेझला रेड कार्ड मिळाले.



असीमोल ग्यान, घानाचा सर्वोत्कृष्ट स्ट्रायकर ही पेनल्टी घ्यायला उभा राहिला आणि घानाच्या बाजूने मैदानात विजयाचा जल्लोष सुरू झाला. सार्‍या आफ्रिकेच्या आशा खांद्यावर घेऊन ग्यानने ही कीक घेतली पण हाय रे दुर्दैवा.. बॉल साईडबारला जाऊन भिडला.. आणि रेड कार्ड घेऊन बाहेर जाणार्‍या सोरेझने आणि अर्थातच उरूग्वेच्या सर्व समर्थकांनी जल्लोष केला..
 

सामना अर्थातच पेनल्टी शूट आऊट मध्ये गेला आणि एक सुवर्णसंधी गमावल्यानंतर जे होते तेच झाले... घानाने सामना गमावला.. ग्यान हिरो टू झिरो झाला.. त्याचबरोबर धिस टाईम फॉर आफ्रिका असे गाणे म्हणत आफ्रिकेतला एखादा संघ जिंकावा ही आशा संपुष्टात आली.

मंगळवार, जून १५, २०१०

जस्ट फॉर फन



पुस्तक: Just For Fun: The Story Of An Accidental Revolutionary

लेखक: Linus Torvalds

भाषा: इंग्रजी

किंमत: 554.00

पृष्ठसंख्या: 288




कॉलेजात असतानाची गोष्ट, घरात संगणक येऊन साधारण सात-आठ महीने झाले असतील. तेवढ्या दिवसात तीन-चार वेळा फॉर्मेट पण करुन झाले. त्यामुळे ओ.एस इन्स्टॉल करायची सवय झालीच होती. एक दिवस मित्र घरी आला. येताना हातात ३ सीडीज होत्या. "लिनक्स आणले आहे, करायचे का इन्स्टॉल??" या प्रश्नाचे उत्तर न कळत हो असेच गेले. त्या आधी लिनक्स कधी वापरले नव्हते. आधीच माझ्या कंप्युटरवर विंडोज ९८ आणि एम ई किंवा एक्स पी अश्या दोन ओएस होत्या. तिसरी ओ. एस. टाकण्याचा नादात त्या दिवशी आम्ही कंप्युटरची वाट लावली हे सांगायला नकोच. तेव्हाच मी या माणसाचे नाव पहिल्यांदा ऐकले. जसजसे लिनक्स वापरायला लागलो, तसतशी याच्याबद्दल नवीन नवीन माहिती कळत गेली. त्याचे नाव मधुनमधून मॅगेझिन्समधून सर्वत्र वाचायला मिळायचेच. नोकरीला लागल्यावर ऑफिसात जर एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी कुणी लिनक्स रिस्टार्ट करायचा सल्ला दिला तर त्याच्याकडे बघुन "ऐसा करेगा तो लिनस जान दे देगा.." हे तुच्छतेने म्हणण्यातली मजा वेगळीच!!!

कोण हा लिनस?? हा लिनस म्हणजे लिनक्स या संगणक प्रणालीचा पहीला कर्नल लिहिणारा माणुस. "जस्ट फॉर फन" हे त्याचेच आत्मचरित्र!!


"I was a nerd. Geek. From fairly early on. I didn't duct-tape my glasses together, but I might as well have, because I had all the other traits. Good at math, good at physics, and with no social graces whatsoever. And this was before being a nerd was considered to be a good thing." -- Linus Torvalds


जस्ट फॉर फन हे लिनस टॉरवल्ड्स यांनी डेविड डायमंडच्या सहकार्याने लिहिलेले लिनस यांचे आत्मचरीत्र. या पुस्तकात लिनस हे आपल्या आयुष्याबद्दल सांगतातच, त्याच सोबत डेविड डायमंड सुद्धा लिनस आणि त्यांच्या कुटुंबासोबत आलेले अनुभव सांगतात. लिनक्सची व्यक्तिगत माहिती म्हटले तर, त्यांचा जन्म २८ डिसेंबर १९६९ ला हेल्सिंकी या फिनलन्ड च्या राजधानी चा शहरात झाला. त्यांचे पालक निल्स आणि अ‍ॅना हे दोघेही पत्रकार होते. लिनस चा परिवार हा फिनलन्ड मधल्या स्विडीश बोलणार्‍या अल्पसंख्याक समुहाचा भाग होता ही गोष्ट माहीती नसल्यामुळेच त्याचा सुरवातीच्या काळात त्याचा "लिनक्स" चा उच्चारसमजण्यास लोकांना त्रास होत असे. लिनस हे लहानपणापासुन गणितात हुषार होते. त्यांच्यावर सुरवातीच्या काळापासुन त्यांच्या आजोबांचा बराच प्रभाव होता. त्यांचे आजोबा हे युनिवर्सिटी ऑफ हेल्सिंकी मधे स्टॅटिस्टीकचे प्राध्यापक होते. लिनस यांनी १९८८ मधे युनिवर्सिटी ऑफ हेल्सिंकी मधे कॉम्प्युटर सायन्स शिकण्यास सुरवात केली. त्याच काळात त्यांनी ईंटेल ३८६ सिरीजचा कॉम्प्युटर घेतलेला होता. त्यावर त्यांनी मिनिक्स ही युनिक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टिम वापरायला सुरवात केली. कॉम्प्युटर क्षेत्रात शिक्षण घेतलेल्यांना अ‍ॅन्ड्र्यु टॅननबॉमचे नांव माहित नसेल तर नवलच . तर मिनिक्स ही त्याच टॅननबॉम यांची ओ एस.


लिनसना मिनिक्स प्रणाली वापरताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्याच सोबत त्यांच्या समोरची सर्वात मोठी अडचण म्हणजे लिनस यांना त्यांचा विद्यापीठाच्या नेटवर्क मधल्या कंप्युटरला जोडण्यासाठी लागणारा टर्मिनल एमॅल्युएशन चा प्रॉग्राम मिनिक्स मधे उपलब्ध नव्हता. हाच प्रॉग्राम लिहिण्याचे लिनस यांनी ठरवले आणि तीच लिनिक्स च्या निर्मीतीची पहिली पावले होती. लिनस यांनी लवकरच तो प्रॉग्राम पुर्ण केला त्यानंतर या प्रॉग्राम सोबतच त्यांना या सोबत फाईल ट्रान्स्फर सारख्या इतर गोष्टी करण्याची गरज जाणवत गेली आणि असेच हळू हळू लिनक्सची निर्मिति झाली. लिनक्स यांनी ऑगस्ट २००१ मधे ते एका मोफत ओ.एस. वर काम करत असल्याचे जाहीर केले आणि त्याचपाठोपाठ संप्टेबर २००१ मधे लिनक्सचा पहीला कर्नल ०.०१ वापरासाठी खुला करण्यात आला. आणि पुढचा सगळा इतिहास सर्वज्ञात आहे.


जर तुम्ही नॉन टेक्निकल असाल, तर या पुस्तकात खुप जास्त टेक्निकल भाषा असेल आणि आपल्याला काही कळणार नाही असा समज करुन घ्यायची काही गरज नाही. सामान्य वाचकासाठी लिनसच्या आयुष्याची कथा निश्चितच आवडेल अशी आहे. लिनस यांनी त्यांना यश मिळुनही आपले पाय जमीनीपासून हलू दिले नाहीत हे त्यांनी स्वतःवरच केलेल्या विनोदावरुन वेळोवेळी दिसुन येते. त्याच सोबत लिनस यांनी त्यांचासाठी जीवनाची व्याख्या काय हे देखील जाताजाता नमूद केले आहे.
टेन्किकल वाचकांसाठी लिनसच्या या कथेसोबतच इतर बर्‍याच गोष्टी आहेत. त्यात लिनक्स, ओपन सोर्स आणि संगणक जगताच्या भविष्याबद्द्ल लिनस यांचे विचार वाचण्यालायक आहेतच. त्याच सोबत त्याचा अ‍ॅड्रु टॅननबम यांचाशी झालेला प्रसिद्ध वादाबद्दल्च्या माहीतीतुन बरेच काही शिकण्यासारखे आहेच. कोणत्या प्रकारचे कर्नल चांगले आहेत, या बद्दलच्या या वादाबद्दल अधिक माहीती या दुव्यातुन मिळु शकतेच. या सगळ्यात लिनसच्या लेखणीतून आलेले काही निबंध देण्यात आलेले आहेत तो भाग रटाळ वाटण्याची शक्यता आहे. पण एकूणच लिनक्सच्या निर्मीतीची ही कथा


शुक्रवार, जून ११, २०१०

वी आर द चॅम्पियन्स

फिफा वर्ल्ड कप आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. परत तोच थरार अनुभवायला आपण तयारच आहोत. आता प्रत्येक खेळाडू आपल्या देशाला जिंकवण्यासाठी कौशल्याची बाजी लावेल. कारण इथे प्रत्येक जण आलाय तो चॅम्पियन होण्यासाठीच. क्वॉलिफायर्स पार करुन आता ३२ संघ सज्ज झाले आहेत उद्यापासुन होणार्‍या लढतींसाठी. तशी, प्रत्येक वर्ल्ड कप ची एक खासियत म्हणजे त्यांचे थीम साँग्ज आणि मॅस्कॉट्स... वर्ल्ड कप ची गाणी आपण ऐकतोच पण प्रत्येक वर्ल्ड कप चा शुभंकर हा त्या देशाच्या संस्कृतीचे प्रतिक असतो म्हणायला हरकत नाही!


We are the champions - my friends

And we'll keep on fighting - till the end -

We are the champions -

We are the champions

No time for losers

'Cause we are the champions - of the world


वी आर द चँपियन्स या गाण्याला क्रीडाक्षेत्रात विजयगीताचा बहुमान तर आधीपासूनच होता, आणि १९९४ च्या अमेरिकेत झालेल्या वर्ल्ड्कपच्या वेळेस त्याला ऑफिशियल गीत म्हणून गौरवले. "वी वील, वी वील, रॉक यू" म्हणता म्हणताच क्वीन हा बँड "वी आर द चँपियन्स " सारखे गाणं आपल्याला देऊन जातो. आता गाण्याबद्दल काही अधिक न लिहिता आपण सरळ व्हिडिओचा लुफ्त घेऊयात.







याच वर्ल्डकप चा मॅस्कॉट होता स्ट्राईकर :- द वर्ल्ड कप पप.

म्हणजेच अमेरिकेतल्या घराघरातला पाळीव कुत्रा. त्याला लाल निळा आणि पांढरा असा टीशर्ट घातला आहे. आणि त्याच्या  टी शर्ट वर "USA 94" हे स्पर्धा वर्ष आणि देशाचं नांव ही आहेच.
त्यानंतर आला १९९८ चा वर्ल्ड कप. हा होणार होता फ्रान्स मधे. या वर्ल्ड कप चा मॅस्कॉट होता फुटिक्स. त्यावर्षीच्या यजमान फ्रान्स यांच्या निळ्या रंगा सारखाच संपुर्ण शरीर असलेला कोंबडा म्हणजेच फुटीक्स. याच्याही छातीवर "FRANCE 98" असे शब्द होते.आणि त्या वर्ल्ड कप चे ऑफिशियल गाणे होते रिकी मार्टीनचे "द कप ऑफ लाईफ". या गाण्याने रिकी मार्टीन घराघरात पोहचला. गाण्यात तीच खेळभावना आपल्याला दिसुन येते आणि कुठल्याही देशाच्या खेळाडूचे मनोधैर्य वाढवण्याचे काम अशी गाणी करतात.

The cup of life, this is the one.
Now is the time, don't ever stop
Push it along, gotta be strong.
Push it along, right to the top

या ओळी बरेच काही सांगुन जातात म्हणुनच म्हणावेस वाटते... गो, गो, गो, आले आले आले....





मधल्या दोन वर्ल्ड कपची ऑफिशियल गाणे म्हणजेच २००२ च्या कोरिया-जापान वर्ल्ड कपचे अ‍ॅनॅस्टिशिया या पॉप गायिकेचे "बुम" आणि जर्मनीत २००६ साली झालेल्या वर्ल्ड कपचे "टाईम ऑफ आवर लाईफ" हे मला कधीच तितकेसे भावले नाहीत.. पण या वेळेसचा वर्ल्डकपचा काउंटडाउन सुरु झाला आणि ई एस पी एन वर "वेविंग फ्लॅग्स" लागायला सुरवात झाली. या गाण्याने मनात वर्ल्ड कपची उत्सुकता पुन्हा एकदा नव्याने भरास आली. हे गाणे फिफाचे ऑफिशियल गाणे नाही हे कळाल्यावर दु:खही झाले. या गाण्याबद्दल इतक्या वेळा लिहिलं गेले आहे त्यामुळे पुनरूच्चार टाळतोय.


आफ्रिकेत होणार्‍या या वर्ल्डकपचा मॅस्कॉट आहे झकुमी नावाचा एक चीत्ता. याचे केस हिरवे आहेत आणि त्याने घातलेल्या टिशर्ट वर "SOUTH AFRICA 2010" लिहिलेले आहे. त्याचा असलेला हिरवा आणि पिवळा रंग हे साऊथ आफ्रिकेच्या राष्ट्रिय संघाच्या पोषाखा सारखेच आहेत.
आता जाता जाता या वेळेसच्या ऑफिशिअल गाणे आहे "वाका वाका" शकिराने गायलेल्या गाण्यात "वेविंग फ्लॅग्स" ची जादु नसली तरी हे गाणे सुद्धा चांगलेच आहे. "धीस टाईम फॉर आफ्रिका" असा संदेश देणारे गाणे नक्कीच आवडण्या सारखे आहेच.




This time for Africa असेच म्हणत आता किक- ऑफ ची वाट पाहयची आहेच. तो पर्यंत ही व इतर काही गाणी एकत बसायचा विचार आहेच.



गुरुवार, जून १०, २०१०

साखरेचं खाणार!!!

"साखरेचं खाणार त्याला देव देणार", हे अस्मादिकांच्या बाबतीत एकदम खरं ठरतं.किंवा इंग्रजीत शुगरटूथ की का काय म्हणतात तोच घेऊन जन्माला आलो म्हणा ना!!! गोड पदार्थ म्हणजे आपला एकदम जीव की प्राण. अगदी लहानपणी मला आजी, आई सगळेजण गोडघाशा म्हणूनच हाक म्हणायचे. म्हणजे माझे गोडाचे वेड इतके होते की कधी कधी आई झोपल्यावर हळूच डबा काढून चोरुन साखर खायचो. बरेच वेळा पकडलाही जायचो.(अजूनही खातोच.. पण आता पकडला जात नाही. ;)) त्या साठी अगदी आईच्या हातचे धपाटे पण अनेक वेळा खाल्लेत. आता जर मला कोणी विचारले "तुझा आवडता गोड पदार्थ कुठला?" तर उडुप्याच्या हॉटेलातल्या पोर्‍यासारखी लांबलचक यादी म्हणून दाखवेन!!!!!

आमच्या गोड खाद्ययात्रेची सुरवात झाली जालन्यापासुन. आमचे घर अगदी भर चौकातच होते. घराचा खालीच एक हॉटेल होते. तिकडे रोज सकाळी खवा पोहचवायला दुधवाले यायचे. यातल्या दुधवाल्यांकडुन आई खवा विकत घ्यायची. मग व्हायचा तो गुलाबजामुन बनवायचा एक राजेशाही कार्यक्रम. गुलाबजामुन मी कितीही आणि केव्हाही खाऊ शकतो. एक मात्र खरं, आईच्या हातच्या गुलाबजामुनची चव कधी बाजारातल्या गुलाबजामुनला कधीच नाही येणार. आमच्या घराखालच्या हॉटेलाची आणखी एक खासियत म्हणजे बालुशाही. अप्रतिम अशी बालुशाही इथे मिळायची. माझ्या मुंजीच्या वेळेससुद्धा इथल्याच आचार्‍याकडुन बालुशाही बनवुन घेतलेली.

जालन्यातली अजुन एक आठवण म्हणजे आजीच्या हातच्या पाकातल्या पुर्‍या. आहाहा!!! आतापण त्या पुर्‍यांची चव जीभेवर रेंगाळतेय. आजी अनारसे पण मस्त करायची. एकदा आमच्या ओळखीच्या जोशी काकूंकडे गेलो होतो. त्या खाली जमिनीवर बसून स्टोव्ह समोर ठेऊन अनारसे करत होत्या. त्याचा दुसर्‍याच दिवशी आईच्या मागे लागुन अनारसे बनवायला लावले. माझ्या हट्टापायी आईने अनारसे बनवले. पण मी ते खायला तयार नव्हतो. कारण काय तर आईने जोशीकाकूंसारखे खाली बसून अनारसे नव्हते बनवले. :D तसं जालन्याला मला बाहेरचे गोड खाल्याचं आठवत नाही.

बाबांच्या होणार्‍या सततच्या बदलीमुळे अमरावती-नागपुर्-अमरावती असा प्रवास घडलाच. त्यामुळे जिथे जिथे राहिलो, तिथं कुठे काय छान गोड मिळतं, याची एक जंत्रीच आहे म्हणा ना माझ्याकडे. जसं अमरावतीच्या रघुवीर मिठाईयाँ मधली काजुकतली तर अप्रतिमच होती. नागपुर मधे खाल्लेली हल्दीरामच्या सोनकेकची चव अजून आठवते. त्यावेळेस हल्दीराम अमेरिकेत पोहचले नव्हते. चिखलदर्‍या जवळ मेळघाट मधे सेमाडोह येथे जी रबडी खाल्ली तशी रबडी आजगायत नाही खाल्ली हो!! त्यानंतर औरंगाबाद मधे मिलन मिठाई मधली बर्फी किंवा अप्पा हालवाईचा पेढा जबरदस्त होता. उत्तममधल्या सारखी इमरती तर कुठेच मिळत नाही. आजही औरंगाबाद ला गेल्यावर बरेच वेळा उत्तममध्ये जाऊन इमरती घेऊन येतो.

पेढ्यावरुन आठवतो तर कुंथलगिरीचा प्रसिद्ध पेढा. हो हो.. तोच तो. अनासपुर्‍यांच्या मक्याने प्रसिद्ध केलेला.. (च्यायला, याच्या नावांत पण पुर्‍या याव्यात का?) कुंथलगिरी बीड जिल्ह्यातले एक छोटेसे गाव. पण तिथला कलमी पेढा म्हणजे काय विचारुच नका. ह्या गावावरुन कुठेतरी एकदा गेल्याचे आठवते. हायवेच्या दोन्ही बाजुला फक्त खव्याची व चक्क्याचीच दुकानं. हे कुथंलगिरीचे प्रसिद्ध पेढे खुलताबादच्या भद्रा मारूती मंदिरातसुद्धा जाऊन पोचलेत. भद्राला गेलो आणि पेढे आणले नाहीत असे कधीच झाले नाही. पेढ्याची आणखी एक आठवण म्हणजे आंबाजोगाईतील योगेश्वरी देवीच्या मंदिराबाहेरील कलमी पेढे. घरात पेढे आणलेले असले तर आईच्या हातात यायचा तो रिकामा डब्बाच.

गोड म्हटले की काय बोलू नि काय नको असे होऊन जाते बघा..हेच पहा ना, सगळं लिहिलं, पण माझ्या सगळ्यात आवडत्या पदार्थांबद्दल कुठे काय बोललो? तर, सगळ्यात महत्त्वाचे दोन गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी आणि श्रीखंड. आमच्या घरात सगळेच पुरणपोळीचे शौकिन. घरी पुरणपोळी वर्षातुन कितीही वेळा बनवली तरी नेहमी आईला त्रास द्यायला मी म्हणणार, "पुरणपोळी खाऊन खुप वर्ष झाली ग आई". नि मग तिने पटकन पोळ्या बनवायला घ्याव्यात हे पण आलेच. :) होळी, श्रावणातला शुक्रवार, नवरात्रात नवमीला, पुरणपोळी बनतेच बनते पण सर्वात वेगळ्या चवीची बनते ती फक्त महालक्ष्मीच्या (गौरीच्या) नैवेद्याची!!! आमच्याकडे नेहमी स्पर्धा लागते कोण सगळ्यात जास्त पुरणपोळी खाते याचीची. जिंकतो अर्थात मीच. पण ती तव्यावरुन गरम सरळ पानात वाढलेली त्यावर मस्त तुपाची धार सोडलेली पुरणपोळी मी कोणत्याही वेळेस खाऊ शकतो. तशीच शिळी झालेली पुरण पोळी पण मी कितीही पोट भरलेले असेल तरी खाऊ शकतो.

श्रीखंड मला आवडते ते चक्क्यापासुन घरी बनवलेले. काही ठराविक दिवशी श्रीखंड बनलेच पाहिजे असा अलिखित नियमच आहे म्हणा ना!!! मग माझ्याकडे यातली दोन कामं येतात. एक म्हणजे औरंगाबाद्ला भावे आणि कं कडुन चक्का घेउन येणे आणि दुसरे म्हणजे चक्का पुरण यंत्रातुन काढुन देणे. साखरभात हाही माझ्या आवडत्या पदार्थापैकी एक आहे.

काही विचित्र पदार्थ सुद्धा मी गोड खायची इछा झाल्यावर खातो. दाण्याचं कुट-साखर ही त्यातलीच एक. कधी गोड खायची इच्छा झाली व काहीच सापडत नसेल तर सरळ वाटीत शेंगदाण्याचं कुट घ्यायचं, त्यात थोडी पिठी साखर टाकायची किंवा साधी साखर टाकायची झाली, की आमची स्वीट डिश तयार. याच प्रकारचा शेंगदाण्याचा लाडु, साबुदाण्याचे लाडु असं काहीही कधीही मला चालतं. एक गडगिळ नावाचा पदार्थ आहे, त्याची पाककॄती मला माहित नाही, पण गुळ आणि कणिक ह्या पासुन बनवतात असे वाटते. आजीच्या हातचा खाल्लेला तो पदार्थ आजही आठवतो. तसं म्हणायचे तर फक्त खीर हा प्रकार मला फारसा काही आवडला नाही. आता बंगाली मिठाई वगैरे खातो पण ती सुद्धा फारशी आवडत नाही.

अरे ह्या सगळ्यात आईच्या हातचा कलाकंद राहिलाच. दुध नासले की मी नाचायचो आता कलाकंद मिळणार म्हणुन. तसेच फक्की हा प्रकार म्हणजे तर विचारु नका. शाळेत असताना डब्ब्यात फक्की कितीदा नेली असेल सांगता येत नाही.
पाहिलंत, नुसतं गोड गोड म्हणेपर्यंत इतके विचार डोक्यात आले.. अजून लिहायला बसलो तर आणखी खूप होईल. पण मग तोवर समोर चितळ्यांची आंबा बर्फी बिचारी टुकूटुकू माझी वाट पाहातेय त्याचे काय?? आलोच जरा तिचा 'समाचार' घेऊन!!!

सोमवार, जून ०७, २०१०

(बिलंदरी)

कधीतरी केलेले हे विडंबन ब्लॉगावर टाकायचे राहुनच गेले होते. तेच आज ईथे टाकत आहे.

खर तर हा आमचा विडंबनाचा पहिलाच प्रयत्न. गप्पाटप्पा सदरात घालण्याचे कारण म्हणजे एक विरंगुळा म्हणुन ह्याकडे पहावे एवढाच उद्देश.

हे विडंबन एका बिलंदरीची माफी मागुन...

प्रेरणा

जालाच्या ह्या विणीवरची
ती बिलंदरी नवखी होती
ती तशी विस्मरणीय
"ईद का चाँद" होती

तीच्या ओठांवरती
बडबड पोकळ होती
अपशब्दांची तर ती
सरस्वातीच होती

न शिजलेला भात
पोळी चिवट होती
तिच्या स्वयंपाकाची ती
तर्‍हा न्यारीच होती.