मंगळवार, मे १८, २०१०

हाऊ स्टारबक्स सेव्ह्ड माय लाईफ

पुस्तक:How Starbucks Saved My life 

Michael Gill

भाषा: इंग्रजी 

आवृत्ती: First 

किंमत: 195.00 

प्रकाशक: Harper Collins India 

पृष्ठसंख्या: 265

काही पुस्तक सहज चाळताना वाचावेसे वाटतात अश्याच एका पुस्तक खरेदीत सापडलेले पुस्तक म्हणजे "How Startbucks Saved My Life:: A Son of Privilege Learns to Live Like Everyone Else” मायकल गेट्स गील ह्यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे त्यांचा एका मोठ्या जाहीरात कंपनीतले उच्चपदस्थ अधिकारी ते स्टारबक्स मध्ये कॉफी सर्व करणारे बरिस्ता ह्या प्रवासाचा लेखाजोखा आहे. आज मायकल हे अभिमानाने, आनंदाने स्टारबक्स मध्ये बरिस्ता म्हणून काम करतात.
मायकल हे न्युयोर्कर मध्ये लिहिणार्‍या प्रसिद्ध लेखक Brendan Gil ह्यांचे चिरंजीव ह्या कारणाने खरे तर त्यांना आयुष्याचा सुरवातीपासूनच सर्व सुखसोयी उपलब्ध होत्याच. पुढे येल मधून शिक्षण अर्धवट सोडल्या नंतर ते एका जाहीरात कंपनीत नोकरी सुरू करतात. साधारण पंचवीस वर्षाच्या त्यांचा करियर मध्ये ते यशाच्या एक एक पायर्‍या चढत सध्या क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून सहा आकडी पगार मिळवत असतात. पण कंपनीत तरुण रक्ताचे वारे वाहायला लागतात आणि त्यातच एका दिवशी मायकल ह्यांना कंपनीतून काढून टाकल्या जाते. ह्याच काळात त्यांचा विवाहबाह्य संबंधातून त्यांना एक मूल होते आणि ह्याच कारणास्तव त्यांचा बायकोशी घटस्पोट होतो व त्यांचा वीस वर्षापासून असलेला परिवार त्यांचा पासून दुरावतो. ह्याच काळात त्यांना ब्रेन ट्युमर असल्याचेही आढळते. अश्या प्रकारे आयुष्याचा उतरत्या काळात मायकल ह्यांचा कडे ना पैसा असतो ना त्यांचा कडे आरोग्य विमा असतो त्यात त्याच्यांवर त्यांचा गर्लफ्रेंड कडूनं झालेल्या लहान मुलीला सांभाळायची जवाबदारी असते.
काही दिवस छोटे मोठे काम केल्यानंतर तसेच जाहीरात एजन्सी मध्ये परत जायचे प्रयत्न केल्या नंतर अश्याच एका थकलेल्या दिवशी लेखक स्टारबक्स मध्ये बसून कॉफीपीत असतो. त्याच वेळेस तिथे एक २७-२८ वर्षाची एक आफ्रिकन-अमेरिकन मुलगी येऊन त्याला जॉब हवा आहे का विचारते. त्या मुलीचे नाव क्रिस्टल असते आणि ती स्टारबक्सची मॅनेजर असते. गील त्या परिस्थितीत तो जॉब स्वीकारतो आणि स्टारबक्स मध्ये सूट घालून कॉफी पिणारा माणूस हिरवा ऍप्रॉन घालून बरिस्ता म्हणून कॉफी सर्व करायला लागतो. पण हा जॉब मायकल गील साठी नक्कीच सोपा नाहीए... कारण त्याला इथे फरशी पुसण्यापासून ते कॉफी बनवण्या पर्यंत अनेक कामं शिकावे लागतात. ह्या स्टोअर मध्ये कामाला लागल्यावर गील ला आयुष्यात आजवर न अनुभवलेले प्रसंग अनुभवावे लागतात. त्याचा पेक्षा वयाने व शिक्षणाने अर्धे असणारे त्याचे सहकारी त्याचा पेक्षा जास्त चांगले काम करतात हे त्याला कळायला लागते.  ह्या सगळ्या काम करणार्‍या बरिस्तांमधे  हा एकटाच म्हातारा व गोरा असतो इतर सगळे हे तरुण आफ्रिकन अमेरिकन्स असतात. गील ह्यांचे इतर साथी त्यांना नेहमीच आदराने, प्रेमाने वागवत असतात, आणि त्यांतूनच हळू हळू त्याचे पूर्वग्रह गळून पडतात आणि उरतो तो फक्त एक साधा, आनंदी असा गील. गील ह्यांचा मधला हा बदल त्यांचा मुलांना अर्थातच खूप भावतो.
ह्या सगळ्या प्रवासात अजून एक महत्त्वाचे म्हणजे स्टारबक्स कसे चालते. त्याचा काउंटरच्या पलीकडचे जग पण आपल्याला पाहिला मिळते.   तिथे काम कसे चालते??? तिथले बरिस्ताज कोण आहेत??? त्यांचे विश्व काय हे सगळे आपल्याला जवळून अनुभवायला मिळते त्याही पेक्षा पुढे जाऊन एखाद्या  माणसाला त्याचा वर्ण जात धर्म इत्यादींच्या पलीकडे जाऊन मदत केल्यानंतर काय चमत्कार घडू शकतात हे पाहिला मिळते. ह्या पुस्तकात लेखकाची स्टाइल कुठे कुठे कंटाळवाणी वाटू शकते, त्याने आफ्रिकन अमेरिकन सहकार्‍यांसोबत दिलेल्या कामाचे दाखले. त्याला कॉफी करताना काय करावे लागते हे परत परत सांगितले आहे. ह्याशिवाय पुस्तकात  एक जाणवणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखकाने त्याचे पूर्व आयुष्य कसे वैतागवणे होते ह्याचे वर्णन करण्यापेक्षा जास्त भर हा स्टारबक्स मधल्या कामामुळे आणि तिथल्या एकंदरीत वर्क कल्चर मुळे त्याचे आयुष्य कसे सुधारत जाते ह्यावर दिलेला आहे. मायकल गील ह्यांनी लिहिलेले हे पुस्तक सर्वोत्तम नसले तरी वेगळा अनुभव देणारे आहे.

रविवार, मे १६, २०१०

अग्निसमाधीतला योगी

पुस्तक: कृष्णा:अग्निसमाधीतला योगी भांड बाबा 

भाषा:मराठी 

किंमत: 200.00 

प्रकाशक: साकेत प्रकाशन प्रा.लि. पृष्ठसंख्या: 240

 

आजच्या काळात पंचवीस वर्षाचा एक तरुण स्वतः:च्या हाताने चीता रचून अग्नीसमाधी घेतो ही एक आश्चर्याची आणि चमत्कार वाटवा अशी विश्वास न बसणारी घटना आहे. तर ही कथा आहे कृष्णा महाराज भांड ह्यांचा जीवनाची. कृष्णा ह्यांनी ज्ञानेश्वर माउलीच्या संजीवन समाधी पर्वकाळातील कार्तिक वद्य एकादशी, गुरावारी सकाळी त्यांनी त्यांचाच शेतातल्या त्रिगुणी वृक्षा खाली समाधी घेतली. जाण्यापूर्वी त्यांनी तिथेच त्यांचा ५०१ वा "कळसाचा अभंग" लिहून ठेवला होता. सकाळी जेव्हा शेतात त्यांचा गडी पोहचला तेव्हा त्याने पाहिले ते चीता पेटली होती आणि त्यावर कृष्णा महाराज पद्मासनात बसलेले होते. त्यांचा चितेशेजारीच दत्ताच्या फोटो समोर त्यांनी त्यांचा अभंगाच्या सहा वह्या ठेवल्या होत्या. ह्या सहा वह्यात मिळून एकूण ५०१ अभंग लिहिलेले होते.
औरंगाबाद जिल्हातील पैठण तालुक्यातले वडजी गावात कृष्णा ह्यांचा जन्म झाला, लहानपणापासूनच त्यांचा देवधर्माकडे ओढा होताच. त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण झालेले होते. त्यानंतर शेतीच्या कामात घरच्यांना मदत करत असताना त्यांचा देव धर्माकडे ओढा वाढलेलाच होता. साधारण २००४ च्या आसपास संन्यास घ्यायचा म्हणून ते घरातून निघून जातात पण घरच्यांचा प्रेमापोटी संन्यास घेत नाहीत. २००५ च्या आसपास ते चार धाम यात्रा करून येतात आणि त्यानंतर २००६ च्या कार्तिक वद्य एकादशीला ते समाधी घेतात. कृष्णा महाराज यांना कोणताही मानवी गुरू लाभला नव्हता. त्यांनी गावातील तरुणांना भक्तिमार्गाकडे वळवले होते त्यांना व्यसनापासून दूर करण्याचा प्रयत्न केला होता. ह्या सगळ्या गोष्टींमुळे गावात त्यांचे कौतुकही होत असे. त्यांचे अभंग हे साध्या व रसाळ भाषेत जीवन तत्त्वज्ञान सांगून जातात. खरं बोलणे आणि वागणे म्हणजे ईश्वराकडे जाणे. लोभ, अहंकार, राग ह्या शत्रूपासून दूर राहा, गरीबानं लुबाडणाऱ्या ढोंगी साधी-बुवांपासून दूर राहा. कर्मकांडात अडकू नका. श्रम हीच ईश्वरसेवा समजा असा संदेश त्यांनी आपल्या अभंगातून सगळ्यांसाठी दिलेला आहे. सामान्य माणसाचे जगणे आनंददायी व्हावे हे त्यांचा अभंगाचे सूत्र आहे.
ही कथा लिहिली आहे बाबा भांड ह्यांनी. ही कथा लिहितं असताना अनेक धोके संभवत होतेच कारण कथा नायक हा लेखकाचा सख्खा पुतण्या आहे. पण लेखकाने नायकाचे अटी उदात्तीकरण करण्याचे टाळल्याचे जाणवते. त्यांचा लेखनातून काका-पुतणे ह्याच्यात असलेल्या भावनिक नात्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखकाने अग्नीसमाधीच्या बद्दल आपले विचार व्यक्त केलेलेच आहे. "कृष्णाने हे चूक केले " ही त्यांची पहिली प्रतिक्रिया होती. "दहावी नंतर शिक्षण सोडून कृष्ण ह्यांनी शेतीवाडीकडे लक्ष न देता फक्त देव देव करणे" हे लेखकाला आवडले नव्हते असेही ते नमूद करून जातात. हे सगळे वाचत असताना लेखनातला वेगळे पणा निश्चितच जाणवतो. एकूणच एका वेगळ्याच विषयावर असलेला आणि वर्तमानात विश्वास न बसावे असे वास्तव ह्या कादंबरीत उत्तम रित्या मांडलेले आहे.

शनिवार, मे १५, २०१०

कॉलनी

पुस्तक : कॉलनी

पारधे सिद्धार्थ 

किंमत:150.00 

प्रकाशक: लक्ष्मण भागाजी पारधे चॅरिटेबल ट्रस्ट 

पृष्ठसंख्या: 192

 
मागे एकदा टी व्ही वर सिद्धार्थ पारधे ह्यांची मुलाखत पाहिली होती तेव्हा पासून कॉलनी वाचायचे मनात होतेच. मागच्या पुस्तक खरेदीच्या वेळेस हे पुस्तक समोर दिसले... सहज चाळून पाहत होतो तेव्हा मलपृष्ठावर विंदाच्या हस्ताक्षरात लिहिलेले पत्र दिसले. तिथेच त्याच वेळेस हे पुस्तक विकत घ्यायचे ठरवले आणि लगेचच वाचूनही संपवले. ह्या पुस्तकाबद्दल उत्सुकता असण्याचे सगळ्यात महत्त्वाची दोनच कारणे: एक तर मराठीतल्या नावाजलेल्या साहित्यिकांच्या संबंधी असलेले हे पुस्तक आणि त्याच सोबत सचिन तेंडुलकर बद्दल असलेलं एक खास वेगळे प्रकरण. तर ही कथा आहे कॉलनीतल्या वॉचमनच्या आणि कॉलनीत भांडे घासणार्‍या स्त्रीच्या मुलाची. पण ही कोणती कॉलनी??? ह्या पुस्तकातली कॉलनी म्हणजेच मुंबईतले वांद्रे येथील प्रसिद्ध साहित्य सहवास!!!
या पुस्तकाची कथा सुरू होते ती औरंगाबाद/ जालना जिल्हातल्या रस्त्याचा बांधकामावरून... लेखकाचे आई वडील हे तिथे दगड फोडायचे काम करत असतात. चांगल्या रोजगारीच्या संधी शोधत हे कुटुंब मुंबईत येते.. इथे काही दिवस नातेवाईकांकडे काढले जातात.. मोठे कुटुंब आणि झोपडपट्टी मधले जीवन ह्यामुळे त्यांच्या घरच्यांचे आणि नातेवाईकांमध्ये काहीतरी कुरबुरी होवून त्यांना बाहेर पडावे लागते. त्याचवेळेस लेखकांच्या वडलांना कोणीतरी बांद्रा येथे एका वसाहतीचे काम चालू आहे तिथे काम मिळू शकते असे सुचवते. तिथे काम मिळवण्यासाठी लेखकाचे वडील एकाच दगडावर दिवस भर बसून राहतात तेव्हा कुठे त्यांना साहित्य सहवासच्या बांधकामावर बिगारी म्हणून काम मिळते. अश्याप्रकारे सिद्धार्थ पारधे ह्यांचे कुटुंब साहित्य सहवास मध्ये राहायला येते. इथूनच खरी सुरूवात होते त्यांचा प्रवासाला. एका वॉचमन चा मुलगा ते आज एल आय सी मधले उच्चपदस्थ अधिकारी असा त्यांचा प्रवास नक्कीच वाचनीय आहे.
लेखकाच्या ह्या प्रवास सांगताना त्यांनी केवळ स्वतःकडे मोठे पणा घेतलेला नाहीच तर त्या सोबत त्यांचे आई वडील आणि साहित्य सहवास मध्ये राहणारे कुटुंब ह्यांचा बद्दल ठिकठिकाणी कृतज्ञता व्यक्त केलेली दिसते. असे करत असताना लेखक अनेक दाखले देतोच. कॉलेज मध्ये असताना कुटुंब मोठे राहायला जागा झोपडपट्टीत अश्या वेळेस लेखक साहित्य सहवास मधल्या अभंग बिल्डिंगच्या गच्चीवर राहत असतो, तिथेच अभ्यास करतो खरे तर ही बाब अभंग च्या रहिवाशांना नक्कीच माहीत असते पण त्याबद्दल त्यांना कोणी कधीही विरोध केला नाही उलट वेळोवेळी शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलेलेच लेखकाने नमूद केलेले आहे.
ह्याही पुढे जाऊन लेखक आपण जेवायच्या/नाष्टाच्या वेळेस मुद्दाम साहित्य सहवास मधल्या मित्रांच्या घरी जाऊन बसत होतो ही प्रांजळ कबुली देतो. सचिन तेंडुलकर बद्दल ह्या पुस्तकात एक वेगळे प्रकरणच आहे. सचिन, तेंडुलकर कुटुंबीय, त्याच्या क्रिकेटच्या मॅचेस, मंतरल्यासारख्या नि झपाटल्यासारख्या रात्री जागून ऐकलेला मॅचेस आणि असं बरंच काही. पारधेंच्या बाबांच्या मृत्यूनंतर तो सहकुटुंब सांत्वनासाठी आला होता हाही त्याच्या मनाच्या मोठेपणाचा दाखलाच. त्यांच्या त्या पडत्या काळात त्यांना गिरीजा कीर, विद्या बाळ, राजाध्यक्ष बाई, समवयस्क मित्र असे सगळ्यांचेच साहाय्य लाभले नि म्हणूनच त्याचा सध्याचा आयुष्याबद्दल लेखक म्हणतात की आज त्यांचा कडे आहे त्यात त्यांना साहित्यिकांच्या पक्षी कॉलनीतल्या चांगल्या सहवासामुळे आणि आधारामुळे आज ते ह्या पदावर पोहचू शकलेले आहेत.
लेखनाच्या ओघात काही ठिकाणी पुर्नरोक्ती सापडते पण ह्या बद्दल लेखकाने आधीच माफी मागितली आहे. एकुणंच कॉलनी वाचनीय आहे असे म्हणावेस वाटते.

रविवार, मे ०९, २०१०

श्रावण मोडकांचा तिढा

 पुस्तक:तिढा 
 लेखक: मोडक श्रावण
 किंमत: 250.00
 पृष्ठसंख्या: 296


साधारण आठ दहा महिन्यांपुर्वीचा एक विकांत... नेहमीप्रमाणे औरंगाबादला गेलो होतो. काही कामा निमित्त गावात गेलो होतो, तेव्हा बळवंत वाचनालयात एक प्रदर्शन चालू होते. सहज पावले तिकडे वळली आणि त्याच प्रदर्शनात पुस्तक पाहत फिरताना अचानक एका पुस्तकाकडे नजर गेली. लेखकाचे नाव होते "श्रावण मोडक" आणि कादंबरीचे नाव होते "तिढा". अरे हे मराठी जालावर लिहिणारे मोडक का???" हा प्रश्न मनात आलाच. पण काही कारणास्तव त्यादिवशी तिढा घ्यायची राहूनचे गेले. सोमवार पासून पुढे परत मिसळपाव वर आल्यावर सगळ्यात आधी मिसळपाव वरच्या एक-दोन सदस्यांकडे मोडकांनी कादंबरी लिहिली आहे का अशी चौकशी केली, पण फारसे कुणाला माहीतच नव्हते. शेवटी मोडकांनाच विचारले त्यावरुन ही कादंबरी वाचायची उत्सुकता अधिकच वाढली आणि त्याच शनिवारी जाउन तिढा घेऊनच आलो.

मोडकांच्या जालावरती वाचलेल्या नियमित लिखाणावरुन त्यांचा धरणामुळे झालेल्या विस्थापतांशी आणि त्यांच्यासाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संघटनांशी जवळुन संबध आला असेल हे लक्षातच येते. त्याचप्रमाणे तिढा मधेही प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न व त्याच सोबत त्यांच्यासाठी काम करणर्‍या स्वयंसेवी अंतर्गत कामकाज व त्यातुन निर्माण होणारा वैचारिक आणि भावनिक गुंतागुंत या कादंबरीत मांडलेली आहे.

मांडणगाव जिल्ह्यातील आदीवासी भागात सरकारने एक फुडपार्क उभा करायचे ठरवलेले आहे. या भागात असलेल्या नैसर्गिक वनसंपत्तीवर आधारित हा फुडपार्क आहे. पण ह्याच साधानसंपत्तीवर अदिवासींचे जीवन अवलंबून आहे. यात अदिवासींच्या प्रश्नांवर काम करणारे राजीव व विदिशा हे एक जोडपे आणि त्यांची संघटना. ह्या संघटनेच्या उर्मिला सारख्या इतर कार्यकर्त्यांना हाताशी घेउन विदिशा व राजीव ह्यांनी फुडपार्क विरुद्ध संघर्ष उभा केला आहेच. पण या सगळ्यांचा आधार असलेली आणि कादंबरीतील सगळ्यात महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे धर्मा. धर्मा म्हणजे एक क्लिअर विचार असलेला, कुठल्याही गोष्टी कडे त्रयस्थ नजरेने बघु शकणारा असा युवक. ह्या सगळ्या राजकारणात, संघर्षात परिघावर राहुन काम करणारा असा हा धर्मा.  धर्माचे कॅरेक्टर हे तिढा मधले मला आवडलेले कॅरेक्टर..

     पण शेवटी सगळी माणसे हाडामांसाचीच... सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देताना,कामाची आखणी, अंमलबजावणी करताना कार्यकर्त्यांमधे वैचारीक गोंधळ अपरिहार्यपणे असणारच. इच्छा, महत्त्वाकांक्षा तर आल्याच. मग कुणाला उपेक्षित वाटणं, त्याची दुसर्‍याला जाणीव न होणं, एकमेकांत भावबंध गुंतणं हे सगळं त्रांगडं तिथंही होऊन बसतंच. कोणतंही काम करताना कितीही प्रयत्न केला तरी खाजगी आयुष्य सगळीकडे मधून मधून डोकावत राहतंच. या सगळया तिढ्याचे मस्त चित्रण मोड्कांनी रंगवलेले आहे.

ही कांदबरीच्या वाचताना मोडकांचे इतर लिखाणही आठवत जातेच. या पुस्तकवाचना नंतर एक आयुष्यातला पहिलाच नि आगळावेगळा अनुभव मला मिळाला, आणि तो म्हणजे लेखकासोबत पुस्तकाबद्दल चर्चा. हा एक वेगळाच अनुभव होता. मोडकांना जाउन मी सरळ कादंबरी संबधातले माझे विचार कळवू शकलो,त्यांच्या सोबत पुस्तकाबद्द्ल चर्चा करु शकलो.

आणखी काय सांगू तिढाबद्दल? माझ्या कडच्या पुस्तकाच्या प्रतीची दुबईवारीही पुर्ण झाली. आणि सध्या ते काहीही उणे नसलेल्या पुण्यात न उघडलेल्या लगेज बॅगमध्ये अजूनही सुखाने नांदतेय!!! :)