बुधवार, जानेवारी ०६, २०१०

गिरिश

(माझे मुख्यतो मिसळपावमी मराठीवर केलेले लेखन परत इकडे प्रकाशीत करत आहे.)

आज सकाळी नेहमी प्रमाणे ऑफिसला निघालो. सोसायटिच्या समोरच्या मैदानात काही मुले क्रिकेट खेळत होते, एक दहा-बारा वर्षांचा मुलगा बॉलिंग करत होता, त्याचा कडे पाहुन माझे पाउल अचानक थांबले, तो पळत आला आणि त्याने डाव्या हाताने जोरात बॉल टाकला आणि त्याने बॅट्समन ला बोल्ड केले. त्याला पाहुन माझ्या डोळया समोर गिरिश उभा राहिला. गिर्‍या माझा बालमित्र माझा शेजारी. असाच गिरिश ला आठवत मी पुढे जाऊ लागलो आणि डोळ्यात समोर उभा राहिलं तो दिवस.




मी असाच घरात लोळत पडलो होतो. पहिल्या पावसाची पहिली सर बाहेर पडत होती. शांत पणे गॅलरी जवळच्या सोफ्यावरबसुन बाहेर मस्त पाउस बघत बसलो होतो. आईने काहीतरी काम दिले म्हणून मी तेथुन उठलो,आत मधे काही तरी आवरत असताना अचानक बेल वाजली. मी दार उघडण्यासाठी बाहेर आलो, दार उघडुन बघतो तर बाहेर कॉलनीतले राजेश, पप्पु व अमित अर्धवट भिजलेल्या अवस्थेत उभे होते. मी त्यांना विचारले " काय झाले रे??" तिकडुन उत्तर आले "काका आहेत काय???" मी जरा घाबरलोच काय झाले ते तर कळ्त नव्हते, पण कोणि काहि सांगत नव्हते. इतक्यात कोण आले आहे बघायला बाबा बाहेर आले. बाबांनीहि तोच प्रश्न विचारला. त्यावर कोणीतरि म्हणाले " काका गिरिश सापडत नाहीये"



मला तर काहिच कळत नव्हते पण बाबांचि अवस्था सुद्धा तशीच होति. B.com दुसर्‍या वर्षाला असलेला मुलगा जर सापडत नाही असे तुम्हाला जर कोणि सांगितले तर कोणाची काय अवस्था असणार. मी सुन्न होवुन बघत होतो, बाबांनि त्यांना आत बोलवले, कारण खाली गिरिशच्या घराचे दार उघडे होते, त्याची आई घरात एकटी होती, आत बोलवल्यावर त्या तिघांपेकी कोणितरि सांगायला सुरवात केली. आज ते लोक सातारतांडा जवळच्या एका पाझर तलावात पोहायला गेले होते. बाबांनि त्यांना एक नाही अनेक प्रश्न विचारले. काय ते आज मला आठवत सुद्धा नाही. फक्त आठवते ते एवडेच की मी त्या मुलांच्या सोबतच तलावावर जायला निघालो. बाबा गिरिश चा वडिलांना ऑफिसमधे घ्यायला गेले.



गिरिश आणि माझि पहीलि भेट कधि झाली ते मला आठ्वत नाही. गुलमोहर मध्ये असलेल्या आमच्या फ्लॅट मधे आम्हि राहिला आलो तेव्हा मी दुसरि मधे होतो. गिरिश गुलमोहर च्या तळ मजल्यावर राहणारा, माझ्या पेक्षा एकच वर्ष मोठा. आमच्या शाळा वेगळ्या वेगळ्या होत्या. त्यामुळे आमची भेट संध्याकाळीच व्हायची. आम्ही गुलमोहर मधले मुले-मुली सोबत विष्-अम्रुत, लंपडाव असे अनेक खेळ खेळायचो. ह्या खेळामधे गिरिश नेहमी पुढे असायचा. संध्याकाळच्या खेळातला एक आमचा खेळ असायचा फुलपाखरु पकडायचा(आता कळते तव्हा फुलपाखरु पकडताना आई बाबा का ओरडायचे). आम्ही एक चिमणी सुध्या पाळली होती. तर ह्या चिमणी पाळण्यात चिमणि पकडण्याचे काम करणार गिरिशच होता. एकदिवस हा गिरिश शाळेतल्या मित्रांसोबत कुठे तरी खेळायला गेला, नंतर आम्हाला कळ्ले की तो शाखेत गेला होता. त्याने शाखेचे अशाप्रकारे वर्णण केले की दुसर्या दिवसा पासुन आम्ही पण शाखेत. शाखेत सर्व खेळात हा पुढे होताच. पण आमचा शाखेचा जाणे लवकरच बंद झाले, त्याला कारण होते १९९२ चे क्रिकेट वर्ल्ड कप. तेव्हा पासुन सुरु झालेले क्रिकेट वेड पुढे अनेक वर्ष चालत राहीले. क्रिकेट खेळन्यात मला जेमतेमच गति होति ती आजही तशिच आहे. पण गिरिश म्हणजे आमचा वसिम आक्रम होता. तसाच लेफ्ट आर्म बॉलींग करणारा. तशिच बॉलिंग ऍक्ट्न. आमचि नंतर नंतर सकाळी भेटायची एक आईडीया होति, सकाळी सकाळी उठुन घराच्या बाजुस असलेल्या अष्ट्विनायक गणेश मंदिरात जायचे. सकाळी मला बोलवायला आवाज द्यायचा तो गिरिशच. एकदा गिरिश शाळेतुन नाटकाचे तिकित घेवुन आला. आला तो ओरडतच बजरबट्टु बजरबट्टु बजरबट्टु.... तर ह्या गिरिश सोबत आम्ही बघितलेले नाटक बजरबट्टु. मी चौथीत असताना बाबांची अमरावतीला बदली झाली. आम्ही गुलमोहर सोडुन अमरावतीला गेलो. हलु हळु माझा गुलमोहर व गिरिशशि संपर्क कमी होवु लागला.



मी दहावीत असताना आम्ही परत गुलमोहर मधे राहीला आलो. त्या वेळेस गिरिश बराच बदलला होता. कॉलेजला जायला लागला होता. ओठावरति मिश्या फुटायला लागल्या होत्या. पण हळु हळु आमचे क्रिकेट सुरु झाले. तसे दहावीचे वर्ष असल्यामुळे शाळा क्लासेस ह्या मधुन मला खेळायला कमी वेळ मिळत असे, पण जेव्हा पण वेळ मिळे तेव्हा मी गिरिश आणि कंपनी ला जाउन मिळत असे. आता गिरिश चा ग्रुप फक्त गुलमोहर वाल्यांचा नव्हता तर पुर्ण कॉलनिच्या मुलांचा होता. कॉलनी चा क्रिकेट टिम चा ओपनिंग बोलर गिरिशच होता. गिरिशचे बारावी झाल्या नंतर त्याने B.Com ला ऍड्मिशन घेतली. त्या वर्षिच्या गणपती मंडळाचा अध्यक्ष गिरिश झाला होता.रोज संध्याकाळी आपल्या मित्रांना घरा समोर घेउन जमणार गिरिशच होता. संध्याकाळी तास-दोन तास पंधरा- विस मुलांचा घोळका उभा असायचा, पण कधी रस्त्यावरुन जाणार्‍या मुलींना कोणी त्रास दिला असे ऐकण्यात तर नाही आले.कधी कधी मी सुद्धा तिकडे उभा राहुन त्यांचा सोबत गप्पा मारायचो.



मी जेव्हा त्या तलावावर पोहचलो तेव्हा तिथले दृष्य फारच भयानक होते. बाजुच्या गावातले १००-२०० लोक तलावाभोवती गोल उभे होते. आमचे काहि मित्र आधिच ति़कडे पोहचले होते. वाट बघत होते ते अग्निशमन दलाची, थोड्यावेळाने तो डायवर आला, त्याला सुध्या गिरिश ला शोधायला बराच वेळ लागला. तेवढ्या वेळात गिरिश चे वडिल तिकडे पोहचले होते. ते दृष्य पाहुन तर काका खालीच बसले. थोड्यावेळात गिरिश ला बाहेर काढण्यात आले. गिरिश ला तिकडुन लगेच दवाखान्यात नेण्यात आले. पण तो पर्यंत खेळ संपला होता. माझा मित्र गिर्‍या गेला होता. त्या दिवशि काय झाले हे आजहि मला माहित नाहि, कधी विचारले ही नाही. कारण ते जाणुन तरी काय फायदा गिरिश तर गेला होता. त्या नंतर गुलमोहर च्या खालचा कट्टा बंदच झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा